Tuesday, November 25, 2014

कुपारी सीझनची कविता !!


कुपारी समाजाचे अस्तित्व !!

कुपारी समाजाचे अस्तित्व टिकवण्यासाठी लोकसंख्या वाढ हा उपाय होऊ शकत नाही. अस्तित्व टिकवणे हा अस्मितेचा प्रश्न आहे अन असुरक्षितता ही त्या मागची मूळ प्रेरणा आहे. तर लोकसंख्यावाढीसाठी अधिक अपत्यनिर्मिती जरुरी असून बदलत्या काळात नवीन पिढीला आपल्या पाल्याच्या संगोपनासाठी वेळ व खर्च ह्या बाबी आव्हानात्मक असल्याने व्यावहारिक पातळीवर हा उपाय अस्मितेच्या प्रेरणेवर मात करणारा आहे.

भाषा व वेशभूषा ह्या जरी आपण संस्कृतीशी निगडीत केल्या, तरी आपण हे जाणले पाहिजे कि संस्कृती ही प्रवाही असून आजच्या ग्लोबल जीवनात बाहेरच्या संस्कृतीपासून आपल्याला 'आयसोलेटेड' ठेवणे अशक्य अन अव्यवहार्य आहे. संकृती जतन करणे वाईट नाही, परंतु नव्या व्यावहारिक युगात जुन्या पद्धतीच्या संकृतीची अंमलबजावणी अपेक्षित करणे आपल्याला परवडणारे नाही.

अस्तित्व टिकवण्यासाठी लोकसंख्यात्मक वाढीपेक्षा गुणात्मक वाढीकडे लक्ष देणे ही काळाची गरज आहे. ह्याकरिता राजकीय दृष्ट्या सक्रिय होणे व उद्योगव्यवसायामध्ये उतरून आर्थिक दृष्ट्या संम्पन्न होणे ह्या दोन बाबी फार महत्वाच्या आहेत. तसेच समाजातील बुद्धीजीवी लोकांचा गट स्थापन करून कायदेशीर मार्गाने प्रसार माध्यमे, न्यायव्यवस्था, शासन प्रशासन ह्यात आपली उपयुक्तता अन उपद्रवमूल्य वापरून 'वेगळी ओळख' निर्माण करणे गरजेचे आहे.

शेवटी ज्याच्या पायाखाली त्याची हक्काची भूमी आहे, त्याला स्वतचा असा वेगळा चेहरा अन आवाज असतो. आज आपल्याच समाजात जमिनीवरून वाद इतके विकोपाला गेले आहेत कि नातेसंबंध उसवले जाऊन अप्रत्यक्षरीत्या जमिनींच्या दलालांना सहजतेने ह्या जागा मिळवण्यासाठी मदत करत आहेत. समाज टिकवण्यासाठी रक्ताची नाती टिकवणे व सर्वाना न्यायाने त्यांचे हक्क देणे, ही जागृती संस्कृती संवर्धन मोहिमेतून करावी लागेल व त्याकरिता चांगले आदर्श पुढे आणावे लागतील.

दुर्दैवाने एक दिवसाचा महोत्सव सोडला तर मागच्या २ वर्षात कुपारी संस्कृती मंडळाकडून भाषा, वेशभूषा, पारंपारिक खाद्यपदार्थ व वस्तू अन वास्तू ह्यांच्या संरक्षण व संवर्धनाकरिता विशेष प्रयत्न झाल्याचे दिसत नाही. ही उदानसिनता आपल्या सर्वाना मागे टाकून क्रियाशील कार्यकर्त्यामार्फत कालबद्ध कार्यक्रम आखणे गरजेचे आहे, अन त्यासाठी मंडळाचे 'विजन' अन 'मिशन' पुन्हा एकदा तपासून आपल्याला दुरुस्त करावे लागेल.

ती निघता सासरी ....

लाडक्या लेकीचं पाऊल जेव्हा, सासरकडे निघते
दुडूदुडू धावणाऱ्या आठवणीने, घर सारे रडते !

आईची सोनुली पुन्हा, उदरी हालचाल करते
बाबाची लेक लाडकी, ओंजळीत पुन्हा जन्मते !

लाडक्या लेकीचं पाऊल जेव्हा, सासरकडे निघते
दुडूदुडू धावणाऱ्या आठवणीने, घर सारे रडते !

दादाची ताई प्रेमाची, अलगद डोळ्यातून ओघळते
पाठीवरची लहान बहीण, रिकामा हिंदोळा शोधते !

लाडक्या लेकीचं पाऊल जेव्हा, सासरकडे निघते
दुडूदुडू धावणाऱ्या आठवणीने, घर सारे रडते !

लाल लुगड्यातील बय तिची, गालाला मुका घेते
पुन्हा पुन्हा मिठीत घेऊन, रिकामी मिठी भरते !

लाडक्या लेकीचं पाऊल जेव्हा, सासरकडे निघते
दुडूदुडू धावणाऱ्या आठवणीने, घर सारे रडते !

जिवलग मैत्रीण शेजारची ती, हळवे क्षण शोधते
डोळ्यातील विरह तिच्या, उबदार स्पर्शाने जाणते !

लाडक्या लेकीचं पाऊल जेव्हा, सासरकडे निघते
दुडूदुडू धावणाऱ्या आठवणीने, घर सारे रडते !

हवीहवीशी ती निघता सासरी, अंगण उदास भासते
रेशमी बंध नात्याचे ती, पुन्हा अलगद विणते !

सचिन मेंडिस

Wednesday, October 22, 2014

अंधारया वाटेवर लावलेली समई !

अंधारया वाटेवर लावलेली समई !

त्या मुलाचं नाव मला माहित नाही पण कधी कधी जाता येत रस्त्यात भेटतो. आमच्या गावात आदिवासी (वारली) लोकांची वस्ती आहे तिथेच त्याच घर. नुकताच दहावी होऊन कॉलेजमध्ये प्रवेश केलेला. तसं आदिवासी म्हटलं तर ते कुटुंब फक्त जातीच्या दाखल्यापुरतच, बाकी त्या कुटुंबाची राहणी अनेकांना लाजवणारी. वडील निर्व्यसनी, सगळे टापटीप, चांगले पत्र्याचे घर, मुलं शिकावी ह्याबाबतीत आईची दक्षता. सगळ काही चांगल्या कुटुंबाला शोभून दिसणार! ह्या मुलाला माझं खूप कुतूहल, 'सचिन मेंडिस' ह्या माझ्या नावात काही विशेष नसेल, पण बहुतेक मी इंजिनिअर असल्याचं त्याला खूप अप्रूप असावं. रस्त्यात कुठे दिसला तर मला न चुकता नेहमी हलकेच स्मित करायचा. मला त्याच्या डोळ्यात भविष्याची स्वप्ने दिसायची, खूप शिकण्याची, मोठे बनण्याची. तो दहावीत असताना त्याला एकदा बोलावून त्याच्या अभ्यासाची मी चौकशी केली होती. बापासारख अर्ध्यावर शिक्षण त्याने सोडू नये म्हणून मला चिंता वाटायची. आदिवाशी मुलाचं असंच नेहमी, ८-९ पर्यंत शिक्षण झाले कि मग कुठेतरी छोटी नोकरी बघून शिक्षणाला कायमचा रामराम. त्यात त्यांचाही दोष नाही, घरातील कुणी शिकलेले नसल्याने मार्गदर्शन करणारे अन दोन युक्तीच्या गोष्टी सांगणारे लोक दुर्मिळ. त्यात आपण गरीब अन स्पर्धेत न टिकणारे म्हणून एक वेगळाच न्यूनगंड. तोच खरा मोठा प्रॉब्लेम. काही दिवसा अगोदर हा पोरगा घराकडे येताना रस्त्यात दिसला म्हणून मी त्याकरिता कार थांबवली अन त्याला माझ्या शेजारी सीटवर बसवले. त्याला कारचा दरवाजा नीट लावता आला नाही ह्यावरून तो थोडा बावरल्यासारखा वाटला. बहुतेक कारमध्ये पहिल्यांदाच बसला असावा. मी दार लावून घेतले अन अभ्यासाचा विषय काढला. तो क्लास वरून येत होता अन कॉलेज व्यवस्थित चालू होते. बोलता बोलता त्याने मला माझ्या कारचे नाव विचारले. त्याला कारच्या नावाची उत्सुकता अन कुतुहूल वाटत होते. अन मी त्याच्यासाठी कार थांबवून त्याला लिफ्ट दिली ह्याचेही नवल वाटले असावे. मी त्याला कारचे नाव सांगितले अन सहज म्हटले 'तू मोठा झाला कि तू सुद्धा अशी कार घेऊ शकतोस, फक्त अभ्यास करावा लागेल'. त्या निरागस गरीब मनाला ते सुखावणारे होते. त्याला प्रेरणा मिळावी म्हणून मी पुढे बोलू लागलो. त्याला म्हटले, ' मी तुझ्या एवढा होतो तेव्हा आमचेही घर शेणाने सारवलेले अन कौलारू होते, मी सुद्धा लांब पायपीट करीत शाळेत जात होतो, पण शिकण्याची अन कुणीतरी बनण्याची जिद्द होती, आज तुझ्यात अन माझ्यात फक्त काळाचे अंतर आहे पण परिस्थितीचे अंतर बिलकुल नाही, तू ठरवलस तर तुला इंजिनिअर होण्याचे स्वप्न कुणीच थांबवू शकत नाही'. माझ्या बोलण्याने त्याच्या डोळ्यात एक वेगळी चमक आली. मला त्याच्या मनातील न्यूनगंड काढायचा होता. त्यादिशेने पहिली समई मी त्याच्या पराभूत मानसिकतेच्या वाटेवर लावली होती.काही वेळानंतर आम्ही आमच्या गावात पोहोचलो. त्याने माझे आभार मानून तो गाडीतून उतरला. निघताना मी त्याला हाक मारली अन सांगितले, 'मित्रा, एक दिवस येईल जेव्हा तू मला तुझ्या कार मधून लिफ्ट देशील अन मी तुला तुझ्या कारचे नाव विचारेन'. तो मोठ्याने हसला, स्वच्छ तलावात सूर्याचे किरणे पडून तलावाचा पृष्ठभाग जसा उजळून निघावा तसा त्याचा चेहरा उजळला. मला त्याच्या पाठीशी उभे राहिल्याचे समाधान वाटले. अशी अनेक चुणचुणीत पण गरीब मुले न्यूनगंड बाळगल्याने आज मागे पडत आहेत ह्याची नेहमी खंत वाटत होती. एका आदिवाशी पिढीने आपल्या आईवडिलांच्या काळात वाडीत मोलमजुरी केली, त्याच्या पुढच्या पिढीने आपल्या सुशिक्षित पिढीसाठी मोलमजुरी करावी ह्याच्या सारखे मोठे पाप नाही. आपण शिकणे हे सुशिक्षित असणे झाले पण अशा लोकांना हात देवून पुढे आणणे हे सुसंकृताचे लक्षण आहे. आता जेव्हा हा मुलगा मला रस्त्यात दिसतो तेव्हा त्याच्या हसण्यात मला एक भावी इंजिनिअर दिसतो. मला त्याच्यावर येणाऱ्या काळात लक्ष द्यावे लागणार आहे, माझाही स्वार्थ आहे त्यात, भविष्यात त्याच्या कारमध्ये मला फेरफटका मारायचा आहे. सचिन मेंडिस

बंद खोली !!

प्रत्येक माणूस असमाधानी असतो. कोणतेतरी दुखणे घेऊन तो जगत असतो. मग ते नात्याचे असो, करिअरचे असो, पैशाचे असो, स्पर्धेत मागे पडल्याचे असो की मानसन्मानाचे असो. प्रत्येकाचे प्राक्तन जगायला त्याची बंद खोली त्याला साथ देत असते, जी खोली बाहेरील गर्दीपासून त्याचे अस्तित्व वेगळे करून त्याला त्याचं खंर आयुष्य जगायला अन शोधायला मदत करते. दिवसाच्या आभासी प्रकाशात हरवेलेला प्रत्येकाचा चेहरा, त्याला त्याच्या बंद खोलीतील काळोखात अलगद गवसतो. ह्या खोलीत गर्दीतले मुखवटे नसतात. खोटे हास्य नसते, असतो तो स्वतःचा आरसा, स्वतःला आणि दुनियेला न फसवणारा. प्रत्येकाच्या बंद खोलीची ही सताड उघडी कविता !!

बंद खोली !!

बंद खोलीत भयाण एक,
दुखः गुपचूप लपलेलं असतं.
 दार उघडताच खोलीबाहेर,
चेहऱ्यावरून ते सरलेलं असतं.

सजवलेले चेहरे कृत्रिम,
मनात काळोख घेऊन जगतात.
दोन आयुष्याच्या अभिनयात,
स्वतःला ओढून ताणून थकतात.

डोळे असतात फुललेले,
हृदय मात्र कोमेजलेलं असतं.
बंद खोलीत भयाण एक,
दुखः गुपचूप लपलेलं असतं.

उंची वस्त्रे, सुगंधी अत्तरे,
गर्दीला सुखी भासवत असतात.
काळजाचे दुखणे मात्र,
रात्री झोपेला जागवत असतात.

गुलाबी पाकळ्यात गुंडाळलेलं,
प्रेत जणू ते सजलेलं असतं.
बंद खोलीत भयाण एक,
दुखः गुपचूप लपलेलं असतं.

दुखः जगण्या प्रत्येकाला,
बंद खोली हवी असते.
लांबी रुंदी प्रत्येकाच्या,
दुखा:ची ती नवी असते.

आतबाहेर खोलीच्या सीमेवर,
लढता आयुष्य संपलेलं असतं.
बंद खोलीत भयाण एक,
दुखः कायमचं लपलेलं असतं.

सचिन मेंडिस

मोगरा फुलला !! मोगरा फुलला !!

मोगरा फुलला !! मोगरा फुलला !!

मोगरा ह्या विषयवार बऱ्याच दिवसापासून लिहावेसे वाटत होते, पण वेळेअभावी लेखणीत मोगरा फुलत नव्हता. अलीकडेच फेसबुकवर मोगरयाचे दर्शन झाले अन अलगद मोगऱ्याचा स्पर्श हाताला अन सुगंध मनाला गंधाळून गेला. आज जरी परिसरातून मोगऱ्याचे फुलणे कमी झाले असले, तरी मोगऱ्याच्या बागा आठवणीच्या हिंदोळ्यावरती फुलायच्या थांबत नाही. आपली एक पिढी मोगरयाने वाढवली, मोगरा वाडीत फुलत गेला अन घरात संसार फुलला. सकाळच्या प्रहरी खुडलेला मोगरा गाडीने दादरच्या बाजारात बहरत गेला अन महिन्याकाठी येणाऱ्या मोगऱ्याच्या पैशातून घरात किराणा सामान आणि मुलांच्या शिक्षणाकरिता पैसे फुलू लागले. म्हणून मोगरयाचं अस्तित्व अन फुलंण हे माझ्या लेखी 'एक सफेद फुलं' ह्या जाणीवेच्या पलीकडचेचे आहे. ज्या कुटुंबाकडे त्या काळी १० गुंठेच्या आसपास मोगऱ्याची लागवड व्हायची त्यांची तेव्हा सामाजिक अन आर्थिक प्रतिष्ठा खूप मोठी होती. अशी कुटुंबे मोगऱ्याच्या जीवावर आर्थिक दृष्टीने खूप फुलेलेली असायची.

आमचा गाव एकेकाळी मोगऱ्याची राजधानी होती. लोकसंख्येच्या तुलनेत प्रती कुटुंब वाडीची जागा अधिक असल्याने प्रत्येक कुटुंबाकडे तुलनेने चांगल्या जागा मोगऱ्याच्या लागवडीसाठी मिळत होत्या. आमच्या आजोबाने दूरदृष्टी ठेवून मोठ्या प्रमाणात जागा विकत घेतल्याने आमच्या मेंडिस कुटुंबाकडे बऱ्यापैकी वाडी होती (अजूनही आहे). सर्व भावंडामध्ये जागा जरी वाटलेली असली तरी मोगऱ्याच्या बागा एकमेकांना लागलेल्या होत्या. त्यामुळे फार मोठी जागा मोगऱ्याच्या बागेने फुललेली असायची. दूरवर नजर टाकली तर मोगऱ्याचे ताटवे एकत्र कुटुंब पद्धतीची आठवण करून देत असतं. माणसांच्या गरजेकरिता जरी मोगऱ्याची वाटणी झाली असली तरी मोगऱ्याच्या फुलण्यात अन दरवळण्यात कुठे आल्या वाटण्या अन भेदाभेद? 'पातेराती' हा शब्द मला मोगऱ्यापासून समजू लागला. दादर हि मोगऱ्याची बाजारपेठ. देवाला फुले वाहण्यासाठी अन सहज मोकळ्या केसांवर गजरे फुलण्यासाठी हा मोगरा आपल्या भागातून सकाळी लवकर दादरला पोहचावा लागे, कारण उशीर झाल्यास मोगरा फुलण्याची अन त्याचे विक्रीमूल्य घसरण्याची भीती असे. त्यामुळे मोगरा खुडण्यासाठी सकाळी खूप लवकर उठावे लागे. माझ्या माहितीप्रमाणे खूप जागा असलेली मंडळी सकाळी ३ ते ४ वाजता मोगऱ्याच्या बागेत पोहोचत असतं. ह्या वेळेला अंधार असल्याने मोठ्या प्रमाणात लोक घासलेटचे दिवे वापरत असतं. ते दिवे बांबूच्या एक काठीला बांधून मोगऱ्याच्या ताटव्यात ज्या रांगेतला मोगरा तोडायचा आहे, त्या रांगेत उभा करीत असतं. मोगऱ्याच्या सुगंधात घासलेटचा दुर्गंध मिसळत असताना माझे बालमन गुदमरून जात असे. आता ह्या गोष्टीकडे तात्विक नजरेने पहिले तर असे वाटते कि कुणाला तरी फुलून त्याचा गंध दुसऱ्याकडे पोहचवण्यासाठी कुणाला जरी जळावे लागते. मुंबई मध्ये घरातील देवासमोर सुगंधी मोगऱ्याची फुले वाहणाऱ्या भाविकाला, वसईत त्या जळलेल्या घासलेटच्या दिव्याचे महत्व कधी कलेले असेल काय?

मी लहानपणी तसा आळशी होतो. सुट्टीच्या दिवशी मलाही मोगरा तोडण्यासाठी वाडीत जावे लागत असे. सकाळी उठून वाडीत जाणे ही माझ्या दृष्टीने तसी 'सुगंधी शिक्षा' होती. पण ह्या बाबतीत माझी प्रेमळ ताई मला सांभाळून घेत असे. त्यातल्या त्यात कमीत कमी लांबीची रांग माझ्या वाट्याला ती देत असे. ही बहिणीची माया त्या मोगऱ्याच्या सुगंधापेक्षा काही कमी नव्हती. ह्या रांगा बहुतेक वेळा बागेच्या परीघावरच्या असायच्या ( आजकालच्या Nx दुकानासारख्या). मोगरा तोडत असताना बऱ्याच गप्पा रंगायच्या. कधी सुखाच्या तर कधी दुख्खाच्या. सुखाचे विषय बहरत ठेवत असताना, हा मोगरा अलगदपणे दुखःचे कटू विषय आपल्या सुगंधी पोटात घेत असे. मोगरा तोडत असताना अख्खे कुटुंब मोगऱ्याच्या ताटव्यात उभे राहून एक प्रकारे बहरत असायचे. माझा मोगरा तोडण्याचा वेग तसा कमी असायचा त्यामुळे मी रांगेच्या मध्यावर पोहचलेलो असताना बाकी लोक त्यांची रांग संपवून दुसऱ्या रांगेकडे वळायचे. माझ्या आळशीपणावर माझ्या आईचा खूप विश्वास होता, त्यामुळे माझा मोगरा तोडून झाल्यावर आई माझ्या रांगेवर पुन्हा फेरी मारून माझ्या नजरेतून राहिलेल्या मोगऱ्याची वेगळी पिशवी भरायची. मागे राहिलेला मोगरा अन मागे उरलेली नाती ह्या मध्ये आईपेक्षा जास्त साथ देणारे कोणी मिळेल का? मोगऱ्याच्या हंगामामध्ये बांबूच्या मोठ्या टोपल्या (झाप) बागेच्या कोपरयात ठेवलेल्या असायच्या. कमरेला बांधलेली पिशवी भरली कि मग ती नेऊन त्या मोठ्या टोपलीत ओतली जायची. कमरेला भरलेली पिशवी बांधलेली व्यक्ती चालताना गरोदर बाईसारखी चालायची, जे पाहताना मजेशीर होते. तसं म्हटलं तर त्या काळात पिशवीतला मोगरा पोटच्या पोरांसारखाच होता. मुलांसारखीच त्याची काळजी घेतली जात असे. दुर्दैवाने पूर्ण पिशवी भरून गरोदरपण अनुभवण्याच भाग्य मला माझ्या आळशीपणामुळे वाट्याला आले नाही.

थंडीच्या दिवसात दव पडत असल्याने मोगऱ्याचा ताटवा भिजून जायचा अन मोगरा तोडणे थोडे जिकरीचे व्हायचे. तसेच दवामुळे पिशवी ओली होऊन तिचे वजन वाढायचे ज्यामुळे पिशवी हाताळणे कंटाळवाणे व्हायचे (आळशी माणसाला कारणे शोधावी लागत नाहीत). तोच प्रकार औषध फवारणीनंतर मोगरा तोडण्यावेळी व्हायचा. मोगऱ्याच्या पानावर साचलेला औषधाचा पांढरा थर हाताला लागायचा अन मग मधेच नाकाला खाज सुटल्यास अडचण व्हायची. सकाळी उरलेला व थोडा फुललेला मोगरा सायंकाळी तोडून नाक्यावर गजरा बनवणाऱ्या बायकांना विकला जाई, ज्याचे ५-१० रुपये मिळत असतं. त्या पैशाने माझी ताई आम्हासाठी वडा-पाव आणत असे, तो वडापाव त्या काळी अप्रत्यक्षरित्या माझ्या मोगरा तोडण्याच्या आळशीपणाच्या भावना मारण्यासाठी मला उत्तेजना देत असे. आज नोकरीत मिळणारे Incentives हे त्या वादापावाचे आधुनिक स्वरूप आहे, हे नक्की. त्याकाळी आगाशीतले मिनेज कुटुंबीय आमच्या गावात येऊन मोगरा घेऊन जायचे. साधारण ७ च्या दरम्यान आमच्या चर्चच्या मागे त्यांचे वाहन यायचे. कुणाच्यातरी ओटीवर सगळा मोगरा येऊन पडायचा. मग काट्यावर मोगऱ्याचे वजन व्हायचे अन मग एखाद्या वहीत 'सायमन मेंडिस - २ किलो ३०० ग्रॅम' अशी नोंद व्हायची. काही वेळेला लिहिता वाचता न येणारी मंडळी मोगरा तोलायला यायची आणि आमची मदत घ्यायची. मग त्यांचा मोगरा तोलून तो वहीत नीट लिहिण्याची समाजसेवा मला पार पाडावी लागे. बहुदा मला जडलेला समाजसकार्याचा नाद अन लिहिण्याची प्रेरणा ह्या मोगरा तोलणे-लिहिणे घटनेतून मिळाली असावी.

मोगरा देऊन घरी परत येत असताना मोगऱ्याची रिकामी पिशवी उलटी करून त्यातला राहिलेला कचरा-पाने काढणारी अन 'आज तुवो मोगरो कोडो जालो' अशी विचारपूस करणारी मंडळी हमखास भेटायची. बहुतेक मंडळी घरतल्या वहीत किव्हा बँकेच्या कॅलेंडरवर प्रत्येक दिवसाचा मोगरा लिहून ठेवायची अन दुसऱ्या दिवशी कालचा बाजारभाव विचारून घ्यायची. महिन्याच्या आखरीला प्रत्येकाकडे महिन्याचा हिशोब अन पैसे पडायचे. त्या दिवशी प्रत्येकाचे चेहरे फुललेले असायचे, नवी खरेदी व्हायची. आज जरी जास्त आठवत नसले तरी त्या पावतीवर खाली 'चूक भूल देणे घेणे' असे लिहलेले असायचे असे आठवते. अनेक ग्राहकांचा बोटावर आकडेमोड करून हिशोब ठेवत असतांना असे एरर होणे साहजिकच होते. लोकही मोठ्या समजुतीने चूक भूल देत घेत असतं अन म्हणूनच आपल्याकडे मोगरा अन माणसामाणसातील विश्वास जुन्या काळात फुलत राहिला. आजही आमचे मिनेजकडील जॉन भावजी फुलांचा, प्रामुख्याने मोगऱ्याचा व्यवसाय करतात. त्यांच्या यामाहा बाईकवर दोन हातामध्ये आडवी ठेवलेली मोठी काळी पिशवी आज त्यांची ओळख झालेली आहे. फुलाच्या व्यवसायातून जेव्हा त्यांनी आपला बंगला बांधला तेव्हा बंगल्यासाठी 'फुलराणी' पेक्षा जास्त समर्पक नाव त्यांना शोधून सापडले नाही. त्यांनी आजही रेल्वेच्या डब्यात ठेवलेली मोगऱ्याची पिशवी कोणत्याही माणसाची सोबत न घेता सहजपणे दादर स्टेशन गाठते अन हमाल ती पिशवी बरोबर ओळखून ती उतरवून दादरला मार्केटमध्ये त्यांच्या गाळ्यात पोहचवतात.

अशा ह्या मोगरयाने एक काळ आपली फार मोठी सेवा केली. कुटुंबे फुलवली. तो बहरत राहिला अन आपण शिकत राहिलो. कमरेला मोगऱ्याची पिशवी होती म्हणून आज पाठीला laptop ची Bag आली. आज ते दिवस स्मरत असताना अलगदपणे तो सायंकाळचा फुललेला मोगरा आठवणीच्या पिशवीतून ओसंडून वाहतो. मन फुलते, शरीर बहरते अन काळाच्या वेगात मोगऱ्याची ताटातूट झाल्याची एक अनामिक सल काळजाला छेदून जाते. माणसांच्या अंतरंगाला सुगंधी करणारा मोगरा डोळ्यांच्या पापण्याही तितक्याच अलगदपणे ओल्या करतो. मोगऱ्याच्या बागेत बालपणी सुगंधी मोगरा तोडणारा 'सचिन', ते जगातल्या सर्वात मोठ्या सुगंध बनवणाऱ्या कंपनीत काम करणारा 'मेंडिस', हा प्रवास म्हणूनच मला मोगऱ्या इतकाच सुगंधी अन टवटवीत वाटतो. आजही अनेकांचे संसार मोगऱ्याच्या फुलाबरोबर बहरत आहेत. माझ्या आठवणीतला मोगरा, पुढे माझ्या लेखणीत आला. 'मोगरा फुलला' तशी माझी 'कविता' फुलत गेली. मोगऱ्याचे गीत कवितेतून फुलू लागले. मोगरयाने माझे घर भरले, मला उभे केले, समाजाची रिकामी ओंजळ समृद्धीने भरली. हा ओंजळीतला मोगरा सदा फुलू दे, बहरू दे. आजच्या धावपळीच्या ग्लोबल जीवनात त्याला ओंजळीत घेणे जरी शक्य नसले तरी त्याला आठवणीत फुलवणे आपल्याला सहज शक्य आहे, फक्त त्याचे ऋण मान्य करायला सुगंधी अन टवटवीत मन हवे !!

डरना मना है: एक गूढ कथा

डरना मना है: एक गूढ कथा

ही कसली विचित्र पैज. ती सुद्धा गावात सर्वात डेअरिंगबाज मुलगा म्हणून पहिला येण्याची. अन पैज पण कोणाबरोबर? तर अगदी जवळचा मित्र सीझर बरोबर. तसा रोशन डेअरिंगबाज मुलगा, भीती त्याला माहित नाही. पण अशी विचित्र पैज. रात्री १ वाजता गावापासून दूर निर्जन वाडीत जाऊन तिथे विहिरीच्या बाजूला बसून 'हॉरर मूवी' पाहायची, ती पण एकट्याने. अन पिक्चर कोणता ते पण सीझर ठरवणार. वर पिक्चर laptop मध्ये लोड न करता पेन ड्राईव मध्ये. अन तो पेन ड्राईव रोशन च्या हातात न देता सीझरने संध्याकाळी जाऊन त्या विहिरीच्या बाजूला असलेल्या त्या निर्मनुष्य मोडक्या झोपडीच्या दाराला लावून ठेवायचा अन सोबत त्या laptop चा लॉगइन आणि पासवर्ड तिथेच कागदावर लिहून ठेवायचा. म्हणजे रोशन त्या जागेवर पोह्चाल्याशिवाय पिक्चर पाहूच शकणार नाही. रोशनने पैज मान्य केली. आज रात्री तो त्या निर्जन वाडीत जाऊन तिथे विहिरीच्या बाजूला एकांतात 'हॉरर मूवी' पाहणार होता. त्याला गावातील सर्वात 'डेअरिंगबाज' असल्याचे सिद्ध आज करायचे होते.

आज हवेत गारवा होता. साधारण रात्री १२.३० च्या सुमारास सीझर आणि रोशन गावातल्या क्रॉस जवळ एकत्र आले. सीझरने त्याची laptop ची bag रोशन कडे सुपूर्द केली आणि त्याला निघण्याचा इशारा केला. रोशनची पाऊले वाडीच्या दिशेने गावाबाहेर पडू लागली. गावात ठार काळोख होता, रातकिड्याचा कर्णकर्कश आवाज रात्रीला कापत होता. ढगाळलेल्या आकाशात चंद्र गायब झाला होता. तसा क्रिकेट खेळण्यासाठी रोशन त्या रस्त्याने गावातील वाडीत येत होता, परंतु तो नेहमी दिवसा. आजची परिस्थिती वेगळी होती. मध्यरात्री एकट्याने ह्या अंधारात वाट शोधणे त्याला कठीण जात होते. अंगात सफेद टीशर्ट, ब्लू जीन्स, पायात स्पोर्ट शूज आणि पाठीला काळी laptop bag अशी त्याची आकृती काळोखात पुढे जात होती. गावातल्या अतुकाकाने अलीकडेच त्यांचे नवीन घर वाडीतल्या केळीच्या बागेत बांधले होते. त्यांच्या घरामागील बल्बचा थोडा उजेड त्याला जाताना दिसत होता. गावातल्या कुत्र्यांचे रडणे त्याचे कान भेदत होते. किती विचित्र रडतात ना हे कुत्रे, रोशन स्वतःशीच बोलून गेला. रोशन उजवीकडे वळला, पुढे चढण होती अन मग नारळाची बाग. त्याने नारळाच्या बागेत प्रवेश केला अन झपाझप चालू लागला. अचानक जोरात आवाज झाला तो जागीच थांबला. नारळाची एक झावळी समोरच्या माडावरून कोसळून त्याच्या पुढ्यात येऊन पडली होती. क्षणभर रोशनला काही समजले नाही, त्याने ती झावळी बाजूला करून पुढचा मार्ग पकडला. आता तो मोकळ्या अशा उजाड जागेवर आला होता. कधी कधी गावातील मुले क्रिकेट खेळण्यासाठी ह्या भागात येत असत. चंद्राच्या मंद प्रकाशात क्रिकेटचे पीच अस्पष्ट दिसत होते. रोशन चालत राहिला. डाव्या बाजूला थोडे पुढे गेले कि तिथे आंब्याचे एक झाड होते अन मागे एक मोठे बावखल. रोशनने चालता चालता बावखलाच्या दिशेने नजर टाकली, आकाशातील चंद्राचे प्रतिबिंब बावखालातील पाण्यावर पडलेले होते. रोशनने आकाशात पाहीले अन पुन्हा तो झपाझप चालू लागला. गावापासून आता तो खूप दूर आला होता. अजून ५ मिनिटे चालले कि डावीकडे वळून मोगऱ्याच्या बागा, त्या पार केल्या कि ती विहीर. ४-५ वर्षाअगोदर एक बाई तिथे राहत होती पण ती कुठे गायब झाली ते कुणालाच माहित नव्हते.

हवेत थंडी वाढली होती. रोशनला थकवा जाणवत होता पण लक्ष्य समोर दिसत होते. त्याने मोगऱ्याची बाग पार केली अन तो पुढे आला. चंद्र ढगाआड केल्याने अंधार वाढला होता. आता त्याला मोडकी झोपडी दिसू लागली, अन बाजूला ती विहीर. बहुतेक तो कोल्ह्याचा आवाज असावा. वाडीत रात्री कोल्हे रडतात हे त्याने ऐकले होते पण आज तो अनुभव घेत होता. तो झोपडीच्या बाजूला आला. त्याला आता झोपडीचे दार गाठून पेन ड्राईव व लॉगइन आणि पासवर्डसाठी कागद घ्यायचा होता. थोडा आडोश्याला तो दरवाजा होता. त्याच्या एका टोकाला खिळ्याला पेन ड्राईव व एक कागद बांधून ठेवला होता. रोशनने दोन्ही वस्तू हातात घेतल्या अन तो विहिरीच्या बाजूला असलेल्या लाकडाच्या ओंडक्यावर बसला. laptop च्या स्क्रीनवरील उजेडाने विहिरीबाजूचा अंधार थोडा दूर झाला होता. रात्रीचा साधारण एक वाजला होता. रोशनने पाठीवरचा laptop काढला अन ऑन केला. हातातील कागद उघडून त्यातील लॉगइन आणि पासवर्ड त्याला घ्यायचा होता. त्याने कागद उघडला. सीझरने त्यावर लॉगइन आणि पासवर्ड लिहिला होता. लॉगइन: 'अननोन' आणि पासवर्ड: 'इमेज'. काय विचित्र लॉगइन आणि पासवर्ड. रोशनने मनातल्या मनात म्हटले. आता laptop सुरु झाला होता. रोशनने हलकेच पेन ड्राईव laptop ला लावला आणि फोल्डर ओपन केले. 'अननोन इमेज' म्हणून एक विडीयो फ़ाइल त्यात सेव केलेली होती. रोशनने मूवी सुरु केली. कोणता पिक्चर असेल बरे? रोशनने विचार केला. पिक्चर सुरु झाला. ना सुरवातीचे नाव ना काही. कसला पिक्चर असेल बरा. त्याला फक्त काळोखी रात्र दिसत होती, त्या पिक्चरमध्ये. सर्वत्र अंधार अन कुठली तरी नारळाची वाडी. अचानक एक व्यक्ती त्या बागेत चालताना दिसू लागली. पाठमोरी आकृती होती ती. हळूहळू आकृती स्पष्ट होत गेली. सफेद टीशर्ट, ब्लू जीन्स, पायात स्पोर्ट शूज आणि पाठीला काळी laptop bag. अशी ती आकृती पिक्चरमधील काळोखात पुढे जात होती. अरे बापरे, काय हे विचित्र? ही आकृती तर माझ्या सारखीच अन ती नारळाची बाग, आताच मी चालून आलो. कोण असेल तो तरुण त्या पिक्चरमध्ये? अन तो अचानक थांबला का त्या नारळाच्या बागेत? रोशन उत्कंठतेने पाहू लागला. पिक्चरमधील त्या तरुणाने त्याच्या समोर पडलेली नारळाची झावळी उचलून बाजूला केली अन तो पुढे चालू लागला. काय हे विचित्र, नुकताच मी ती झावळी उचलली तसेच दृश्य. पिक्चर पुढे सरकत होता अन तो तरुणही झपाझप पुढे चालत होता. बापरे, हे काय पुन्हा. तेच बावखल अन तीच चंद्राची सावली त्या पाण्यात. क्षणभर रोशनला काही कळेनासे झाले. आपल्या चालण्याची कोणीतरी शूटिंग करून तीच मूवी आपल्याला laptop वर दाखवत आहे, असे त्याला त्या क्षणी वाटू लागले. (हि कथा 'सचिन मेंडिस' ह्यांची असून पूर्व परवानगीशिवाय कुठेही प्रकाशित किव्हा पोस्ट करू नये.)

पिक्चरमधील तरुण आता एका निर्जन ठिकाणी आला होता. समोर एक विहीर होती अन त्याच्या बाजूला एक मोडकी झोपडी. रोशनच्या समोर असलेल्या झोपडीच्या हुबेहूब ती झोपडी होती. तो तरुण झोपडीच्या दाराजवळ गेला अन त्याने झोपडीच्या दरवाजाजवळून काही वस्तू हातात घेतली अन तो विहिरीबाजुच्या ओंडक्यावर येऊन बसला. त्याने पाठीवरचा laptop काढला अन ऑन केला. हातातील कागद उघडून त्यातील काही पाहून त्याने laptop वर टाईप केले. लॉगइन आणि पासवर्ड असावा का? काय असेल त्याचा लॉगइन आणि पासवर्ड? अननोन इमेज असेल काय? रोशन विचारात गुंग झाला. अचानक पिक्चरमधील कोल्हयाचे रडणे त्याला ऐकू आले अन तो भानावर आला. पिक्चरमधील तरुण laptop मध्ये गढून गेला होता, अचानक त्या तरुणाने हातात्तील घडाळ्याकडे पाहीले. त्याच्या घडाळ्यात रात्रीचा १.३० वाजला होता. रोशनने ताबडतोब स्वतःच्या घडाळ्याकडे पाहीले. 'ओह माय गॉड', घडाळ्यात रात्रीचा १.३० वाजला होता. काय हा विचित्र योगायोग. दोन्ही ठिकाणी सारखीच वेळ. रोशन पुढे पिक्चर पाहू लागला अन आलेल्या दृश्याने त्याची बोबडी वळाली. भर थंडीत त्याला घाम फुटला. पिक्चरमधील त्या तरुणाच्या पाठीमागे साधारण १० फुट लांब एक अनोळखी आकृती उभी होती. केस मोकळे सोडलेली बाई असावी बहुतेक. हळूहळू ती आकृती त्या तरुणाकडे सरकू लागली. जोरात ओरडून त्या तरुणाला सावध करावे असे रोशनला वाटत होते पण शेवटी तो एक पिक्चर होता. आता ती केस मोकळे सोडलेली अनोळखी आकृती त्या तरुणाच्या अगदी मागे हात लागेल इतक्या जवळ आली होती. रोशनच्या मनात एक वेगळीच धाकधूक निर्माण झाली होती. अचानक त्या अनोळख्या आकृतीने आपला हात त्या तरुणाच्या अंगावर ठेवण्यासाठी पुढे केला अन पुढे पाहणार तोच laptop बंद झाला. बहुतेक battery ऑफ झाली असावी. पुन्हा एकदा तो विहिरी बाजूचा परिसर काळोखात बुडून गेला. आता फक्त चंद्राचा अंधुक प्रकाश रोशनच्या सोबतीला होता. रोशन गार पडला होता. त्याने जे समोर पाहीले त्या दृश्याने त्याचे हातपाय लटपटू लागले. संपूर्ण अंगावर काटे उभे राहिले. कानामागून घामाची एक धार वाहून खाली अंगावर सरकली. त्याच्या पुढ्यात एक गूढ सावली पडली होती. तशीच हुबेहूब, तीच ती पिक्चरमधील केस मोकळे सोडलेली अनोळखी आकृती. रोशन त्या आकृतीकडे भीतीने पाहू लागला अन अचानक त्याच्या खांद्यावर एक थंडगार हात पडला, त्याने मागे वळून पाहीले अन.........

सकाळी विहिरीभोवती गाव जमा झाला होता. रोशन बेशुद्ध अवस्थेत खाली पडला होता. त्याच्या तोंडातून फेस येत होता व हातात एक कागद होता. त्यावरील अक्षरे सहज दिसत होती. लॉगइन: सीझर आणि पासवर्ड: हॉरर. रोशनला डॉक्टरकडे नेण्याची धावपळ सुरु झाली. गावातील तरुण मंडळी सीझरवर तुटून पडली होती. त्याच्यावर प्रश्नांचा भडीमार होत होता. कोणता पिक्चर टाकला होता रे मुर्खा त्या laptop मध्ये?' एका मित्राने सीझरला झापत विचारले. सीझर शून्यात बसला होता. सीझरच्या तोंडातून हलकेच उत्तर आले, 'तोच पिक्चर, रोशनचा फेव्हरीट, रामगोपाल वर्माचा, 'डरना मना है'.

माझ्याच सारख्या तरुणांसाठी उगाच सुचलेली कविता !!

माझ्याच सारख्या तरुणांसाठी उगाच सुचलेली कविता !!
 -----सचिन मेंडिस------

निकाल लागला, पण तसं काही विशेष वाटत नाही.
कोण जिंकले कोण हरले, पण डोळ्यात पूर्वीसारखे अश्रू साठत नाही.
ठाकूर निवडून आल्याचा द्वेष नाही
पंडित, फुर्ट्याडो, तुस्कानो पडल्याचा क्लेश नाही.
सगळ कसं सरळ रेषेत चालू आहे, ना द्वंद ना खंत
आता लढणे नाही, पडणे नाही कि कुणाला पाडणे नाही.


पंडित निवडून आले होते, म्हणून फुकटात काही घरात आले नाही,
 अन ठाकूर निवडून आले म्हणून, घरातून कोणी काही नेणार नाही,
म्हणून खंर सांगू, निकाल लागला, पण तसं काही विशेष वाटत नाही,
 कोण जिंकले कोण हरले, पण डोळ्यात पूर्वीसारखे अश्रू साठत नाही.

अंदाज चुकले, आकडे फिरले,
 ज्याचा आकडा जास्त, तो राज्यकर्ता.
 सगळा आकड्यांचा खेळ,
ज्यांचे जास्त आकडे, तोच प्रजेचा कर्ताधर्ता,

आपल्याला आकड्यांसाठी
 ७.१४ ची अंधेरी लोकल रोज पकडायलाच हवी,
बाकी आपली तिचं हरित वसई
 अन तिचं संघर्ष कहाणी.
सगळ कसं सरळ रेषेत चालू आहे, ना द्वंद ना खंत
 आता लढणे नाही, पडणे नाही कि कुणाला पाडणे नाही.

 जिथून सुरु केलं होत २००८ साली,
 त्याच रस्त्यावर येऊन पोहोचलंय,
एक वर्तुळ पूर्ण फिरून,
आज त्याच पूर्वीच्या जागेवर थांबलोय,
 तसं हाती काही लागलं नाही
 अन हाती काही लागणारही नव्हत.
 हात कधी आपण पसरले नाहीत,
अन कधी पाठीत वाकणारही नव्हतो.
 मिरवावं असं भरीव काही, आज मागे सुरलं नाही
 पोलिस केसेस अन कोर्टाच्या तारखा,
त्याचही दुख: उरलं नाही.
ज्यांच्यासाठी लढायचं, तेच आज असे परके झालेत,
 ज्यांच्याविरुद्ध लढायचं, तेच समाजाचे आश्रयदाते झालेत,
 म्हणून सगळ कसं सरळ रेषेत चालू आहे, ना द्वंद ना खंत
 आता लढणे नाही, पडणे नाही कि कुणाला पाडणे नाही.

 जमेपेक्षा खर्च जास्त येईल, ह्याची भीती धरली नाही, ख
रंतर जमा खर्च मांडायची, आज इच्छाच उरली नाही,
ना नाउमेद झालो मी, ना सोडले रणांगण मी
फक्त लढण्याचा भ्रम, समाज परिवर्तनाची खाज, पोरा आता आवरायला हवी.
डोळ्यातील धग, अंगातली रग, पोरा आता सावरायला हवी.

आता शेजारया सारखं शांत बसायचं, त्यांच्यासारखी टोपी फिरवायची,
 हिरव्या वसईची 'सुवार्ता', आता बिलकुल नाही मिरवायची,
कुणी लाठी उगारली तर मनोसोक्त हसायचं, कुणी दुकान लुटलं तर चुपचाप बसायचं
 सगळ कसं सरळ रेषेत चालू आहे, चालू राहील, ना द्वंद ना खंत
आता लढणे नाही, पडणे नाही कि कुणाला पाडणे नाही.

 -----सचिन मेंडिस------

Thursday, September 18, 2014

पेरू !

लहानपणी पेरू तोडण्यासाठी गावभर फिरायचो. छोटी छोटी अन कच्ची पेरू झाडावर चढून तोडण्यात अन घरमालकाच्या शिव्या खाण्यात तेव्हा वेगळीच मजा होती. आज अंगणातील झाड पेरूने नखशिखांत भरून गेलंय, सहज हाताला लागतील असे मोठे पेरू झाडाला लागलेत. पहिल्या मजल्यावरील खिडकीतून बाहेर पाहिले तर अक्षरश: पेरूच्या डहाळी खोलीला स्पर्शून लागलेल्या आहेत. का कुणास ठाऊक पण पेरू तोडण्याची उर्मी आता मागे राहिलीय. कधी तरी झाडावर नजर टाकली तर एखादा पोपट किव्हा खारुताई छानपैकी पेरूवर ताव मारताना दिसते. अशा पक्षांना झाडावर पेरू खाताना पाहण्यात अन त्यात आपले बालपण शोधण्यात एक वेगळीच धुंद आहे. चिंब पावसात ती धुंद अनुभवण्याचे सुख मिळते, हे ही न थोडके !!

वसईचे राजकारण: दशा अन दिशा

वसईचे राजकारण: दशा अन दिशा - सचिन मेंडीस

 राष्ट्रीय राजकारणाचा विचार करता राजकारण हे कॉंग्रेस सहयोगी(संपुआ) अन भाजप सहयोगी (रालोआ) अशा दोन गटात विभागले गेले आहे. तोच साचा महाराष्ट्रामध्ये आघाडी अन युती असा दिसून येतो. वसईचा विचार करता बहुजन विकास आघाडी हा कॉंग्रेसचा सहयोगी पक्ष राहिल्याने त्यांनी इतके वर्ष वसईत पक्ष वाढवण्यापेक्षा वसई विरार हा पट्टा बहुजन विकास आघाडीला आंदण देऊन टाकला होता. मागच्या लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेसने बहुजन विकास आघाडी विरोधात उमेदवार देऊन एक वेगळा राजकीय संदेश देण्याचा प्रयत्न केला होता, पण दुर्दैवाने ऐनवेळी आपला उमेदवार मागे घेऊन बहुजन विकास आघाडीला झुकते माप दिले अन वसई विरार मधील स्थानिक कॉंग्रेस पेक्षा बहुजन विकास आघाडीच्या नेतृत्वाला मोठे केले (अन त्याची किमंत निवडणुकीत मोजली). ह्यात महाराष्ट्र कॉंग्रेसच्याही काही राजकीय मर्यादा आहेत. वसई विरार परिसरात स्वतंत्र अस्तित्व असलेल्या बहुजन विकास आघाडीची २ आमदार, एक महापालिका तसेच जिल्हा परिषद, पंचायत समिती व ग्रामपंचायत मध्ये सत्ता किव्हा प्रतिनिधित्व आहे. कॉंग्रेसने बहुजन विकास आघाडीचा हात सोडल्यास बहुजन विकास आघाडी राष्ट्रवादीशी सलगी करू शकते जे कॉंग्रेसला राष्ट्रवादीबरोबरच्या स्पर्धेत परवडणारे नाही.

येणाऱ्या काळात वसई-विरारचा भूप्रदेशाचा राजकीय विचार केल्यास वसई-विरारमधील राजकारण हे बहुजन विकास आघाडी अन शिवसेना-भाजपा युती ह्या दोन पक्षात विभागलेले दिसून येईल. वसई मतदारसंघात जन आंदोलन समितीचा जरी विचार केला तरी त्याचे नेतृत्व अन निर्णय घेणारे पदाधिकारी हे युतीचे नेते असल्याने काही वेगळे निर्णय होण्याची शक्यता नाही. त्यामुळे थोडे स्पष्ट बोलवायचे झाल्यास वसई-विरारमधील राजकारण हे बहुजन विकास आघाडी विरुध्द शिवसेना-भाजपा-जन आंदोलन समिती युती असेच राहणार आहे. ह्या सर्व वास्तवाचे भान ठेवून व दीर्घ कालीन राजकारणाचा विचार करून आपल्या समाजाला (मूळ वसईकर) कोणत्या तरी एका गटात प्रवेश करून आपल्या कर्तुत्वाने पुढे जावे लागेल. ह्या व्यतिरिक्त होणारे राजकीय निर्णय हे तत्कालीन अन दीर्घकालीन कसोटीवर तोट्याचे असतील. ह्यात प्रामुख्याने एका राजकीय पक्षाबरोबर नसल्याने निर्माण होणारा राजकीय अविश्वास तसेच एका पक्षात राहून स्थानिक नेतृत्वाला वर जाण्याची संधी न मिळाल्याने होणारे समाजाचे नुकसान ह्या दोन प्रमुख बाबी येतील.   काही वेळेला प्रश्न सोडून दिल्याने सुटतात असे म्हटले जाते. अलीकडेच काही मंडळीनी बहुजन विकास आघाडीला आपले कायमचे शत्रू न मानता त्यांचे राजकीय नेतृत्व मान्य करून सहमतीने आपली कामे करावीत असा सूर मांडल्याचे कळते. हा प्रश्न सोडवण्याचा वेगळा  उपाय जरी असला तरीही बहुजन विकास आघाडीचा इतिहास बघता हा विषय चर्चेचा व वादाचा होऊ शकतो. दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे सर्व स्थानिक वसईकर/ख्रिस्ती मतदार बहुजन विकास आघाडीच्या विरोधात नाहीत, हेही वास्तव आहे.मागील मतदानाची सांख्यिकी पाहिली तर ३५%-४०% मतदार बहुजन विकास आघाडीच्या बाजूने असल्याचे स्पष्ट दिसते. त्यामुळे नजीकच्या काळात कुंपणावर असलेली मते कोणाच्या बाजूने झुकतात ह्यावर मोठ्या प्रमाणात राजकीय गणिते ठरली जातील. दुर्दैवाने जुना समाजवादी व ख्रिस्ती मतदार आज ह्या कुंपणाच्या रेषेवर आहे ज्याचे प्रमाण ढोबळमानाने एकूण मतदानाच्या २५ % इतकी असेल.  

दीर्घकाळ राजकारणाचा विचार करता स्थानिक वसईकर/ख्रिस्ती मतदाराला आपली राजकीय उपयुक्तता (प्रसंगी उपद्रवमूल्य)  वापरून व मागण्या विषयी बोलणी करून बहुजन विकास आघाडी किव्हा शिवसेना-भाजपा-जन आंदोलन समिती युती ह्या एका कळपात सामील व्हावे लागेल व पुढे कौशल्याने नेतृत्व करून आवाज बुलंद करावा लागेल. बहुजन विकास आघाडी हा आधुनिक सुभेदाराचा पक्ष असल्याने व तिथे व्यक्तिकेंद्रित निर्णय घेतले जात असल्याने भविष्यात घराण्याबाहेर दुसऱ्या कुणाला नेतृत्व मिळणे हे आश्चर्य ठरेल. ह्या दोन्ही गटाला बाजूला ठेऊन काही वेगळे राजकीय व्यासपीठ निर्माण होण्याची शक्यता नजीकच्या काळात धुसर आहे. कारण अशी कडबोळी आपल्या राजकीय हेकेखोरीमुळे समर्थ राजकीय पर्याय देऊ शकणार नाहीत व अल्पायुषी ठरतील. शेवटी कितीही म्हटले तरी राजकारण हे प्रवाही असते. काही गणिते क्षणात बदलू शकतात किव्हा एखादी घटना मोठी राजकीय उलथापालथ घडवू शकते. जगाच्या इतिहासात कोणतीही सत्ता चिरकाल टिकलेली नाही हे त्रिकाळ सत्य आहे, परतू तूर्तास वसईत काळ सोकावतोय त्याचे दुख: आहे.    

भाव अन भावना !

भाव अन भावना !

गाडी फलाटाला लागली अन तो स्टेशनच्या बाहेर आला. बायकोने आज येताना फळे आणायला सांगितली होती. समोरच्या भैय्याकडे त्याने मोर्चा वळवला. 'भैया, एक किलो सेब देना, वो बडे वाले दे दो’. 'सेठ, ये बडे वाले २०० रुपये किलो है, थोडे मेहंगे है, लेकिन माल बढीया है' ! 'क्या, २०० रुपये किलो, और ये दुसरे वाले कैसे दिये'? 'ये सेठ, १६० रुपये किलो है' ! 'ठीक है, १६० रुपये किलोवाले देना' !

त्याने पिशवी घेतली अन तो घराकडे निघाला. रस्त्यात त्याने गाडी थांबवली अन तो बिअर शॉप कडे वळला. ‘भाऊ, २ किंगफिशर माइल्ड दे. चिल्ड हा'. 'दादा, किंगफिशर माइल्डचा भाव १० रुपयेने वाढला काल पासून. पण LP स्वस्त आहे, देऊ का? 'अरे काय पण तू भाऊ, किंगफिशर माइल्ड प्यायची तर १०-२० रुपये बघून चालेल का'? तू दे २ किंगफिशर चिल्ड अन २० रुपयाचे वाटाणे दे चाखण्याला‘. त्याने बिअरची पिशवी गाडीच्या डिगी मध्ये टाकली. सफरचंदाची पिशवी बिअरच्या पिशवीखाली दाबली गेली होती, त्यामुळे त्यांची घुसमट वाढली होती. आयुष्याच्या डिगीमध्ये बिअरचा भाव त्याच्यापेक्षा जास्त होता. बिअर सफरचंदाच्या डोक्यावर बसली होती, अन विकृतपणे हसत होती. सफरचंदाची पिशवी ओरडत होती पण तिचा आवाज कुणाला ऐकू येत नव्हता. बहुतेक सर्वांनी कान बंद केले होते.

सचिन मेंडिस

वेदना !

वेदना !

 हे मी तुला का सांगतोय हे मला माहित नाही, बहुतेक तू माझ्या मुलाच्या वयाचा असावा म्हणून असावं. माझ्या निवृत्तीला आता ७-८ वर्षे झाली. चौकोनी कुटुंब, एक मुलगा अन एक मुलगी. मी नोकरी सांभाळली तर ह्यांच्या मम्मीने संसार अन ह्यांच्याकडे लक्ष दिलं. मुलांना कुठे कमी पडून दिलं नाही. मुलगी लग्न करून सासरी गेल्याला १० वर्षे झाली तर मुलगा सध्या अमेरिकेला असतो. मुलगी वरचेवर घरी येते, पण तिची नोकरी, मुले अन संसार हे सर्व करता तिची धावपळ होते, अन आता तर आल्या आल्या निघायची घाई करते. तिचा दोष काय करायचा, कुठे कुठे लक्ष देईल ती. मुलांनी शिकावं, मोठे व्हावं असे मनोमन वाटत होते, त्यात मुलगा हुशार म्हणून उच्चशिक्षण दिलं अन शिक्षण करून जो तो अमेरिकेला गेला तो अजून तिथेच रमलाय. पूर्वी म्हणायचा कि ३-४ वर्षे राहून मग परत येतो, मग लग्न करावं म्हणून पुन्हा विचार बदलला, नंतर सुनेने अमेरिका अनुभवावी म्हणून पुढे परतणे लांबले अन आता मुलगी झाल्यावर तिला इथलं वातावरण कसं झेपेल अशी चिंता त्याला लागली आहे. एकुलता एक मुलगा आमचा. रोज फोन करतो, बोलण होत, पण डोळ्यासमोर नाही ह्याची खंत वाटते.

एवढ्या मोठ्या घरात आम्ही दोघे, घर खायला उठते. का कुणास ठाऊक एक प्रचंड पोकळी निर्माण झाली आहे ह्या घरात. ह्याची मम्मी वरचेवर आजारी असते. रात्री अपरात्री उठते अन ह्याच्या आठवणीने ढसाढसा रडते. तिला समजावण्याचा प्रयत्न करतो पण आईचं मन तिचं, मला इतका शोक होतो तर त्या बिचारीचा काय दोष करू. महिन्याला इथे बँकेत डॉलर जमा होतात पण मुलाच्या स्पर्शाच्या उबेपुढे त्या डॉलरची उब काय कामाची. कधी गरज पडली तर शेजारच्या मुलाला बोलवायला लागते, कुणी नाही म्हणत नाही मदतीला, पण एकुलता एक मुलगा परदेशी ऐश्वर्यात असताना कुणाला मदतीला बोलवायला कसेतरीच वाटते. अजून किती वर्षे आम्ही जगणार माहित नाही, मनात विचार येतो उरलेल्या आयुष्यात मुला अन नातीसोबत भरलेल्या घरात राहायला मिळेल की नाही. हिने तर आता वेगळच खूळ घेतलाय डोक्यात, म्हणे उद्या परवा माझं काय झाल तर तोंड पाहायला तरी हा पोहचेल का? कधी कधी शांतपणे विचार गेला तर वाटते थोडा कमी शिकला असता तर जवळ राहिला असता, कमी चैन केली असती पण घर फुललं असतं. हिच प्रेशर, माझा डायबेटीस अन हि औषधे, का कुणास ठाऊक हा जवळ असता तर वाट्याला आली नसती.

तुमच्या सारखी तरुण मंडळी समोर येता तेव्हा तो डोळ्यासमोर उभा राहतो. कसं समजावू त्याला हा जन्म एकदाचं आहे, हे पप्पा-मम्मी एकदाचं येणार आहेत वाट्याला. एकदा गेले कि पुन्हा नाही येणार परत. मग कितीही डॉलर मोजले तर न आम्ही परतणार न उडून गेलेले क्षण. आयष्य म्हणजे पैसा, प्रमोशन, चैनीच जीवन अस थोडेच असते, जिथे नात्याचा ओलावा नाही, आपल माणूस जवळ नसल्याने डोळ्यात पाणी नाही, अशा जिण्याला काय आयुष्य म्हणायचं? मी हताश झालोय पण आशावादी आहे, तो येईल कायमचा परत आमच्याकडे. पुन्हा घर भरेल, बहरेल. त्याची आई शांतपणे झोपेल. त्याने यायलाच पाहिजे आता, त्याची आई अन मी कायमचे झोपी जाण्या अगोदर.

Great Bhet !!

अलीकडेच 'पिके' च्या सेटवर आमिरची भेट झाली. तसा तो २० वर्षापूर्वी रंगीलाच्या शुटींगच्या वेळी वांद्र्याला कोलेजसमोर भेटला होता. त्याने लांबून पाहून हलकेच स्मित केले. मी त्याच्या जवळ गेलो अन हस्तांदोलन केले अन विषय काढला. 'आमीरजी, 'सत्यमेव जयते' खूप आवडलं लोकांना, खूप अपेक्षा आहेत तुमच्या कडून आम्हाला, पण असे व्यवस्थेच्या बाहेर राहून व्यवस्था कशी बदलणार. तुम्ही नेतृत्व घ्या, युवा पिढी तुमच्या पाठीशी उभी राहील. किती प्रश्न आहेत देशापुढे'. आमिर हलकेच हसला अन म्हणाला, 'सचिन, बहोत आसान है, बहोत आसान है, सिम्पल फंडा है, आंख बंद करनेका और दिल पे हाथ रखकर बोलनेका, 'आल एज वेल, आल एज वेल', बस हो गया काम'. त्याच्या ह्या उत्तराने मी निराश झालो अन म्हटलं 'और जब आंख खुलेगी तो दिखाई देगा अपना देश, तुम्हारे पिके के पोस्टर जैसा 'नंगा' ! त्याने रागाने माझ्याकडे पाहिले, तसेच जसा अमिताभ केबीसीच्या सेटवर रागावला होता माझ्यावर. तशी अमिताभशी माझी भेट दुसऱ्यांदा, पहिल्यांदा कॅडबरीच्या जाहिरातीवेळी भेटला होता. तेव्हाच त्याला प्रश्न विचारणार होतो पण त्यांनी माझ्या हातात कॅडबरी दिले अन म्हटले, सचिनजी, कुछ मिठा हो जाये'. मग मी विचार केला उगाच गोड वातावरणात मिठयाचा खडा नको. पण मागे पुन्हा केबीसीच्या सेटवर संधी साधून आली होती. चाहत्यांच्या गरड्यात असूनही त्यांची नजर माझ्याकडे गेली अन त्यांनीच समोरून हाक दिली, 'सचिनजी, आजकल मिलते नही आप, हमसे कोई गुस्ताकी तो नही हुई', मी सरळ विषयालाच हात घातला. मी म्हटले आता लोकांना प्रश्न विचारणे पुरे झाले, आता देशासमोरील प्रश्न सोडवण्याची वेळ आली आहे, लोकांनी तुम्हाला भरभरून दिले आहे, आता तुम्हाला व्यवस्थेला प्रश्न विचारण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे, तुमच्या पदाचा, तुमच्या वजनाचा, तुमच्या प्रतिष्ठेचा लोकहितासाठी वापर केला पाहिजे'. त्यांनी माझ्याकडे मिश्किलपणे हास्य केले अन म्हटले, ''सचिनजी, कौन साला उस कीचड में हात दालेगा दोबारा. उफ तुम्हारे ये उसूल, ये आदर्श, इस सारे उसुलो को मिलाके एक वक्त कि रोटी भी नही बन सकती, आज मेरे पास बंगला है, गाडी है, बँक बलेंस है, क्या है तुम्हारे पास?', मी त्यांच्या अशा उत्तराने थोडावेळ चाट पडलो अन उत्तरलो, 'मेरे पास, मेरे पास 'भारतमाता' है, जो आज मदत के लिये पुकार राही है आपको! अमिताभ खजील झाला होता, त्या संवादाने आमच्यात एक अदृश्य 'दीवार' उभी राहिली होती, अगदी तशीच जेव्हा मी दीदीच्या घरून निराश मानाने परतलो होतो. गेल्या महिन्यात कामानिमिताने ऑफिसच्या कारने चर्चगेटला निघालो होतो, पेडर रोड वर अचानक गाडी बंद झाली. मी बाहेर येऊन गाडी नीट होण्याची वाट पाहू लागलो तर अचानक कानावर मंजुळ हाक ऐकू आली, 'सचिन भाऊ, सचिन भाऊ', मी मागे वळून पाहिले तर जवळच्या बिल्डींगच्या खिडकीत साक्षात गानकोकिळा उभी. मला म्हणाली, 'सचिनभाऊ, गाडी ठीक होईपर्यंत चहा घेऊन जा', मी ड्रायवरला सांगून इमारतीकडे वळालो. दीदीच्या घरात पाऊल टाकेपर्यंत चहा तयार झाला होता, घरात मंद आवाजात 'ये मेरे वतन के लोगो' हे दीदीने गायलेले गीत वाजत होते. चहात साखर नव्हती, पण दीदीच्या मंजुळ आवाजाने चहा गोड भासत होता. आता आयतीच संधी आली आहे हे पाहून मी सरळ विषयालाच हात घातला. 'दीदी, आज पर्यंत तुम्ही चित्रपटासाठी गळा वापरला, आता लोकांच्या प्रश्नांसाठी थोडा गळा काढा, खराब रस्ते, अपुरा पाणीपुरवठा, भ्रष्टाचार ह्याबद्दल थोडे बोला, प्रशासन नक्कीच हलेल, तुम्ही 'भारतरत्न' आहात, सरकार नक्कीच दखल घेईल अन जनतेला फायदा होईल,' माझे बोलणे शांतपणे ऐकून दीदी जागेवरून उठल्या अन खिडकीकडे वळल्या. मी सकारात्मक उत्तराची अपेक्षा बाळगून होतो, दीदी थोडा वेळ शांत होत्या अन मग मला म्हणाल्या,' सचिनभाऊ, तुमची कार ठीक झाली आहे, ड्रायवर शोधतोय तुम्हाला, तुम्हाला निघाले पाहिजे,'. मी समजायचे ते समजून गेलो अन जागेवरून उठलो. दरवाजात पोहचल्यावर क्षणभर थांबलो अन दीदीला म्हणालो, दीदी, जमलं तर ते 'ये मेरे वतन के लोगो' गाणे तितके बंद करा, शोभत नाही ते इथे'. दीदीने धाड्कन दरवाजा बंद केला. मला सल्लूने दरवाज्यावर मारलेल्या लाथेची आठवण झाली. वांद्र्याला एका अनाथाश्रमामध्ये जाण्याचा योग आला होता. मिशनरी सिस्टर्स तो अनाथाश्रम चालवीत होत्या. मी मुलांच्या खोलीकडे वळालो तर मुलांच्या घोळक्यात सलमान खेळत होता. मी पाहून न पाहिल्या सारखे केले. तर सलमानने जोरात हाक दिली, 'क्या मेंडीसभाई, कम से कम हात तो मिला'. मी म्हटले 'सल्लू, तू रस्त्यात दारू पिऊन लोकांच्या अंगावरून गाडी नेतोस अन येथे अनाथ मुलांच्या खांद्यावरून हात फिरवतोस, मला नक्की समजत नाही तुझ हे वागण'. सलमान माझ्याकडे पाहून गालात हसला, बहुतेक माझ्या अशा प्रश्नाने त्याला 'किक' लागली असावी. म्हणाला,' मेरे बारे में इतना मत सोचना, दिल में आता हू, समझमे नही', असं बोलून वेडेवाकडे चाळे करू लागला. मी शांतपणे त्याच्या कडे पहिले अन उलट उत्तर दिले, 'देश पे एक एहसान करना, कि देश पे कोई एहसान न करना', माझा हा डायलॉग त्याच्या जिव्हारी लागला, त्याने उद्वेगाने धाड्कन दरवाजावर लाथ मारली जी मला क्षणभर तेंडूलकरने शेन वार्नला हूकचा फटका मारल्यासारखी वाटली. आज तसा संध्याकाळी सचिन भेटणार आहे वानखेडेला, त्यालाही फैलावर घ्यायचं आहे थोडं. मोठ्या आशेने राज्यसभेवर पाठवलं आहे त्याला, सांगतोच त्याला दोन युक्तीच्या गोष्टी, म्हणतो त्याला 'लोकांच्या प्रश्नावर तिथे चौफेर फलंदाजी कर अन त्या गेंड्याच्या कातडीच्या राजकारण्यांची विकेट काढ, मग बघ कसे हिट विकेट होतील ते', उगाच गैरहजर राहून राज्यसभेची जागा कुजवू नकोस ती !!

'माणूस' बनायचं राहून जाते !!

'माणूस' बनायचं राहून जाते !!

गावात असतो तेव्हा मी 'बोळींजकर' असतो.
आगाशी, उमराळे अन नंदाखाल करांनी माझ्या गावाविषयी बोलले,
तर मी अस्वस्थ होतो, पेटून उठतो,
जशास तसे उत्तर देतो !!

गावाबाहेर पडतो तेव्हा मी 'कुपारी' बनतो.
 'दारू-बिर्याणी पाजली कि कुपारी मत फिरवतो' असे ऐकले कि माझे टाळके फिरते.
मी आगाशी, उमराळे अन नंदाखालकर मित्रांसमवेत निषेध व्यक्त करतो,
प्रसंगी बोलणाऱ्या ब्राह्मण, आगरी, वाडवळ जातीचा उद्धार करतो !!

समाजाबाहेर पडतो अन लोकल गाडीत चढतो तेव्हा मी 'विरारकर' होतो.
 डाऊन ला येणाऱ्या अन बोरीवली ला चढणाऱ्या प्रवाशाची 'आय-माय' एक करतो.
विरारच्या हक्कासाठी लढा देतो, प्रसंगी टोळी बनवून कायदा हातात घेतो !!

 मी अजून पुढे जातो अन दिल्ली मुंबई विमानात बसतो.
पुढे बसलेला अन मराठी पेपर वाचणारा प्रवासी माझे लक्ष वेधतो.
भय्या, गुजराती अन मारवाडी प्रवाशापेक्षा तो आपलासा वाटतो.
मी 'जय महाराष्ट्र' म्हणून त्यला मंद स्मित देतो !!

मी अजून झेप घेतो अन जगाला गवसणी घालतो.
गोऱ्या कातडीच्या 'जिनीवा' शहरात तो मला भारतीय वाटतो.
माझे देशप्रेम उचंबळून येते अन 'कहा से हो भाई' म्हणत मी विचारपूस करतो.
'मैं कानपूर से, और आप कहा से' म्हणत ग्लासाला ग्लास भिडते.
'सारे जहा से अच्छा हिन्दुस्था हमारा' गीत मनोमनी वाजते !!

मी असतो कधी बोळींजकर, कधी कुपारी, तर कधी विरारका छोकरा,
बनतो मी मराठी, कधी बनतो मी इंडिअन,
का कुणास ठाऊक 'माणूस' बनायचं राहून जाते,
'सारे विश्वची माझे घर' माझ्या पुस्तका पुरता उरते !!

सचिन मेंडीस

गुलमोहर !

गुलमोहर ..नुसते नाव समोर आले तरी मन मोहरून जाते. शाळेतल्या पटांगणातील गुलमोहराचे झाड हळूच आठवणीच्या खिडकीतून बाहेर डोकावते. ती भव्यता, ती सावली अन जोडीला लाल गर्द गुलमोहराच्या फुलांचा सडा मनाचे अंगण व्यापून टाकतो. कधी रस्त्यात, प्रवासात कुठे फुलांनी मोहरलेला गुलमोहर दिसला तर मन प्रसन्न होते. जगण्याला एक वेगळी उभारी मिळते. ऑफिस, संसार, धावपळ, तडजोडी ह्यांच्या पलीकडे जाऊन क्षणभर गुलमोहराच्या कुशीत विसावा घ्यावासा वाटतो. आठवणीचा गुलमोहर असा फुलतो की मग फुलतच राहतो.. आयुष्य मोहरून टाकतो अन नकळत चेहऱ्यावर गुलमोहरी गर्द केशरी छटा उमटून येते. पक्ष्यांचा किलबिलाट कानी वाजतो अन मनाच्या फांदीवर एक वेगळा ऋतू जन्म घेतो, पुन्हा गुलमोहर मनात रुजू लागतो अन हलकेच ओठी शब्द येतात ‘दूर असता तू ,क्षण वाटे प्रत्येक प्रखर ! तू येता अशी समीप ..मनी फुले मग गुलमोहर’!! सचिन मेंडीस

8 पिसेस ऑफ पिझ्झा !

'जास्त कपडे धुवायला काढू नका', तिने म्हटले. का बरे? तो म्हणाला. 'नाही, आपली काम वाली बाई २ दिवस येणार नाही'. कशासाठी? 'गणपतीसाठी २ दिवस नातवाला भेटायला मुलीकडे जाणार आहे, असे बोलली'. 'ठीक आहे, नाही काढत जास्त कपडे धुवायला', 'आणि, हो, तिला गणपतीसाठी ५०० रुपये देते, सणासाठी बोनस म्हणून'. 'कशाला, आता दिवाळी आलीच, तेव्हा देऊया',. 'नाही रे, गरीब बाई ती, हौशेने नातवाकडे जातेय तर तिलाही बरे वाटेल', अन ह्या महागाई मध्ये त्यांच्या पगारात कसा सण साजरा करणार ते'? 'तू ना, खूपच भावनिक होतेस', 'नाही रे, काळजी करू नकोस', मी आजचा पिझ्झा खाण्याचा बेत रद्द करते', सहज ५०० रुपये उडतील त्या ८ पावाच्या तुकड्यामागे', ती हसत बोलली. 'वा वा, फार छान, तू पण शहाणी आहेस', आपल्या तोंडचा पिझ्झा तिच्या ताटात'.

३ दिवसानंतर

 'काय मावशी, कशी झाली सुट्टी', त्याने कामवाल्या मावशीला विचारले. 'खूप छान झाली', ताईने ५०० रुपये दिले होते मला, सणाचा बोनस म्हणून',. 'मग जाऊन आली का नातवाकडे'? 'हो जाऊन आली, मस्त ५०० रुपये खर्च केले २ दिवसात'. 'म्हणजे काय केल नेमकं'? 'नातवासाठी बाजारातून १५० रुपयाचा ड्रेस घेतला अन ४० रुपयाची बाहुली, मुलीला छानपैकी ५० रुपयाचे पेढे घेतले, ५० रुपयाचा मंदिरात नैवद्य दिला, 60 रुपये रिक्षाभाडे, २५ रुपयाच्या मुलीला बांगड्या घेतल्या, ५० रुपयाचा जावईबापूसाठी बेल्ट अन उरलेले ७५ रुपये नातवाच्या हातात दिले'. तिने झाडू मारता मारता तत्काळ खर्च मांडला. '५०० रुपयात इतके काही', तो आश्चर्याने म्हणाला अन विचार करू लागला.

त्याच्या डोळ्यासमोर ८ तुकडे केलेला पिझ्झा उभा राहिला. तो एकटक कल्पनेतल्या पिझ्झाकडे पाहू लागला. एक एक तुकडा त्याच्या डोळ्यामध्ये घुसू लागला. त्या एक एक पिझ्झाच्या तुकड्याशी तो कामवाल्या बाईच्या सणावरील खर्चाशी तुलना करू लागला. पहिला तुकडा नातवाच्या ड्रेसचा, दुसरा पेढ्याचा, तिसरा तुकडा मंदिरातील नैवद्य, चौथा रिक्षाभाडे, पाचवा बाहुलीचा, सहावा मुलीच्या बांगड्याचा, सातवा तुकडा जावईबापूचा बेल्ट अन आठवा तुकडा नातवाच्या खाऊसाठी पैसे. पिझ्झा त्याच्या डोळ्यासमोर फिरू लागला, एका तुकड्या मागे दुसरा तुकडा, अन तुकड्यावरील ड्रेस, बांगड्या अन तिचा सण..... एका पिझ्झ्याची त्याला दुसरी बाजू आज दिसली होती. पिझ्झ्याचे ८ तुकडे त्याला काही शिकवून गेले होते, जगण्याचा अन खर्च करण्याचा नवीन अर्थ. सचिन मेंडीस

बा-बयशी भेट !!

बा-बयशी भेट !!

वसईतील कुपारी समाजाला फार मोठा इतिहास आहे, परंतु दुर्दैवाने तो दृक्श्राव्य स्वरुपात जतन झालेला नाही. आपल्या जुन्या चालीरीती, गाणी, जुने संदर्भ, समाजाला कलाटणी देणाऱ्या घटना ह्या फक्त मौखिक स्वरुपात जुन्या पिढीकडून नव्या पिढीकडे हस्तांतरित झालेल्या आहेत. मागच्या एक दशकाचा आढावा घेतल्यास इंटरनेट तंत्रज्ञानाने जग जवळ आणले आहे, परंतु त्या स्वरुपात जुन्या पिढीचे नव्या पिढीकडे होणारे ऐतिहासिक संदर्भाचे हस्तांतर कमी झालेले आहे. आपल्या कडे अनेक वडीलधारी मंडळी आहेत, ही मंडळी जो पर्यंत हयात आहेत, तोपर्यंतच जुना इतिहास त्यांच्याबरोबर राहील. पण पुढे काय?. ह्या वडीलधारी मंडळीकडून बरीच माहिती आपण जमवून येणाऱ्या पिढीसाठी लिखित किव्हा ध्वनीमुद्रित स्वरुपात साठवून ठेऊ शकतो. स्वातंत्र्यपूर्व काळातील वातावरण, तेव्हाची शेती, राहणीमान, लग्नसोहळे, दुष्काळ, रोगराई, भुताखेताच्या गोष्टी असा अनेक माहितीचा खजाना आपण त्यांच्याकडून मिळवू शकतो. सदर गोष्टीचा विचार करता सचिन मेंडीस व रॉजर रोड्रिग्ज ह्याने पुढाकार घेऊन आपल्या विविध गावातील 'बय-बाबा' च्या मुलाखती घेण्याचे ठरविले आहे. सदर मुलाखत विडीओ रेकोर्डिंग करून सोशल मिडियाद्वारे आपल्यापर्यंत पोहोचवली जाईल. ह्या कामी ‘स्वाभिमानी वसईकर संघटना' आर्थिक सहाय्य करणार आहे. दुर्दैवाने ह्या कुपारी समाजातून शेवटचे 'बय-बाबा' जेव्हा हे जग सोडून जाईल, तेव्हा एक मायेच पर्व संपलेलं असेल. अन मग एक न पचवता येणार अस्वस्थ सत्य अन एक प्रचंड पोकळी कधीही न भरून येणारी....!!

स्वाभिमानी वसईकर संघटना प्रायोजित 'बा-बयशी भेट' ह्या कार्यक्रमाचा पहिला भाग अलीकडेच शूट झाला. सकाळच्या रम्य प्रहरी केळीच्या बागांमध्ये बयच्या बरोबर गप्पा रंगल्या अन जुन्या अनुभवातून मन श्रीमंत होत गेले. कार्यक्रमाचा सूत्रसंचालक ह्या नात्याने बयला बोलते करणे, हे आयोजाकापुढे एक आव्हान होते, पण बयची उमेद अन बोलण्यातील सहजता कार्यक्रमाला एक वेगळ्या उंचीवर घेऊन गेली. 'मी शिकली असती तर एक शिक्षिका बनून आज पेन्शन घेत असती', हे त्या नव्वदीतल्या बयचे उद्गार थक्क करणारे. बोळींज-जापके येथील 'अनीबाई लोपीस' ह्या 'बा-बयशी भेट'च्या पहिल्या भागाच्या पाहुण्या. लवकरच येत आहे 'बा-बयशी भेट'चा पहिला विडीयो आपल्या भेटीला, आपल जीवन अन अनुभव समृद्ध करण्यासाठी. आपल्या गावातील बाबा किव्हा बयला येणाऱ्या कार्यक्रमात सामील करावयाचे असल्यास कृपया आमच्याशी संपर्क करावा.



स्वाभिमानी वसईकर संघटना

Thursday, August 21, 2014

एक विचार, एक कृती, एक बदल, एक आदर्श !!

एक विचार, एक कृती, एक बदल, एक आदर्श !! मागच्या दशकात आपली आर्थिक भरभराट झाली अन सर्वांची क्रयशक्ती वाढली. पूर्वी वर्षातून होणारी खरेदी २-३ महिन्यात किव्हा वरच्या वर होऊ लागली. नवीन कपडे, शूज, चपला, घड्याळे, मोबाईल व अनेक बाजारपेठेकडून माथी मारलेल्या वस्तू घरात येऊ लागल्या. पण नवीन वस्तू कपाटात पडत असताना त्याच वेगाने घरातील जुनी वस्तू काही बाहेर निघायचे नाव घेत नाही. मग काय, फक्त ढिगारा. कपड्यांचा, चपलांचा, मुलांच्या खेळण्यांचा अन अलीकडेच आणलेल्या पण नवीन वस्तूच्या तुलनेत जुन्या झालेल्या सामानांचा. नवीन फ्रीज घरात आलं तर जुने फ्रीज बाहेर टाकायला आईचा विरोध मग टाक ते वरच्या खोलीत. एखादे शर्ट कोणाला द्यायचे म्हटले तरी ती अलीकडेच घेतल्याची खंत, किती वेळा कपडे वापरले, त्याची किंमत, ब्रांड असा विचार करून मग अशे शर्ट कपाटात एका खाली एक लपत जातात. ना धड ते कुणाला दिले जातात ना धड वापरले जातात. वर्षाकाठी मोबाईल बदलत राहतात, नवीन घड्याळे येत राहतात पण जुना मोबाईल, घड्याळ घरातून बाहेर काढायला मन तयार होत नाही. मग येतो वस्तूंचा महापूर. जिकडे तिकडे ह्या अलीकडे घेतलेल्या अन वापरात नसलेल्या वस्तू साचत राहतात अन घरात जागा कमी पडू लागते. लहान मुलांसाठी आणलेल्या औषधांच्या बाटल्यांची पण तीच कथा. अर्धवट संपलेल्या बाटल्या शोकेस मध्ये किव्हा भिंतीच्या कोनाड्यात महिनोन महिने पहुडलेल्या असतात. पुन्हा कधी लागतील असा विचार करून ठेवलेली हि औषधे एकमेकांत हरवून जातात किव्हा लहान मुलांच्या बाबतीत जास्त हळवेपणा असल्याने आपण सरळ नवीन बाटलीच विकत घेतो अन घरात मेडिकल स्टोर तयार होते. तीच गोष्ट चपलांची. घरात ४-५ माणसे असतील तर प्रत्येकाचे २-3 बूट, चपला, लहान मुलांचे ५-६ जोड अन मग पावसाळ्यासाठी वेगळी पादत्राणे असा हा भला मोठा व्याप एका Stand पाशी जमतो, नवीन पादत्राणे येत राहतात पण जुनी जागची हलत नाही अन चुकून हललीच तर एका पिशवीत बंदिस्त होऊन वरच्या खोलीत भूमिगत होतात. सुरवातीला मला वाटायचं हे फक्त माझ्या बाबतीत घडते अन माझ्याच घरापुरता मर्यादित आहे पण घरोघरी मातीच्याच चुली असे हे चित्र आहे (काही अपवाद असू शकतात). तात्पर्य हेच कि नव्या वस्तूंचे इनकमिंग चालू असताना जुन्या वस्तूंचे आउटगोइंग चालू राहिले पाहिजे अथवा वस्तूंचे इनकमिंग मर्यादित असावे. आपल्या घरातील वापरात नसलेल्या चांगल्या वस्तू एकत्र करून गरीब गरजूंना दान देण्याची कल्पना कशी वाटते? बर्याच स्वयंसेवी संस्था अशा वस्तूंच्या शोधात असतात, जे ते दुर्गम भागात किव्हा गरीब वस्ती मध्ये वाटत असतात. आपल्या घरात पलंगाच्या कपाटात अनेक वर्ष दडून राहिलेले एखादे पांघरून रस्त्यावर झोपणाऱ्या कुणा निराश्रित व्यक्तीच्या कामी आले तर आपल्याला नक्कीच समाधान लाभेल, नाही का?

'सुशिक्षित' अन 'सुसंस्कृत'

जोगेश्वरीवरून अंधेरी डाऊन गेल्याने आज छानपैकी सीट मिळाली. गाडी अंधेरी पोहचताच क्षणात उड्या मारून प्रवाशी आत शिरले अन डबा प्रवाशांनी फुलून गेला. माझ्या समोर साधारण २८-३० वर्षाचा एक तरुण येऊन उभा राहिला. अंगात लुई फिलिपचा शर्ट, खिशाला महागडा माउंट ब्लांक पेन, एका हातात आय-फोन अन शरीराला उंची सुगंधी अत्तर असा एकूण हेवा वाटावा असा त्याचा पेहराव होता. गाडी सुरु झाल्यावर त्याने खिशातील हल्दीराम भूजीयाचे पाकीट बाहेर काढले अन काही वेळात त्याचा निकाल लावला. पाकीट रिते झाल्यावर त्याने थोडा पुढे येऊन ते पाकीट मोठ्या रुबाबाने खिडकीतून बाहेर फेकले. मी अवाक होऊन त्याच्या कडे पाहत राहिलो. त्याने केलेल्या 'त्या' कृतीने एकूणच त्याच्या अंगातील लुई फिलिपचा शर्ट, खिशातील माउंट ब्लांक पेन, हातातील आय-फोन अन शरीराला येणारा उंची सुगंधी ह्या सर्व श्रेष्ठ वस्तूंचा अक्षरशा: 'कचरा' करून टाकला होता. ज्या व्यक्तीचा काही क्षणापूर्वी हेवा वाटत होता, तो आता मला 'खुजा' जाणवू लागला होता. त्याच्या एका कृतीने 'सुशिक्षित' अन 'सुसंस्कृत' ह्या मधील फरक अधोरेखित केला होता. धन्य तो सुशिक्षित नव्या पिढीचा चेहरा !! सचिन मेंडीस

वेदना !

वेदना ! हे मी तुला का सांगतोय हे मला माहित नाही, बहुतेक तू माझ्या मुलाच्या वयाचा असावा म्हणून असावं. माझ्या निवृत्तीला आता ७-८ वर्षे झाली. चौकोनी कुटुंब, एक मुलगा अन एक मुलगी. मी नोकरी सांभाळली तर ह्यांच्या मम्मीने संसार अन ह्यांच्याकडे लक्ष दिलं. मुलांना कुठे कमी पडून दिलं नाही. मुलगी लग्न करून सासरी गेल्याला १० वर्षे झाली तर मुलगा सध्या अमेरिकेला असतो. मुलगी वरचेवर घरी येते, पण तिची नोकरी, मुले अन संसार हे सर्व करता तिची धावपळ होते, अन आता तर आल्या आल्या निघायची घाई करते. तिचा दोष काय करायचा, कुठे कुठे लक्ष देईल ती. मुलांनी शिकावं, मोठे व्हावं असे मनोमन वाटत होते, त्यात मुलगा हुशार म्हणून उच्चशिक्षण दिलं अन शिक्षण करून जो तो अमेरिकेला गेला तो अजून तिथेच रमलाय. पूर्वी म्हणायचा कि ३-४ वर्षे राहून मग परत येतो, मग लग्न करावं म्हणून पुन्हा विचार बदलला, नंतर सुनेने अमेरिका अनुभवावी म्हणून पुढे परतणे लांबले अन आता मुलगी झाल्यावर तिला इथलं वातावरण कसं झेपेल अशी चिंता त्याला लागली आहे. एकुलता एक मुलगा आमचा. रोज फोन करतो, बोलण होत, पण डोळ्यासमोर नाही ह्याची खंत वाटते. एवढ्या मोठ्या घरात आम्ही दोघे, घर खायला उठते. का कुणास ठाऊक एक प्रचंड पोकळी निर्माण झाली आहे ह्या घरात. ह्याची मम्मी वरचेवर आजारी असते. रात्री अपरात्री उठते अन ह्याच्या आठवणीने ढसाढसा रडते. तिला समजावण्याचा प्रयत्न करतो पण आईचं मन तिचं, मला इतका शोक होतो तर त्या बिचारीचा काय दोष करू. महिन्याला इथे बँकेत डॉलर जमा होतात पण मुलाच्या स्पर्शाच्या उबेपुढे त्या डॉलरची उब काय कामाची. कधी गरज पडली तर शेजारच्या मुलाला बोलवायला लागते, कुणी नाही म्हणत नाही मदतीला, पण एकुलता एक मुलगा परदेशी ऐश्वर्यात असताना कुणाला मदतीला बोलवायला कसेतरीच वाटते. अजून किती वर्षे आम्ही जगणार माहित नाही, मनात विचार येतो उरलेल्या आयुष्यात मुला अन नातीसोबत भरलेल्या घरात राहायला मिळेल की नाही. हिने तर आता वेगळच खूळ घेतलाय डोक्यात, म्हणे उद्या परवा माझं काय झाल तर तोंड पाहायला तरी हा पोहचेल का? कधी कधी शांतपणे विचार गेला तर वाटते थोडा कमी शिकला असता तर जवळ राहिला असता, कमी चैन केली असती पण घर फुललं असतं. हिच प्रेशर, माझा डायबेटीस अन हि औषधे, का कुणास ठाऊक हा जवळ असता तर वाट्याला आली नसती. तुमच्या सारखी तरुण मंडळी समोर येता तेव्हा तो डोळ्यासमोर उभा राहतो. कसं समजावू त्याला हा जन्म एकदाचं आहे, हे पप्पा-मम्मी एकदाचं येणार आहेत वाट्याला. एकदा गेले कि पुन्हा नाही येणार परत. मग कितीही डॉलर मोजले तर न आम्ही परतणार न उडून गेलेले क्षण. आयष्य म्हणजे पैसा, प्रमोशन, चैनीच जीवन अस थोडेच असते, जिथे नात्याचा ओलावा नाही, आपल माणूस जवळ नसल्याने डोळ्यात पाणी नाही, अशा जिण्याला काय आयुष्य म्हणायचं? मी हताश झालोय पण आशावादी आहे, तो येईल कायमचा परत आमच्याकडे. पुन्हा घर भरेल, बहरेल. त्याची आई शांतपणे झोपेल. त्याने यायलाच पाहिजे आता, त्याची आई अन मी कायमचे झोपी जाण्या अगोदर. सचिन मेंडीस

हे कुठे तरी बदलायला हवे !

परवा ट्रेन मध्ये उभा असताना डोक्यावरील पंखा अन लाईट बंद आढळले अन मित्राच्या वडिलांची आठवण झाली. ते रेल्वेत कामाला होते अन आता रिटायर्ड झाले होते. ते सकाळी ६ वाजता घरून कामावर निघायचे, जाताना वाडीतील भाजीपाला अन केळीची फुले घेऊन जायचे अन ११ वाजेपर्यंत घरी परतायचे. ते 'पासवाले' असतील अन दादरला माल विकायला जात असतील असा माझा तेव्हा गोड गैरसमज होता. जेव्हा ते सेवानिवृत्त झाले अन मित्राने मला सेवानिवृत्तीच्या निमित्ताने जेव्हा कार्यक्रम अन प्रीतीभोजनासाठी आमंत्रित केले तेव्हा त्याचे वडील रेल्वेत नोकरीला असल्याचे कळले. गेली चाळीस वर्षे ते भाजीपाला घेऊन जात असतं अन तो विकून झाल्यावर रेल्वे यार्ड मध्ये जाऊन सहीचा सोपस्कार पूर्ण करीत होते. त्यांच्या सेवानिवृत्तीच्या कार्यक्रमाला भेट दिल्यावर उगाचं तो 'सेवा' शब्द डोळ्याला अन मनाला खुपत होता. सेवानिवृत्तीच्या भाषणात त्यांच्या सेवेविषयी पाहुणे सुंदर फुले उधळत असताना मला का कुणास ठाऊक डब्यातील बंद असलेले पंखे अन डोळे मिटलेल्या ट्यूब लाईट डोळ्यासमोर येत होत्या. वाडीतील भाजीपाला तोडून तो मुंबईला नेण्याचे श्रम घेणारे असे व्यक्तिमत्व रेलेवेच्या सेवेबाबत असे कामचुकार का असा मनाला प्रश्न पडायचा. कधी कधी चांगली कामसू माणसेही सरकारी सेवेत 'दांड्या मारण्याच्या' 'पाट्या टाकण्याच्या' किव्हा 'लवकर पळण्याच्या' संस्कृतीत कसे रुळून जातात हे पाहून वैषम्य वाटले अन मग हीच संस्कृती त्यांच्या अंगवळणी पडून त्यांच्या जगण्याचा भाग बनून जाते असे जाणवले. काही वर्षापूर्वी एक दूरच्या नातेवाईकाला भेटण्याचा योग आला होता. केंद्र सरकारच्या कोत्यातरी खात्यात तांत्रिक विभागात तो 'चिकटला' होता. सहज बोलताना तो दिनक्रमाविषयी मोठ्या अभिमानाने बोलत होता. सकाळी गेल्यावर तासभर नाष्टा करणे मग २-३ तास काम, नंतर जेवण मग तासभर डुलकी अन मग घरी परतीचा प्रवास असा राजेशाही दिवस. पुन्हा घरी आल्यावर थोडा आराम अन मग गावात कुणाच्यातरी ओटीवर पत्ते कुटणे. २७-२८ वर्षे वय असलेल्या त्या तरुणाचे त्या उमेदीच्या काळातील जगणे पाहून पहिल्यांदा कीव अन नंतर चिंता वाटली. ज्या काळात ह्या तरुणाने मेहनत करावी, आपल्या कामातून कौशल्य शिकून पदोन्नती घ्यावी, त्या वयात ह्याने असा आळसपणा करावा हे जरा अतीच होते. श्रम न करता घरी येणारा पगार, अर्धा दिवस घरी असल्याने नकळत लागलेली व्यसने अन काम करण्याची इच्छा मरून गेल्याने शरीरात साचून गेलेला स्थूलपणा मला त्या तरुणाच्या बाबतीत चिंताजनक वाटला. दुर्दैवाने करिअर करण्याच्या थ्रिल पेक्षा घरी लवकर पळण्याचे थ्रिल त्याला जास्त ''किक' देत असावे, असो. सातासमुद्रा पार आपल्या ज्ञानाचा अन कौशल्याचा झेंडा रोवणारा आपला समाज अन त्याचं समाजात जगणारी अशी व्यक्तिमत्वे उगाचं मनाला सलत राहतात. ज्या समजातून अनेक लोक सरकारी सेवेत राहून सन्मानाने निवृत्त झाली, आपल्या कामाचा ठसा त्यांनी शासन दरबारी उमटवून दाखवला, सेवाकार्यात अनेक प्रशस्तीपत्रके मिळवून आपल्या समाजाच्या मुकुटात मानाचा तुरा खोवला, त्याचं समाजात असा प्रवृत्ती आनंदाने मिरवाव्या, ही थोडी शोकांतिका वाटली. हे कुठे तरी बदलायला हवे असे मनोमनी वाटते. रेलेवे, मुंबई महापालिका येथे चांगले काम करणाऱ्या आपल्या मंडळीचा हे आदर्श घेतील का? निदान तरुण पिढीने तरी !! सचिन मेंडीस

ग्रेट भेट अन चेकमेट !

ग्रेट भेट अन चेकमेट ! अलीकडेच 'पिके' च्या सेटवर आमिरची भेट झाली. तसा तो २० वर्षापूर्वी रंगीलाच्या शुटींगच्या वेळी वांद्र्याला कोलेजसमोर भेटला होता. त्याने लांबून पाहून हलकेच स्मित केले. मी त्याच्या जवळ गेलो अन हस्तांदोलन केले अन विषय काढला. 'आमीरजी, 'सत्यमेव जयते' खूप आवडलं लोकांना, खूप अपेक्षा आहेत तुमच्या कडून आम्हाला, पण असे व्यवस्थेच्या बाहेर राहून व्यवस्था कशी बदलणार. तुम्ही नेतृत्व घ्या, युवा पिढी तुमच्या पाठीशी उभी राहील. किती प्रश्न आहेत देशापुढे'. आमिर हलकेच हसला अन म्हणाला, 'सचिन, बहोत आसान है, बहोत आसान है, सिम्पल फंडा है, आंख बंद करनेका और दिल पे हाथ रखकर बोलनेका, 'आल एज वेल, आल एज वेल', बस हो गया काम'. त्याच्या ह्या उत्तराने मी निराश झालो अन म्हटलं 'और जब आंख खुलेगी तो दिखाई देगा अपना देश, तुम्हारे पिके के पोस्टर जैसा 'नंगा' ! त्याने रागाने माझ्याकडे पाहिले, तसेच जसा अमिताभ केबीसीच्या सेटवर रागावला होता माझ्यावर. तशी अमिताभशी माझी भेट दुसऱ्यांदा, पहिल्यांदा कॅडबरीच्या जाहिरातीवेळी भेटला होता. तेव्हाच त्याला प्रश्न विचारणार होतो पण त्यांनी माझ्या हातात कॅडबरी दिले अन म्हटले, सचिनजी, कुछ मिठा हो जाये'. मग मी विचार केला उगाच गोड वातावरणात मिठयाचा खडा नको. पण मागे पुन्हा केबीसीच्या सेटवर संधी साधून आली होती. चाहत्यांच्या गरड्यात असूनही त्यांची नजर माझ्याकडे गेली अन त्यांनीच समोरून हाक दिली, 'सचिनजी, आजकल मिलते नही आप, हमसे कोई गुस्ताकी तो नही हुई', मी सरळ विषयालाच हात घातला. मी म्हटले आता लोकांना प्रश्न विचारणे पुरे झाले, आता देशासमोरील प्रश्न सोडवण्याची वेळ आली आहे, लोकांनी तुम्हाला भरभरून दिले आहे, आता तुम्हाला व्यवस्थेला प्रश्न विचारण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे, तुमच्या पदाचा, तुमच्या वजनाचा, तुमच्या प्रतिष्ठेचा लोकहितासाठी वापर केला पाहिजे'. त्यांनी माझ्याकडे मिश्किलपणे हास्य केले अन म्हटले, ''सचिनजी, कौन साला उस कीचड में हात दालेगा दोबारा. उफ तुम्हारे ये उसूल, ये आदर्श, इस सारे उसुलो को मिलाके एक वक्त कि रोटी भी नही बन सकती, आज मेरे पास बंगला है, गाडी है, बँक बलेंस है, क्या है तुम्हारे पास?', मी त्यांच्या अशा उत्तराने थोडावेळ चाट पडलो अन उत्तरलो, 'मेरे पास, मेरे पास 'भारतमाता' है, जो आज मदत के लिये पुकार राही है आपको! अमिताभ खजील झाला होता, त्या संवादाने आमच्यात एक अदृश्य 'दीवार' उभी राहिली होती, अगदी तशीच जेव्हा मी दीदीच्या घरून निराश मानाने परतलो होतो. गेल्या महिन्यात कामानिमिताने ऑफिसच्या कारने चर्चगेटला निघालो होतो, पेडर रोड वर अचानक गाडी बंद झाली. मी बाहेर येऊन गाडी नीट होण्याची वाट पाहू लागलो तर अचानक कानावर मंजुळ हाक ऐकू आली, 'सचिन भाऊ, सचिन भाऊ', मी मागे वळून पाहिले तर जवळच्या बिल्डींगच्या खिडकीत साक्षात गानकोकिळा उभी. मला म्हणाली, 'सचिनभाऊ, गाडी ठीक होईपर्यंत चहा घेऊन जा', मी ड्रायवरला सांगून इमारतीकडे वळालो. दीदीच्या घरात पाऊल टाकेपर्यंत चहा तयार झाला होता, घरात मंद आवाजात 'ये मेरे वतन के लोगो' हे दीदीने गायलेले गीत वाजत होते. चहात साखर नव्हती, पण दीदीच्या मंजुळ आवाजाने चहा गोड भासत होता. आता आयतीच संधी आली आहे हे पाहून मी सरळ विषयालाच हात घातला. 'दीदी, आज पर्यंत तुम्ही चित्रपटासाठी गळा वापरला, आता लोकांच्या प्रश्नांसाठी थोडा गळा काढा, खराब रस्ते, अपुरा पाणीपुरवठा, भ्रष्टाचार ह्याबद्दल थोडे बोला, प्रशासन नक्कीच हलेल, तुम्ही 'भारतरत्न' आहात, सरकार नक्कीच दखल घेईल अन जनतेला फायदा होईल,' माझे बोलणे शांतपणे ऐकून दीदी जागेवरून उठल्या अन खिडकीकडे वळल्या. मी सकारात्मक उत्तराची अपेक्षा बाळगून होतो, दीदी थोडा वेळ शांत होत्या अन मग मला म्हणाल्या,' सचिनभाऊ, तुमची कार ठीक झाली आहे, ड्रायवर शोधतोय तुम्हाला, तुम्हाला निघाले पाहिजे,'. मी समजायचे ते समजून गेलो अन जागेवरून उठलो. दरवाजात पोहचल्यावर क्षणभर थांबलो अन दीदीला म्हणालो, दीदी, जमलं तर ते 'ये मेरे वतन के लोगो' गाणे तितके बंद करा, शोभत नाही ते इथे'. दीदीने धाड्कन दरवाजा बंद केला. मला सल्लूने दरवाज्यावर मारलेल्या लाथेची आठवण झाली. वांद्र्याला एका अनाथाश्रमामध्ये जाण्याचा योग आला होता. मिशनरी सिस्टर्स तो अनाथाश्रम चालवीत होत्या. मी मुलांच्या खोलीकडे वळालो तर मुलांच्या घोळक्यात सलमान खेळत होता. मी पाहून न पाहिल्या सारखे केले. तर सलमानने जोरात हाक दिली, 'क्या मेंडीसभाई, कम से कम हात तो मिला'. मी म्हटले 'सल्लू, तू रस्त्यात दारू पिऊन लोकांच्या अंगावरून गाडी नेतोस अन येथे अनाथ मुलांच्या खांद्यावरून हात फिरवतोस, मला नक्की समजत नाही तुझ हे वागण'. सलमान माझ्याकडे पाहून गालात हसला, बहुतेक माझ्या अशा प्रश्नाने त्याला 'किक' लागली असावी. म्हणाला,' मेरे बारे में इतना मत सोचना, दिल में आता हू, समझमे नही', असं बोलून वेडेवाकडे चाळे करू लागला. मी शांतपणे त्याच्या कडे पहिले अन उलट उत्तर दिले, 'देश पे एक एहसान करना, कि देश पे कोई एहसान न करना', माझा हा डायलॉग त्याच्या जिव्हारी लागला, त्याने उद्वेगाने धाड्कन दरवाजावर लाथ मारली जी मला क्षणभर तेंडूलकरने शेन वार्नला हूकचा फटका मारल्यासारखी वाटली. आज तसा संध्याकाळी सचिन भेटणार आहे वानखेडेला, त्यालाही फैलावर घ्यायचं आहे थोडं. मोठ्या आशेने राज्यसभेवर पाठवलं आहे त्याला, सांगतोच त्याला दोन युक्तीच्या गोष्टी, म्हणतो त्याला 'लोकांच्या प्रश्नावर तिथे चौफेर फलंदाजी कर अन त्या गेंड्याच्या कातडीच्या राजकारण्यांची विकेट काढ, मग बघ कसे हिट विकेट होतील ते', उगाच गैरहजर राहून राज्यसभेची जागा कुजवू नकोस ती !!

Wednesday, August 6, 2014

'स्नेल डिश' !!

'स्नेल डिश' !! गावातील पावसाळा शेतामधील गोगलगायी शिवाय पूर्ण होऊ शकत नाही. जमिनीवर किंवा गोड्या पाण्यात राहणाऱ्या बहुतेक गोगलगायी ह्या तशा संथ चालणाऱ्या अन गरीब जातीच्या प्राणी परंतु उपद्रवी असल्याने पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान करतात. लहानपणी शाळेत 'गोगलगाय बारशाला निघते अन लग्नाला पोहचते' अशा आशयाचा धडा होता. सहज बाजूला गेले तर शरीर आकुंचित करणारी ही बया 'गोगलगाय अन पोटात पाय' म्हणून ओळखली जाते. मागच्या वर्षी फ्रान्स मधील एका निसर्गरम्य गावात पर्यटनासाठी गेलेलो असताना 'स्नेल डिश' खाण्याचा अनुभव आला. युरोपिअन लोक तिखट पदार्थ खाणे टाळत जरी असले तरी 'स्नेल डिश' बर्यापैकी झणझणीत होती. विशेष म्हणजे कवचाच्या आत असलेला मृदू भाग खाण्यासाठी दोन वेगवेगळे चमचे दिलेले होते. एक चमचा गोगलगाय पकडण्यासाठी उपयोगी होता अन एक दोन दाताचा वेगळ्याच प्रकारचा चमचा अलगतपणे तिच्या पोटातून मांसाहारी भाग बाहेर काढण्यासाठी होता. तस पाहिलं तर खेकड्याच्या हातातील (फान्गुडे) मांस काढताना आपल्याला खूप परिश्रम घ्यावे लागतात, प्रसंगी घरातील पाटा-वरवंटा घ्यावा लागतो. पण ह्या चमच्यामुळे तोडफोडीची गरज पडली नाही. आता राहिला चवीचा भाग, काही जणाला गोगलगाय खाणे विचित्र वाटेल, पण चवी बाबतीत गोगलगाय खेकडा अन झिंगा ह्यानाही मागे टाकेल अस मला वाटते. गोगलगाय खात असताना बेडकाच्या मागच्या पायाची आठवण झाली. पूर्वी आपल्याकडे बेडकाच्या पायाचा सूप शक्तिवर्धक समजला जाई पण आता ते दिवस मागे राहिले आहेत. सहज फ्रेंच मित्राशी ह्याविषयी विचारपूस केली असता ते ही बेडकाच्या मागच्या पायाचे चाहते असल्याचे कळाले. वसईत आलेले पोर्तुगीज लोक ही आवड बऱ्याच देशांना देऊन आले तर नाही ना अशी शंका वाटते. सहज जुने फोटो पाहत असताना हा फोटो सापडला अन दोन शब्द लिहावेसे वाटले. टिप: गोगलगायींच्या काही जाती विषारी असतात त्यामुळे आपल्या इथे ह्या गोगलगायींचा खाद्य म्हणून उपयोग करीत नसल्याचे समजते.

'माणूस' बनायचं राहून जाते !!

'माणूस' बनायचं राहून जाते !! गावात असतो तेव्हा मी 'बोळींजकर' असतो. आगाशी, उमराळे अन नंदाखाल करांनी माझ्या गावाविषयी बोलले, तर मी अस्वस्थ होतो, पेटून उठतो, जशास तसे उत्तर देतो !! गावाबाहेर पडतो तेव्हा मी 'कुपारी' बनतो. 'दारू-बिर्याणी पाजली कि कुपारी मत फिरवतो' असे ऐकले कि माझे टाळके फिरते. मी आगाशी, उमराळे अन नंदाखालकर मित्रांसमवेत निषेध व्यक्त करतो, प्रसंगी बोलणाऱ्या ब्राह्मण, आगरी, वाडवळ जातीचा उद्धार करतो !! समाजाबाहेर पडतो अन लोकल गाडीत चढतो तेव्हा मी 'विरारकर' होतो. डाऊन ला येणाऱ्या अन बोरीवली ला चढणाऱ्या प्रवाशाची 'आय-माय' एक करतो. विरारच्या हक्कासाठी लढा देतो, प्रसंगी टोळी बनवून कायदा हातात घेतो !! मी अजून पुढे जातो अन दिल्ली मुंबई विमानात बसतो. पुढे बसलेला अन मराठी पेपर वाचणारा प्रवासी माझे लक्ष वेधतो. भय्या, गुजराती अन मारवाडी प्रवाशापेक्षा तो आपलासा वाटतो. मी 'जय महाराष्ट्र' म्हणून त्यला मंद स्मित देतो !! मी अजून झेप घेतो अन जगाला गवसणी घालतो. गोऱ्या कातडीच्या 'जिनीवा' शहरात तो मला भारतीय वाटतो. माझे देशप्रेम उचंबळून येते अन 'कहा से हो भाई' म्हणत मी विचारपूस करतो. 'मैं कानपूर से, और आप कहा से' म्हणत ग्लासाला ग्लास भिडते. 'सारे जहा से अच्छा हिन्दुस्था हमारा' गीत मनोमनी वाजते !! मी असतो कधी बोळींजकर, कधी कुपारी, तर कधी विरारका छोकरा, बनतो मी मराठी, कधी बनतो मी इंडिअन, का कुणास ठाऊक 'माणूस' बनायचं राहून जाते, 'सारे विश्वची माझे घर' माझ्या पुस्तका पुरता उरते !!

दिमाग कि कमाई !!

दिमाग कि कमाई !! मागच्या आठवड्यात बांद्रा कुर्ला संकुल येथील अमेरिकी दुतावासात विजासाठी मुलाखतीला जाण्याचा योग आला. मुलाखतीसाठी कागदपत्रे अन मोबाईल इतका ऐवज घेवून मी तिथे पोहचलो. अमेरिकी दुतावासात सुरक्षा व्यवस्था कडक असल्याने मोबाईल इमारतीमध्ये नेण्यास मज्जाव होता पण तिथे बाहेर भाड्याने लॉकर मिळतील अशा आशेवर मी घरून सोबत मोबाईल घेऊन गेलो. (आजकाल मोबाईल घरी सोडून मुंबईत जाणे एखाद्या निर्जन बेटावर जाण्यासारखे वाटते). सकाळी ९ वा.ची मुलाखत होती अन मी तिथे ८.३० ला पोहचलो. मुसळधार पाऊस सुरु होता, इमारतीबाहेर उभे राहण्यासाठी काही व्यवस्था नसल्याने छत्री असूनही अर्धे शरीर भिजून गेले होते. बाहेर लॉकरविषयी चौकशी केली पण इथे लॉकर उपलब्ध नाही असे ऐकायला मिळाले. आता मोबाईल ठेवायचा कुठे असा प्रश्न निर्माण झाला. आतमध्ये मुलाखतीसाठी गेलेल्या लोकांचे काही नातेवाईक बाहेर उभे होते त्यांना मोबाईल ठेवण्याची विनंती केली पण त्यांना लागलीच निघायचे असल्याने त्यांनी नकार दिला. मुलाखतीसाठी आत जाण्याची वेळ जवळ येत होती अन मोबाईल ची व्यवस्था होत नव्हती त्यामुळे मनाची घालमेल होत होती. दूर सायकलवर चहा विकणाऱ्या एका फेरीवाल्याकडे माझी नजर गेली, त्याच्याकडे जाऊन मी मोबाईल ठेवण्याची विंनती केली पण त्याने नकार दिला परंतु लांब उभ्या असलेल्या एका मारुती ८०० कारकडे बोट दाखवून तिथे जाऊन विचारायला सांगितले. मी तिथे जाऊन चौकशी केली तर लक्षात आले कि ती कार एक फिरते लॉकर बनवले गेले होते. बाहेर त्याचा एक माणूस लोकांमध्ये फिरून माझ्यासारखे गिर्हाईक आणण्याचे काम करीत होता. प्रत्येकी २०० रुपये घेऊन त्यातील एक मनुष्य एका पिशवीत आपले सामान ठेऊन एका वहीत सामान ठेवणार्याचे नाव व मोबाईल क्रमांक लिहून घेत होता. मी माझा मोबाईल व गाडीची चावी पिशवीत घालून त्याच्याकडे दिली व नाव व मोबाईल क्रमांक त्याला सांगितला. त्याने मला एक टोकन दिले व सामान परत घेतेवेळी ते टोकन परत करावयास सांगितले. त्याच्या त्या छोट्याश्या कारमध्ये सकाळच्या २ तासात सामानाच्या जवळजवळ ५० पिशव्या ठेवलेल्या आढळल्या व अजून अख्खा दिवस मुलाखतीसाठी लोक येणे बाकी होते. मी मनातल्या मनात हिशोब केला कि दिवसाला ह्याच्या गाडीत जर कमीत कमी ५० पिशव्या सामान ठेवण्यासाठी येत असतील तर ५० पिशव्या गुणिले प्रत्येकी २०० रु. प्रमाणे दिवसाची कमाई रुपये १०००० होती तीही गाडी न चालवता. महिन्याचा हिशोब केला तर २६ दिवस गुणिले प्रतिदिन १०००० रुपये म्हणजे जवळपास अडीच लाखाच्या आसपास त्या गाडीची उलाढाल होती. ३ लाखाची मारुती ८०० गाडी महिन्याला कुणाला अडीच लाख कमावून देत असेल ह्यावर कुणाचा विश्वास बसणार नाही, पण ज्याच्याकडे डोके आहे अन जो लोकांच्या गरजेचे रुपांतर आपल्या व्यवसायात करू शकतो त्याला मुंबईत पैसे कमावणे कठीण नाही हे मला त्या अनुभवातून शिकायला मिळाले. माझा हा अनुभव आपल्यालाही काही शिकवून जाईल म्हणून हा प्रपंच. बाकी कुणाची मारुती ८०० गाडी निकालात काढायची असेल तर धंद्याचा विचार करायला हरकत नाही.

मी 'मोठ्या' आनंदाच्या शोधात मरत राहिलो !!

स्टेशन वर उभ्या असलेल्या त्या दोन तरुणांत संवाद चालू होता. मी बाजूलाच उभा असल्याने ऐकायला येत होते. एकाच्या पगारात घसघशीत महिना ५०० रुपयाची वाढ झाली होती. त्या ५०० रुपयाच्या वाढीने त्याच्या चेहऱ्यावरील आनंद गगनात मावत नव्हता, तर दुसऱ्याने नालासोपारा पूर्वेला २०० चौरस फुटाची स्वतःची खोली घेतली होती. ती खोली किती ऐसपैस आहे, अन पाण्याचा सुद्धा कसा जास्त त्रास नाही, हे तो मोठ्या अभिमानाने दुसऱ्याला सांगत होता.

5०० रुपयाच्या पगार वाढीने सुखावणारी अन २०० चौरस फुटाच्या घरात आनंद घेणारी ही माणसे आपल्या सारख्या अनेक लोकांना बरेच काही शिकवून जातात. २००० चौरस फुटाचे बंगले, ऐसपैस अंगण, बटन दाबताच विहिरीतून २४ तास घरात येणारे पाणी अन आपल्याचं लोकांमध्ये जगण्याचं ऐश्वर्य अशा सुखसुविधा असणारी तशी आपण भाग्यवान परंतु 'अतृप्त' अन 'असमाधानी' माणसे, खंर म्हटलं तर स्टेशनवरील त्या दोन तरुणांपेक्षा मानसिक अन भावनिक दृष्ट्या आपण जास्त 'गरीब' म्हणून त्यांच्या बोलण्यातील श्रीमंती आपल्या वाट्याला येत नाही. अशी माणसे भेटतात म्हणून आयुष्यावर बघण्याचा दृष्टीकोन बदलत जातो. छोट्या छोट्या गोष्टीतून आनंद घेणारी अन देणारी ही माणसे म्हणून हेवा वाटावा अशीच !! ते 'छोट्या' दुनियेत आनंद घेत, जगून गेले, मी 'मोठ्या' आनंदाच्या शोधात मरत राहिलो !!

Wednesday, July 23, 2014

गंध चाफ्याचा !!

गंध चाफ्याचा !! काही माणसे सुगंधित असतात, त्यांच्या सहवासात आठवणीचा चाफा हळूच दरवळतो. अळवाच्या पानावर पाण्याचा थेंब साचून क्षणभर त्याचा मोती व्हावा तसा अशा माणसाच्या सहवासात क्षणाचे शिंपले मोती बनतात. अन जर अशी माणसे बुजर्ग म्हातारी असतील तर त्यांच्या सुरकुती पडलेल्या हाताच्या हळूच स्पर्शाने स्वर्गीय प्रेमाचा आनंद मिळतो. अशाच एका प्रेमळ अन मायाळू आजीला भेटण्याचा योग आला. माझ्या चुलत भावाची मामा कडची बय जिला सर्वजण प्रेमाने 'बाय' म्हणतात. लहानपणी आमच्या घरी यायची तेव्हा आवर्जून काही तरी खाऊ घेऊन यायची. तिने आणलेल्या खाऊपेक्षा तिच्या देण्यालाच जास्त चव होती. बऱ्याच वर्षात तिची भेट झाली न्हवती. आठवणीतल्या वहीत कोणत्या तरी पानात ती गुडूप झाली होती. आजच्या सोशल दुनियेच्या युगात आभासी लोकांना जवळ करणारी आमची पिढी अशा सुगंध देणाऱ्या माणसापासून अलिप्त झाली आहेत, ह्याचे क्षणभर शल्य वाटले. सहजच चुलतभावाशी विषय काढला अन मागच्या रविवारी त्याच्या मामाकडच्या बायला भेटण्याचा बेत ठरला. बाय तशी देखणी, गोरीपान, घारे डोळे. चाफ्यासारखी दिसायची अन चाफ्यासारखी सुगंधी दरवळायची ! मामाकडच्या ओटीवर चढून आतमध्ये डोकावले तर बाय बसलेली होती. हातात पांढऱ्या रंगाची रोजरी घेऊन तिची जपमाळ चालू होती. वयाची ८० पार केल्याने डोळे अन कान साथ देत न्हवते. चाफ्यासारख्या चेहऱ्यावर वार्धक्याच्या खुणा जमा झाल्या होत्या पण डोळ्यातील तेज बदलले न्हवते. चुलतभावाने तिला विचारले 'कोण आले आहे माझ्याबरोबर?. तर तिने डोळे किलकिले करून चेहरा आठवण्याचा प्रयत्न केला. कित्येक वर्ष तिची भेट न झाल्याने ती बहुदा ओळखणार नाही असे वाटले होते, पण तिने मला ओळखले. पण तिला नाव काही आठवत न्हवते. जवळ घेऊन तिने आपुलकीने चौकशी केली. 'तुवा दरी का हाय' असा तिचा प्रश्न म्हणजे मला लेकरे किती असा सरळ सोपा होता. आम्ही मोठे झालो, शिक्षण झाले अन मार्गी लागलो याचा आनंद तिच्या चेहऱ्यावर दिसत होता. आयुष्यात आलेल्या मोठ्या संकटाना सामोरी जाऊन पुन्हा उभी असलेली बाय मनात अजून फुलत गेली. मी तिची आठवण काढून तिला भेटायला आलो ह्याचा तिला हर्ष झाला. 'मी घरी असते पण तुम्ही कामात असता त्यामुळे तुम्हाला वेळ मिळत नाही, त्यामुळे तुमची काय तक्रार करणार ' असे जेव्हा ती म्हणाली तेव्हा नकळत हृदयाला काटा टोचला अन शल्य वाटले. वेळ नाही ह्या सबबीखाली सोन्यासारखी माणसे दुरावलेली आमची उच्चशिक्षित पिढी, काय कामाची. तिचा निरोप घेत असताना पुन्हा तिच्या सुरकुतलेल्या हाताचा दैवी स्पर्श झाला अन २५ वर्षापूर्वी तिने हातात दिलेल्या गाठ्याच्या पुडीचा वास क्षणभर आठवणीच्या कप्प्यातून बाहेर आला. अंगणात पायात चपला चढवत असताना ओटीपर्यंत सोडायला आलेली बाय मनात पुन्हा पुन्हा साचत गेली. हातात रोजरी घेऊन इतरांसाठी प्रार्थना करणाऱ्या आपल्या ह्या वात्सल्यमुर्ती आपल्याला मिळालेल्या ईश्वरी देणग्या आहेत. आपल्या आसपास असे चाफे असतील तर जरून त्यांच्या भेटीला जा. तेही फुलतात अन आपल्यालाही फुलवतात. जीवन सुगंधित करण्यासाठी अन क्षणाला मोती बनवण्यासाठी त्याची भेट अन संवाद जरुरी आहे !!

Wednesday, July 16, 2014

फिल्मी दुनियेत करिअर!

सकाळी Facebook ह्या व्यासपीठावर पोस्ट चाळत असताना ग्राहम गोन्साल्वीस ह्या तरुणाची पोस्ट वाचनात आली. पोस्ट सोबत टाकलेला फोटो 'प्रोफेशनल' वाटला अन पोस्टची उत्सुकता वाढली. त्याने स्वतःने लिहिलेला, संगीतबद्ध केलेला अन गायलेल्या गीताचा त्यात उल्लेख होता. या अनोळख्या तरुणाने हौशेखातर काही केलं असेल अस वाटून पुढची पोस्ट वाचण्याचा विचार केला पण एका अनामिक उत्सुकतेने पुन्हा त्याने दिलेली लिंक गाठली अन त्याने निर्मित केलेले 'तेरा दिवाना' हे गीत ऐकले. आश्चर्य म्हणजे इतका प्रतिभा असलेला तरुण इतके दिवस कुठे लपला होता असा मनात विचार आला. दर्जेदार गीतरचना, रोमांटिक संगीत अन त्याला साजेसा प्रेमळ आवाज असा त्रिवेणी मिलाफ ह्या गीतात अनुभवयास मिळाला. मुंबई म्हणजे हिंदी चित्रपट सृष्टीचे माहेरघर. संपूर्ण भारतातून अनेक तरुण तरुणी नशीब कमवण्यासाठी ह्या मायावी दुनियेत येतात अन चमकतात. आपल्याला मुंबई शहर इतके जवळचे असूनही आजपर्यंत आपला सेवीन तुस्कानो सोडला तर कुणीही करिअर दृष्टीने ह्या फिल्मी दुनियेचा विचार केला नाही. ग्रामीण महाराष्ट्रातून मुंबईत येऊन नाव कमावलेले अनेक मराठी कलाकार मुंबईत आहेत पण आपले बबन गुरुजी अन अब्राहम अंकल सारखे दर्जेदार कलाकार ह्या हाकेच्या अंतरावर असलेल्या दुनियेपासून दूरच राहिले, हि एक खंत आहे. ग्राहम गोन्साल्वीस सारख्या उमद्या कलाकारला पाहून त्याच्या प्रतिभेला सलाम करावासा वाटतो, पण त्याच बरोबर ह्या फिल्मी दुनियेत त्याने पदार्पण करून नावारूपाला यावं अस मनोमन वाटते. अंनसन तुस्कानो सारखा अजून एक तरुण प्रतिभावान संगीतकार आपल्यामध्ये आहे, ह्याची जाणीव खूप कमी लोकांना आहे. उपजत कलागुण असूनही नोकरी न करता ह्या मायावी सृष्टीत संघर्ष करून करिअर करण्याची मानसिकता आपल्या समाजात नाही हे वास्तव फार मोठे आहे परंतु अशा तरुणांना शक्य तेवढी मदत करून त्यांना प्रोत्साहन देणे आपली सामाजिक गरज आहे. चित्रपट व जाहिरात क्षेत्राशी प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या संबंधित असलेल्या आपल्या वसईतील लोकांनी चांगले नेटवर्किंग करून एकमेकांना संधी उपलब्ध करून दिल्यास आपल्या गावतील चेहरा नक्कीच चित्रपट सृष्टीत पाहायला मिळेल ह्याची मला खात्री वाटते. ह्या क्षेत्रात आवड असणार्या व करिअरसाठी धडपड करणाऱ्या सर्व तरुण मंडळीना शुभेच्छा !! सचिन मेंडीस

एक उभरता संगीतकार !!

एक उभरता संगीतकार !! Anson A. Tuscano हा आपल्यामधील तरुण गायक अन संगीतकार. काही महिन्यागोदर माझी त्याच्याशी ओळख झाली. संगीताविषयी असलेली त्याची जाण अन आवड मला खूपच भावली. सहजच मी लिहलेली 'छेडतात तारा मनाच्या' ही कविता त्याच्याकडे संगीतबद्ध करायला दिली तर ह्या पठ्ठ्याने सुंदर चाल देऊन स्वतच्या आवाजात एक अप्रतिम गीत तयार केले. मी लिहिलेल्या कवितेवर इतके सुंदर गीत बनू शकते ह्यावर माझा विश्वासच बसला नाही. ह्या तरुणाचे भविष्य उज्ज्वल आहे ह्यात शंका नाही. आपण हे गीत ऐका अन आम्हाला प्रतिक्रिया कळवा. (ह्या गीताचे सर्व हक्क Anson A. Tuscano ह्याकडे आहेत) https://www.youtube.com/watch?v=EKtWEPmAXvU&feature=youtu.be

उठा अन उभे राहा, नवीन स्पर्धा जिंकण्यासाठी !!

आयुष्य हि एक स्पर्धा आहे. ह्या स्पर्धेत प्रत्येकाला यशस्वी व्हावेसे वाटते. आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर आपल्याला संघर्ष करावा लागतो. काही वेळेला ठरवलेले उद्दिष्ट समोर असूनही काही गोष्टी चुकतात अन पदरी अपयश येते. मन निराश होते, एकटेपणा वाटतो, हरल्याची-मागे पडल्याची भावना निर्माण होते. आपल्याबरोबर जे होते ते आपल्या पुढे गेले हे पाहून नैराश्य येते, उगाचच आपण दुसऱ्याशी तुलना करीत आपले प्रयत्न सोडून देतो. प्रसंगी टोकाचा निर्णय घेतो. हे प्रत्येकाच्या बाबतीत घडते, त्याला कुणी अपवाद नाही, फक्त यशाची परिमाणे अने व्याख्या व्यक्तिपरत्वे बदलतात किव्हा वेगवेगळ्या असतात. काही वेळेला आपण अपयशातून उठण्याचा प्रयत्न करतो, जवळच्या माणसाचा आधार मागतो. काही वेळेला जवळचे उठायला मदत करतात तर काही वेळेला आपण पडल्याचाच आनंद आपल्याच लोकांना होतो. अपयश हि यशाची पहिली पायरी समजली जाते. यशाचा मार्ग अपयशातून जातो फक्त पुन्हा उठून यशाच्या प्राप्तीसाठी धावण्याची मानसिकता तयार झाली पाहिजे. आज आपल्या समोर उभे असलेले अनेक यशस्वी व्यक्ती ह्या अनुभवातून गेलेले आहेत. त्यांनी प्रयत्न सोडले नाहीत म्हणून ते यशस्वी झाले. आपण ही पराभवावर मात करून यशस्वी होऊ शकतो, फक्त जिद्द अन चिकाटी हवी. काल सकाळी माझा ट्रेन मधील मित्र जोएल डाबरे ह्याने मला हा प्रेरणादायी विडीओ दाखवला अन क्षणभर डोळ्यात पाणी उभे राहिले. शरीर साथ न देताही धाव पूर्ण करण्याच्या दुर्दम्य शक्तीने धावणारा धावपटू जितका प्रेरणादायी आहे तितकाच त्याच्या पाठीवर मायेचा हाथ ठेवणारा अन त्याला धावायला मदत देणारा 'तो' मनुष्य ही तितकाच मार्गदर्शक आहे. आपण जर अपयशाचा सामना करीत असाल तर त्या धावपटूला नजरेसमोर ठेवा अन जर आपण सुशेगात असाल तर उठून प्रयत्न करणार्यांचे मार्गदर्शक बना. या विडीओ मधील धावपटूला धावायला मदत देणारा 'तो' मनुष्य खूपच महत्वाचा आहे. कळत नकळत आपण अडचणीत असलेल्या व्यक्तीपासून नामनिराळे राहतो, माहित नसल्यासारखे करतो तर प्रसंगी अडचणीत सापडलेल्या व्यक्तीच्या वेदनेतून असुरी आनंद शोधण्याचा प्रयत्न करतो. हि मानसिकता आपल्या सोडावी लागेल. आपण जर खाली पडले असाल तर उठा अन उभे राहा, नवीन स्पर्धा जिंकण्यासाठी !! अन जिंकले असाल तर पुढे या, इतरांना जिंकायला मदत करण्यासाठी !! http://www.youtube.com/watch?v=kZlXWp6vFdE

Tuesday, June 10, 2014

आडसळ' !!



'आडसळ' हा शब्द ऐकला तरी पटकन हसू येते. हा शब्द खूप विनोदी वाटत असला तरी मला त्या विषयी एक सुप्त आकर्षण अन मनापासून सहानभूती आहे. 'आडसळ' हे विशेषण आपल्या बोली भाषेत नारळाच्या संबंधात वापरले जाते. नारळाच्या उपयुक्ततेनुसार शहाळाचे पाणी देणारी अवस्था तर पूर्ण वाढ झाल्यावर मिळणारे खोबरे हि अवस्था उपयोगाची समजली जाते. ह्या दोन्ही अवस्थेच्या मध्ये अर्धवट असलेला बिनकामाचा नारळ म्हणजे 'आडसळ'. शहाळाचे पाणी प्यायला नारळ फोडावा अन तो 'आडसळ' निघावा असा अनुभव ज्याला येतो त्याचे दुक्ख: त्यालाच माहित.

नारळाला दिलेले हे विशेषण मग आपण माणसाला का वापरतो?. अमुक अमुक व्यक्ती 'आडसळ' आहे, अस आपण सहज बोलून जातो मग त्या मागचे तर्कशास्त्र कोणते? ती व्यक्ती अर्धवट? त्याच विशिष्ट परिस्थितीत त्याच वागण बिनकामाच? 'तो ना साफसूफ 'आडसळ' नाळ हाय' असा कादोडी भाषेत शेरा ऐकताना त्या 'आडसळ' व्यक्तीच कोणत चित्र पुढे येत?. चला कुठून तरी माझ्या कानी पडलेली दोन उदाहरणे बघू.

एका चर्चमध्ये धर्मगुरूला लग्नाच्या मिस्साला मिस्सा संपायच्या अगोदर वाजणाऱ्या फटाक्याचा खूप त्रास व्हायचा, जे रास्त होत. एके दिवशी त्या धर्मगुरूने लग्नाचा मिस्सा संपायच्या अगोदर एक गुगली टाकली. त्यांनी म्हटले, 'आता बघा, काही तरुण बाहेर मिस्सा चालू असताना फटाके फोडतील अन मिस्साचे पावित्र्य भंग करतील. अन हे कोण करतील माहित आहे का?, जे 'आडसळ' असतील तेच करतील'. झाले, धर्मगुरूचा नेम बरोबर लागला होता, फटाके फोडण्याच्या तयारीत असलेल्या त्या मुलांना आपण 'आडसळ' नसल्याच सिद्ध करण्यासाठी फटाके न वाजवणे भाग होते अन तेच धर्मगुरूला हवं होत. त्या दिवशी फटाके वाजले नाहीत. मन विचार करू लागले, कोण असतात हि मुले? उत्साही, सांगकाम्या टाइपची, नवरा घरून निघून लग्नलावेपर्यंत फटाक्याची तिजोरी हातात घेऊन फिरणारी. हीच ती मुले आनंदाने निरागसपणे फटाके फोडणारी अन दुसर्याकडून स्वता:ला 'आडसळ' म्हणवून घेणारी.

दुसर उदाहरण पाहू, सोयरिक होऊन जावईबापू पहिल्यांदाच सासुरवाडीला गेले होते. पाहुणचार म्हणून अंड्याचे चार तुकडे, पाव किलो तळलेले कोंबडीचे पीस, अन पाव किलो मिठाई जावईबापूच्या पुढे ठेवली होती. तसे जावईबापू खाण्याच्या बाबतीत त्यांच्या गावात कुप्रसिद्ध होते पण सासुरवाडीपर्यंत हा लौकिक पोहोचला न्हवता अन त्यात मध्यस्थाला दोष देणे हि अति झाले असते. जावईबापूला २४ तास भूक लागलेली, तशी भूक हि माणसाची मुलभूत प्रेरणा आहे पण स्थळ-काल वेळ पाहून भुकेचे नियमन करणे खूप गरजेच असते. तर झाले असे कि जावईबापूने प्लेटला जो हात घातला तो शेवटी प्लेट शून्य होईस्तोवर काढला नाही. सासूबाई जावईबापूला 'प्लेटला हात लावा' बोलायला उभी होती पण दुर्दैवाने तिला ती संधी मिळाली नाही. दुसऱ्या बाजूला हातात टॉवेल घेऊन उभी असलेली त्याची वाग्दत वधु आपल्या भावी पतीचे कुंभकरणीय रूप बघून अचंबित झाली होती. एवढा नाश्ता केल्यावर जावईबापू कमी जेवतील असा सासरेबुवाने केलेला भोळा अंदाज नंतर जावईबापूने चुकीचा ठरवला होता. जे व्हायचे होते तेच झाले, जावईबापू निघून गेल्यावर मुलीने हंबरडा फोडला, 'मला त्या 'आडसळ' मुला बरोबर सोइरिक ठेवायची नाही', असे निक्षून सांगून 'वन डे' सामन्याचा निकाल लावला. भुकेचे नियमन करणे कठीण केल्याने जावईबापूने सामना सुरु होण्यापूर्वीच विकेट गमावली होती अन 'आडसळ' असल्याचे परमवीरचक्र मिळवले होते.

दोन्ही उदाहरांतील व्यक्ती 'आडसळ' म्हणून गणली गेलेली असली तरी त्यांच्या व्यक्तीत्वामध्ये एक निरागसपणा होता. दुसर्यांच्या लग्नात फटाक्यांची हमाली करणारा व काळ-वेळ न पाहता आपल्या भुकेचे नियमन न करणारा, ह्या दोन्ही व्यक्ती म्हणजे तसे निष्पाप जीव. आजच्या ढोंगी गर्दीत मुखवटे घालुन फिरणाऱ्या लोकांत त्यांचा थोडाच निभाव लागणार होता. आजचा जमाना पोटात एक अन ओठात दुसरे असा जगण्याचा बनला आहे त्यामुळेच मुखवटे न घालू शकणारे बहुतेक समाजाच्या दृष्टीने 'आडसळ' ठरत असावेत किव्हा कोणत्या प्रसंगी कसे वागावे ह्याची जाणीव न ठेवता स्वतचे हसे करून घेणारे 'आडसळ' ह्या व्याखेत बसत असावेत. आपल्याला कधी कुणाला 'आडसळ' म्हणावे वाटले होते काय? आपल्या दृष्टीने 'आडसळ' कोण?.

(टीप: 'आडसळ' हा शब्द कुठून अन कसा आला ह्याचा कुतूहलापोटी मी शोध घेतला अन माहिती मिळाली कि 'ज्यातून पाण्याने भरलेले शहाळे निघेल असा अख्खा न सोललेला नारळ म्हणजे 'अडसर वा 'आडसर', ज्याचा आपल्या बोली भाषेत 'आडसळ' असा अपभ्रंश झाला व पुढे ह्या शब्दाचा मजेशीरपणे एखाद्या व्यक्तीला चिडवण्यासाठी वापर होत गेला.)

© सचिन मेंडीस
.

'ते' हरले 'आपण' जिंकलो !!



लोकसभा निवडणुकीच्या मतदानाचा दिवस. एकाच गावातले दोन धडाडीचे तरुण मतदान केंद्राच्या बाहेरील दोन वेगवेगळ्या गटाच्या बूथवर बसले होते. एकाच्या नातेवाईकाचे व्यावसायिक हितसंबंध 'विरार'कडे असल्याने त्याने अंगात पिवळा टि-शर्ट परिधान करून तो शिटीसेनेत काम करीत होता. तर दुसरा तरुण काहीही करून 'शिटी' पाडायची असा निश्चय करून ह्यावेळेला भाजपचे 'कमळ' फुलवण्यासाठी मोदीमय झाला होता.

जसजसी मतदान केंद्रावर गावातील मतदाराची पाऊले सरकत होती तसतशी ह्या दोन तरुणांच्या नजरेमधील खुन्नस वाढत होती. कसाही करून आपलाच उमेदवार जिंकणार अशा अविर्भावात दोघे बूथवर फिरत होते. एकाच गावातील असूनही त्यांचे पाठीराखे तरुण सम प्रमाणात त्या दिवसापुरता का होईना 'भगवे' अन 'पिवळे' असे वाटले गेले होते. कुणी वयस्कर मतदार बूथच्या जवळ येताना दिसला कि दोघेही त्यांच्या कडे धाव घ्यायचे अन त्यांना आपल्या उमेदवाराला मत द्यायला विनंती करायचे. 'दादे, आपला मत शिटीला दयासा हा, वरणे ६ वा बटन', पहिल्याचा विनंतीचा सूर.तर दुसरा 'दादे, आपले दुकाने फोडले ता कहा भाहयासा, ह्यावेळेला कमळ दादे'. पुन्हा एकदा एकमेकावर नजरानजर अन खुन्नस. दोनी बाजूने आवाज अन एकेमेकांचा उद्धार.

दुपार जवळ आली होती तसं तशी गर्दी कमी होत गेली. तरुण पोरांचे पोटे भुकेले होती. शिटीच्या बूथवरील तरुणाने पटकन गरमागरम वडे अन पेप्सी मागवली. ते पाहून दुसर्या बूथवरील कमळवाल्या तरुणाने समोसा अन कोकाकोला मागवून घेतले. शीतपेय पोटात जात असताना एक वेगळेच शीतयुद्ध दोन गटात सुरु झाले होते. एकाच गावातील एकत्र खेळणारी तरुण मुले त्या दिवशी वाटली गेली होती. कमळ वाला तरुण आपल्या स्मार्ट फोनवरून फेसबुक वर आपल्या गावच्या ग्रुपवर आपल्या बूथवरील गर्दीचे फोटो अपलोड करीत होता तर शिटी वाला तरुण गावातल्या वॉटअप्प्स ग्रुपवर पिवळी गर्दी शेर करीत होता. पुन्हा एकदा एकमेकावर नजरानजर अन खुन्नस.

पूर्ण दिवसभर दोन्ही बाजूने आवाज अन एकेमेकांचा उद्धार. एकदा सायंकाळ झाली अन शिटी अन कमळ चे बूथ थंड झाले अन एकाच गावातले दोन पक्षीय गट घराकडे निघाले. बूथवरील आवरा आवर करून ते दोघेही धडाडीचे कार्यकर्ते आपल्या गाड्या घेऊन गावाच्या दिशेने निघाले. जाताजाता दोघात शाब्दिक बाचाबाची सुरु होती. '१६ मे ला बळीराम ची 'शिटी' पडणार असा टोमणा कमळ वाल्याने दुसर्याला मारला तर दुसर्याने '१६ मे ला 'कमळ' बुडून चिंतामण 'चिंतामग्न' होणार असा प्रतिटोला लगावला. पुन्हा एकदा एकमेकावर नजरानजर अन खुन्नस. एका गावातले शालेय सवंगडी दोन पक्षात वाटले गेले होते. एका निवडणुकीने दोघात एक भिंत उभी राहिली होती.

दोघांच्या गाड्या गावात आत शिरल्या अन थोडे पुढे जाणार तोच समोरच्या घरच्या ओटीवर एका बाईचा किंचाळण्याचा आवाज आला. झोपाळ्यावर खेळणारे तिचे ६ वर्षाचे लेकरू तोल जाऊन रस्त्यावर पडलेले दोघांना दिसून आले. दोघांच्या गाड्या जागच्या जागी थांबल्या. एकाने धावत जाऊन त्या मुलाला उचलून घेतले तर दुसर्याने ताबडतोब जाऊन बर्फ आणले व मुलाच्या डोक्यावर धरले. त्या मुलाच्या डोक्यातून रक्त वाहत होते अन त्याला तत्काळ हॉस्पिटलला नेणे गरजेचे होते. 'शिटी' वाल्याने त्याची गाडी सुरु केली अन 'कमळ' वाल्याने तत्काळ त्या मुलाला खांद्यावर घेतले अन तो शिटी च्या पाठीशी गाडीवर बसला अन गाडी वेगाने हॉस्पिटल कडे निघाली. दोघात उभी राहिलेली भिंत आता पडली होती. 'भगव्यात' 'पिवळा' रंग विरघळून दोघानाही खराखुरा 'कुपारी' रंग चढला होता. त्या मुलाला वेळीच उपचार मिळाल्याने गंभीर प्रसंग टळला होता.

हॉस्पिटल मध्ये बाहेर उभे असताना एकाने जाऊन मस्त कोकच्या थंडगार बाटल्या आणल्या अन एक बाटली दुसऱ्याच्या हातात दिली. दोघांनी एकेमेकांना चिअर्स करून बाटली तोंडाला लावली अन एकत्र फोटो घेऊन फेसबुकवर गावच्या ग्रुपवर अपलोड केले. फेसबुक वर पोस्ट केलेल्या फोटोवर एकामागून एक कमेंट येत होत्या अन सर्वांचा सूर होता ' We are one ' . आता १६ मे पर्यंत निकालाची वाट पाहण्याची गरज न्हवती, मतदानाच्या दिवशीच निवडणुकीचा निकाल लागला होता. दोन्ही राजकीय पक्ष हरले होते अन 'कुपारी गावकरी' बिनविरोध निवडून आले होते.

सचिन मेंडीस

आठवणी आंब्याच्या !!


Sachin Mendes 4:48pm May 8
आठवणी आंब्याच्या !!

सचिन मेंडीस ©

मे महिन्याची सुट्टी अन आंब्याचे खूप जवळचे असे नाते आहे. सुट्टीच्या दिवसात आंब्यासोबत वेळ न घालवलेला व्यक्ती आपल्या समाजात शोधून हि सापडणार नाही. १९९८०-९० च्या वर्षात शाळेत असणाऱ्या मुलांनी आपली अख्खी उन्हाळी सुट्टी या ना त्या प्रकारे आंब्याच्या आसपास व्यतीत केली आहे त्यामुळेच आंब्याच्या आठवणी प्रत्येकाच्या तितक्याच मधुर अन रसाळ आहेत.

तसं पाहिलं तर हिवाळा संपत आला कि आंब्याच्या झाडावर मोहर येऊन त्याचा सुगंध आसमंतात दरवळत असे अन मग मोहरलेल्या झाडावरून एखादे 'किरमुट' शोधण्यासाठी बच्चेकंपनी मेहनत करीत असे. जस जसा उन्हाळा जवळ येई तसं तसे आंब्याचे झाड आंब्याने व्यापून जाई. साधारण मार्च महिन्यात बऱ्याचशा झाडाला कैऱ्या लागलेल्या दिसत असतं अन त्याची आंबट गोड चव तोंडाला पाणी आणत असे. आम्ही कधी कधी अभ्यासाच्या नावाखाली वाडीत केळीच्या भागात चटई टाकून अभ्यासाला बसत असू. तसा अभ्यास कमी अन घरून आणलेल्या मीठ मसाल्या बरोबर कैऱ्या खाणे हा उद्योग जास्त चालत असे. थोडक्यात अभ्यास हा 'बाय-प्रोडक्ट' असायचा. मधेच कैरीतून निघालेली बी म्हणजे 'कोय' भविष्यातील नवरी शोधण्यासाठी लागू पडायची. दोन बोटात कोय धरून ती उडवायची अन ज्या दिशेला ती पडेल त्या दिशेला असलेल्या गावातली मुलगी नवरी मिळेल अशी चर्चा चालायची. ३६० अशांत कोय फेकून सगळ्या दिशा पालथ्या घातलेल्या माझ्या गावातील एका मित्राला अजूनही 'अठ्वारा' राहायची वेळ का आली, हा संशोधनाचा विषय आहे. कधी बेत जमलाच तर आंब्याची 'चटणी' व्हायची. त्यात साखर, मीठ, मसाला, गोडेतेल अन काळी चिंच घातली जायची अन मस्त पैकी केळीच्या पानावर ती वाटली जायची. घरून चटणी साठी सामान आणताना मला नेहमी 'गोडेतेल' आणायला का सांगितले जात होते त्याचे अर्थशास्त्र मोठेपणी कळाले तेव्हा माझे मलाच हसू आले.

आमच्या गावातील वाडीत शेजारच्या ब्राह्मण व्यक्तीची जागा होती. त्याला आम्ही 'दामूची वाडी' म्हणत असू. त्या वाडीतील कैऱ्या चवीला गोड अन आकाराने मोठ्या होत्या. दुपारच्या वेळेत त्या वाडीतील माणसे जेवायला घरी गेली कि आम्ही त्या वाडीवर गनिमी पद्धतीने चढाई करत असू, कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त आंबे पाडण्याच्या हिशोबाने आम्ही त्या वाडीच्या आसपास अगोदरच दगडाची सोय करीत असू. एक दोन मुले कुणी येते का याची टेहळणी करत असतं अन तेव्हाच मोठ्या प्रमाणात झाडावर दगडाचा मारा होत असे अन काही मिनिटात २०-२५ आंबे हातात येऊन मोहीम फत्ते होत असे. कधी कधी टवाळखोर मुले 'दामू आलो दामू आलो' अशा खोट्या बोंबा मारून सगळ्यांची पळता भुई थोडी करत असतं. आमच्या गावाच्या मधोमध एका घराच्या पाठीमागे एक गोड कैऱ्याच झाडं होत परंतु त्या झाडाखाली पूर्वजांचा साप (ज्याला मराठीत भुजंग अन आपल्या बोली भाषेत 'खेत्रो' म्हणतात)असल्याची वंदता असल्याने आम्ही इच्छा असूनही त्या झाडाच्या वाटेला जात नसू.

परीक्षा संपत येत असताना त्याच हंगामात आंबे पिकायला सुरुवात होत असे. गावातील प्रत्येक आंब्याच्या झाडाला विशिष्ट असे नाव होते. त्यामध्ये तोतापुरी, गीटी, धारणी, काळी आंबा अशी माझ्या परिचयाची नावे. आमच्या गावातला गीटी आंबा खूप प्रसिद्ध होता. साधारण लाडूच्या आकाराचे आंबे त्याला लागायचे, पण 'मूर्ती लहान अन कीर्ती महान' असाच त्याचा लौकिक होता. पण दुर्दैवाने त्या झाडाची उंची खूप जास्त असल्याने फक्त ठराविक मुलांनीच मारलेले दगड तिथे पोहचत असतं. बाकीच्या वयाने लहान मुलांना नैसर्गिक रित्या वारयाने पडणाऱ्या आंब्यावर समाधान मानावे लागे. दुर्दैवाने मी जेव्हा जेव्हा पडलेले आंबे शोधायला जाई तेव्हा अगोदरच काही मुले तिथे पोहोचलेली असतं. जणू काही झाडावरून पडलेले आंबे उचलण्याचा ठेका त्यांनी घेतलेला असावा. काही वेळेला पक्षांनी चोच मारलेले आंबे सापडत असतं जे त्या आंब्याच्या स्थितीवरून ठेवायचे कि फेकायचे ते ठरविले जाई. कधी कधी झाडाखालील दूर कचऱ्यात एखादा पडलेला आंबा दृष्टीस पडायचा परंतु लहान असल्याने तिथे जाण्याची भीती वाटत असे, अन मग तो आंबा मिळवण्यासाठी एखाद्या वयाने मोठ्या असलेल्या मुलाला एक चावा देण्याच्या अटीवर प्रासंगिक करार करून तो आंबा मी मिळवीत असे, ज्याचे अप्रूप काही वेगळेच. बरयाच वेळेला एखाद्या झाडावर एखादा गर्द पिवळा आंबा आढळत असे ज्याला आम्ही 'बुलबुल' म्हणत असू. असा आंबा मिळवण्यासाठी अख्खी दुपार दगडांचा मारा त्या दिशेने होत असे. ज्याच्या दगडाने तो आंबा पडत असे त्याला स्वयंवरात एखादी राजकुमारी मिळवल्याचा आनंद वाटत असे. काही वेळेला कच्चे आंबे पडून ते पेंढ्यात खालून पिकविले जात परंतु जी मजा झाडावर पिकलेल्या अन दगडाने पाडलेल्या आंब्यात होती ती घरी पिकविलेल्या आंब्यात नक्कीच न्हवती.

पावसाळ्यात लागणाऱ्या लोणच्याची तयारी म्हणून बरीच मंडळी मे महिन्यात अंगणात दुपारच्या उन्हामध्ये खाटेवर मीठ लावून आंब्याच्या फोडी वाळत घालत असतं. अशा मीठ लावून रेडीमेड खाण्यासाठी तयार असणाऱ्या फोडीवर डल्ला मारणे जास्त अवघड नसे. कारण नसताना उगाच जाता येता दोन दोन फोडी उचलून प्रत्येक जण आपली सोय करत असे.

एक वर्षी आमच्या गावातील बच्चेकंपनीला क्रिकेटसाठी काही साहित्य आणायचे होते. आमच्या क्रिकेट मंडळाची आर्थिक स्थिती बेताचीच असल्याने काही हुशार मुलांनी दूरच्या वाडीतली आंब्याची झाडे खाली करून ते विकून आलेल्या पैशातून क्रिकेट साहित्याची सोय केली होती. आजच्या घडीला BCCI ने IPL सारखे टुकार खेळ भरवण्यापेक्षा ह्या बाबतीत आमचा आदर्श डोळ्यासमोर ठेवावा :-)

आज मागे वळून आंब्याच्या आठवणी जाग्या करताना बदललेल्या परिस्थितीची जाणीव होते. नवीन घरासाठी जागा म्हणून बहुतेक गावातील आंब्या चिंचेच्या झाडाचा बळी गेलेला आहे. जे उरलेली आंब्याची झाडे आहेत त्याची दाखल घेणारी पिढी आज राहिली नाही. आंब्याच्या झाडावर दगड मारणारी मुले आता कमावते पालक झालेली असून त्यांच्या मुलांच्या वाट्याला मार्केट मधील महागडा हापूस आला आहे जो धुऊन कापून अन साल काढून त्यांच्या पुढ्यात ठेवला जातो. खरंच काळ किती बदलला. माणसे बदलली, मुलांची खेळण्याची अन जगण्याची साधने बदलली. कधी कधी उगाच वाटते कि मे महिन्यात हीच आंब्याची झाडे वर्षोन वर्षे त्यांच्या पायायी येऊन आंबे लुटणाऱ्या मुलांची वाट पाहत असतील का? अशा अचानक तुटलेल्या नात्यामुळे त्याचे जगणे कोरडे झाले असेल का? त्यांच्या अंगणातील हरवलेला मुलांचा किलबिलाट त्यांना असह्य करत असेल का? पुन्हा येईल का मोहर तसाच त्या दुरावलेल्या आंब्यांना अन रुजेल का नवीन झाडं नवीन पिढीच्या जीवनात त्यांच्या असण्याच? मला खात्री नाही, पण बघू या काय काय होते ते येणाऱ्या काळात.

सचिन मेंडीस©

विहीर

'जो बात विहीर में थी वो स्विमिंग पूल में कहा'? शाळेत असताना वार्षिक परीक्षा संपल्या कि पहिली धाव घ्यावयास वाटे ती गावतल्या विहिरीवर. एक तर एप्रिलचा महिना. अंगाची लाहीलाही वर इतके दिवस इच्छा नसताना अभ्यास करण्यासाठी घरात डांबून घ्याव लागे ते वेगळंच. शाळेतून घरी आल्यावर घाईघाईत जेवण करून धाव मारायची ती विहिरीकडे. पाण्याचा अंदाज घेऊन वरून मस्त विहिरीत उडी मारून शरीर मनोसोक्त डुंबवून घेतलं कि मन प्रस्सन होत असे. आमच्या गावातील विहीर प्रचंड मोठी. 'वाळूवर' नावाच्या वाडीत चिंचा अन आंब्याच्या सावलीत उठून दिसणारी. अतिशय चांगल्या प्रतीच्या दगडाने स्वातंत्र्यपूर्व काळात बांधली असल्याने तीच रूप अन रुबाब अवर्णनीय असंच होत. दुपार झाली कि गावातली संपूर्ण बच्चे कंपनी 'वाळूवर' खेळायला जात असत. विहिरीवर मनोसोक्त अंघोळ करणे, नवीन शिकाऊ मुलांना केळीच्या खोडाने किव्हा प्लास्टिक ड्रम वापरून पोहायला शिकवणे तसेच नवशिक्याला बुडवून त्याची टर खेचणे हे नित्याचे उद्योग. कधी कधी बुडी मारून तळातली माती काढण्याची पैज लागे अन 'दम' असलेल्या मुलाची दमदार कामगिरी रोमांचित होऊन पाहायला मिळे. काहीजण विहिरीला ५-६ प्रदक्षिणा घालून आपली ताकद आजमावून पाहत असत जे खरचं प्रेरणादायी वाटायचं. बर्याच वेळेला विहिरीत असलेले साप (नानेटी अन दिवाड) पोहण्याची मजा हिरावून घेत असत. पोहताना चुकून हे साप बाजूला येवून चुंबन घेतील अशी भीती वाटत राहायची. विहिरीतील पकडापकडीचा खेळ खूपच कठीण. त्यातल्या त्यात पाण्याखाली दम धरणाऱ्या मुलांना पकडणे फारच जिकीरीचे. पण हा खेळ खेळताना कस लागायचा अन व्यायाम हि मस्त व्हायचा. मे महिन्याच्या शेवटी जेव्हा पाणी खाली जायचे तेव्हा विहिरीच्या पायथ्याशी असणार्या झऱ्यामधून येणाऱ्या पाण्याची चव किती गोड अन तहान भागवणारी. जसं जसा पावसाला जवळ यायचा तसा विहिरीत झावळ्या टाकल्या जायचा जेणेकरून त्या भिजवून नंतर त्या वळण्यासाठी तयार व्हायच्या अन मग विहीर पोहण्यासाठी कमी पडायची. आज तुरळक प्रमाणात अशा पोहण्यायोग्य विहिरी मागे राहिल्या आहेत. ज्या आहेत त्याची सुद्धा डागडुजी न झाल्याने त्या धोकादायक बनल्या आहेत. वेळ काळ बदलली तशी विहिरीची जागा क्लोरीनयुक्त स्विमिंग पुलाने घेतली पण 'जो बात विहीर में थी वो स्विमिंग पूल में कहा'? आठवणीच्या विहिरीत, मन रमते आज फार ! पुन्हा फिरुनी घ्यावी डुबकी, अंग भिजवावे गारगार !

आपल्यात वाद नको .




सध्या लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने फेसबुकच्या ह्या व्यासपीठावर वेगवेगळी मते व वयक्तिक शेरेबाजी निदर्शनास येत आहे. आपण सर्व सुशिक्षित अन हक्काच्या बाबतीत जागरूक असल्यामुळे आपल्या सर्वाचे एक विशिष्ट राजकीय मत आहे अन सर्वांनी एकमेकांच्या मताचा आदर राखला पाहिजे, असे मला वाटते.

भिन्न राजकीय विचारसरणीचे लोक वेगवेगळ्या उमेदवाराच्या समर्थनार्थ लिखाण करीत असतना काही वेळेला वयक्तिक दोषारोप करतात, जे योग्य नाही. काही मूठभर लाभार्थी सोडले तर आपल्या समाजाचा मुख्य शत्रू कोण आहे, हे आपल्या सर्वास ठाऊक आहे, त्यामुळे आपापसात मतभेद करून आपली शक्ती अन एकता व्यर्थ घालण्यापेक्षा ह्या निवडणुकीचा फायदा घेऊन आपल्या शत्रूला कसे चारी मुंड्या चित करू शकू ह्या दिशेने आपण प्रामाणिक प्रयत्न केले पाहिजे.

निवडणुका येतात अन जातात परंतु गाव पातळीवर निर्माण झालेले मतभेद उगाच पुढे कटुता निर्माण करतात व आपल्या ऐक्यास बाधा आणतात. आपण 'कुपारी' म्हणून एक कुटुंब आहोत अन अडी-अडचणीला 'एक कुपारी समाज' म्हणून एकमेकांना मदत करीत आलेलो आहोत व भविष्यातहि आपल्या गावात आपणच एकमेकांच्या अडचणीत एकमेकांचे सोबती राहणार आहोत. उद्या गावात एखादा तातडीचा प्रसंग निर्माण झाल्यास पहिला मदतीला धावून येणारा आपला 'कुपारी शेजारी' असेल, आपल्यासाठी दिल्लीहून सोनिया, मोदी, केजरीवाल अन बळीराम येणार नाहीत हे ध्यानात ठेवा. गरज नसताना एकमेकावर होणारी वयक्तिक चिखलफेक टाळून आपण येणाऱ्या काळात 'एक कुपारी कुटुंब' म्हणून एकत्र राहिले पाहिजे अन आपल्या मुख्य शत्रूच्या विरोधात मतदान करण्यसाठी सज्ज झाले पाहिजे.

सचिन मेंडीस

Palghar loksabha


Sachin Mendes 7:07pm Apr 16
पालघर लोकसभा निवडणूक: आपले मत कुणाला?

लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजल्या पासून ही निवडणूक देशपातळीवर चर्चेची तितकीच उत्सुकतेची झालेली आहे. ह्या मध्ये देशभर झालेले घोटाळे, लोकांची वाढलेली साक्षरता हे घटक जेवढे कारणीभूत आहेत तितकीच प्रसिद्धी माध्यमामुळे विशेष करून सोशल मीडियामुळे निवडणूक घराघरात पोहचली आहे. आपल्या समाजाचा विचार करता स्थानिक पातळीवरील ग्रामपंचायत अन पंचायत समितीच्या निवडणुकीपासून दूर राहणारा आपला युवावर्ग मोठ्या जोशामध्ये निवडणुकीच्या चर्चेमध्ये सहभागी होताना दिसत आहे. आपल्या युवा वर्गाला राजकारणाविषयी उत्सुकता निर्माण करण्यामध्ये जितका सोशल मीडियाचा वाटा आहे त्यापेक्षा कित्येक पटीने जास्त अलीकडच्या काळात आपल्या हक्कासाठी आंदोलने करणाऱ्या अन विधानसभा निवडणुकीत वसईत ऐतिहासिक राजकीय परिवर्तन घडवून आणणाऱ्या स्वाभिमानी तरुणाईची भूमिका आहे. कुणी कितीही नाकारले तरी समाजाच्या हक्कासाठी राजकीय चळवळीत भाग घेऊन व्यवस्था परिवर्तन करण्याचे किंबहुना सत्तेतील शुक्रचार्यावर अंकुश ठेवण्याचे व तरुण पिढीच्या राजकीय जाणीवा प्रगल्भ करण्याचे कार्य स्वाभिमानी तरुणांनी नक्कीच केले आहे.

काही दिवसा अगोदर पालघर लोकसभा मतदारसंघ निवडणुकीसाठी कॉंग्रेस, भाजपा अन बहुजन विकास आघाडी अशा तीन मोठ्या राजकीय पक्षामध्ये खरी चुरस होती. राज्यमंत्री राजेंद्र गावित ह्यांच्यासारख्या चांगल्या प्रतिमेच्या तरुण मंत्र्याला कॉंग्रेसने बहुजन विकास आघाडीविरोधात उमेदवारी दिल्याने वसईतील ख्रिस्ती लोकांत एक चांगला संदेश गेला होता. मागील काही वर्षात सरकारी पातळीवर विविध कामासाठी त्यांनी आपल्या समाजाला वेळोवेळी मदत केल्याने व महापालिकेतून गावे वगळण्यासाठी सरकार दरबारी आपल्याला पूरक अशी भूमिका घेतल्याने स्वाभिमानी वसईकर संघटनेने सर्व प्रमुख कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन राजेंद्र गावित ह्यांना व कॉंग्रेस पक्षाला पाठींबा दिला होता परंतु राजकारण हे अनपेक्षित असते ह्याचा प्रत्यय आपल्याला कॉंग्रेस पक्षाने आपला उमेदवार माघारी घेऊन व बहुजन विकास आघाडीच्या उमेदवाराला पाठींबा देऊन दाखवून दिला.
जिथे साक्षात मुख्यमंत्र्यांच्या पसंतीला केराची टोपली दाखऊन त्यांची व राज्यमंत्री राजेंद्र गावित ह्यांची मानहानी केली गेली तिथे तालुका पातळीवर काम करणाऱ्या आपल्या संघटनेच्या निर्णयावर टिप्पणी करणे तसे विशेष नव्हते. काही मंडळीनी 'स्वाभिमानी' तोंडघशी पडली अशी चर्चा रंगवून असुरी आनंद व्यक्त केला, परंतु वसईतील प्रस्तापित पक्ष निद्रिस्थ असताना ठाकुरांच्या 'अरे' ला 'कारे' असे ठणकावून सांगण्याचा निर्भीडपणा ह्याच तरुणांनी दाखवला होता हे विसरता कामा नये. निर्णय चुकतील म्हणून ते न घेणाऱ्या निष्क्रिय मंडळीपेक्षा धाडशी निर्णय घेउन समाजाचे नेतृत्व करण्याची धमक असणार्या तरुणाची आज समाजाला खरी गरज आहे. अपरिहार्य परिस्थितीमुळे घेतलेले निर्णय चुकीचे जरी वाटत असले तरी निर्णय घेणारेच समाजाला दिशा देतात हेच शाश्वत सत्य आहे.

सद्य स्थितीत कॉंग्रेस पक्षाने आपला उमेदवार मागे घेतल्याने काही अंशी वसईतील ख्रिस्ती समाजापुढे काहीसा पेच उभा राहिला आहे. आम आदमी पार्टी आणि मार्क्सवादी पक्ष जरी रिंगणात असले तरी खरी लढत हि भाजपा अन बहुजन विकास आघाडी ह्यात होणार आहे हे सांगण्याची गरज नाही. देशपातळीवर भाजपा पक्षाला सलग्न असलेल्या संघटनेचा इतिहास अल्पसंख्याकाच्या बाबतीत तितका चांगला नाही ते वास्तव आहे, ज्याची प्रत्यक्ष झळ वसईतील ख्रिस्ती समाजाला कधीही पोहचली नाही. दुसर्या बाजूला विचार केल्यास वसई-विरार परिसरात बहुजन विकास आघाडीच्या नेत्यांनी नेहमीच आपल्या समाजाला धर्माच्या नावावर टार्गेट केले आहे. आपल्या समाजाची दुकाने फोडणे, वाघोलीसारख्या ठिकाणी घरात घुसून आपल्या लोकांना मारहाण करणे, आपल्या समाजाच्या जमिनी बळकावणे असे अलीकडच्या काळात घडलेले अमानुष प्रकार विसरणे कदापि शक्य नाही. त्यामुळे वसईपुरता स्वार्थी विचार केल्यास आपला मुख्य शत्रू बहुजन विकास आघाडी हा असून वसईला ह्या गुन्हेगारी शक्तीपासून वाचवण्यासाठी निवडून येणाऱ्या सशक्त उमेदवाराला पाठींबा देणे गरजेचे आहे असे मला वाटते. वसईतील ख्रिस्ती समाजापुरता विचारकरता भारतीय जनता पक्षाला जरी आपण जातीयवादी मानत असलो तरीही इतिहास तपासून पाहिल्यास आपल्या समाजाकरिता खरा जातीयवादी पक्ष हा बहुजन विकास आघाडी हाच असून भावी पिढीला त्याच्या एकछत्री आव्हानापासून दूर ठेवण्यासाठी व वसईच्या दीर्घ हितासाठी बहुजन विकास आघाडीची राजकीय ताकद कमी करणे हेच आपले ह्या घडीला पहिले लक्ष्य असले पाहिजे. ह्या निवडणुकीत बहुजन विकास आघाडीला जर यश मिळाले तर त्याचे परिणाम येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या ३ जागेवर निश्चित पडतील व दुर्दैवाने त्यांच्या हाती अमर्यादित राजकीय सत्ता येवून महराष्ट्राच्या राजकारणात त्यांची उपयुक्तता अन उपद्रवमूल्य वाढेल व त्यांचे भीषण परिणाम वसईच्या राजकीय-सामाजिक समाजमनावर होतील. जर खरेच असे झाले तर मागील २५ वर्षाप्रमाणे विरोधकांचे खच्चीकरण होऊन वसईला ओरबाडण्याचे काम त्यांच्या लाभार्थीकडून अखंडपणे चालत राहील व आपल्या पुढील पिढीला आपल्या सारखाच संघर्ष करण्यावाचून पर्याय उरणार नाही. काही मंडळीचा आम आदमी पार्टीकडे भावनिक ओढा जरी दिसून आला तरीहि जिंकण्याची क्षमता नसणाऱ्या 'आम आदमी पार्टीच्या उमेदवाराला होणाऱ्या मतदानामुळे ख्रिस्ती मताचे ध्रुवीकरण होवून त्याचा फायदा अंतिमता बविआला होणार आहे त्यामुळे ख्रिस्ती पट्ट्यातून आपल्याला मते मिळत नसतील तर ती भाजपकडे न वळता आप कडे कशी वळतील ह्याची गनिमी नीती छुप्या पद्धतीने बविआ कडून आखली जात आहे.

राजकारणात बदलत्या परिस्थितीत आपले साध्य साधण्यासाठी उपलब्ध असणार्या वेगवेगळ्या पर्यायाचा विचार करून कमीत कमी नुकसान करणारे निर्णय घेणे महत्वाचे ठरते, त्यामुळे काही वेळेला भावनेला मुरड घालून व्यावहारिक पातळीवर निर्णय घेणे गरजेचे असते. सद्य परिस्थितीत बहुजन विकास आघाडीचा पाडाव करून त्याची तालुक्यावरील राजकीय पकड कमी करण्यासाठी त्या पक्षाचा पाडाव करण्याची क्षमता असणार्या पक्षाला मत देणे राजकीय दृष्ट्या शहाणपणाचे ठरेल असे मला वाटते. भविष्यात आपले स्वतचे घर जाळले जाण्याची शक्यता असताना जाळणाऱ्याचा बंदोबस्त करायचे सोडून कोसो दूर असणाऱ्या समधर्मी समाजावरील कल्पित हल्ल्याची भीती बाळगणे अन त्या भीतीतून घरच्या शत्रूचा पाडाव करण्यासाठी सक्षम असणाऱ्या उमेदवारला रोखणे आपल्या वसईतील समाजाकरिता आत्मघाती ठरू शकेल. प्राप्त परिस्थितीत देशातील वातावरण पाहिल्यास भारतीय जनता पक्षाला आघाडी मिळण्याची शक्यता अधिक असून आपल्या मतदार संघातील भारतीय जनता पक्षाचा उमेदवार पराभूत झाल्याने त्यात फार काही फरक पडणार नाही पण ह्यावेळेला आपण थोडा धाडशी निर्णय घेऊन भारतीय जनता पक्षाला एकगठ्ठा मतदान केल्यास आपल्या मुख्य शत्रूचा पाडाव होऊन भारतीय जनता पक्षाच्या विजयात आपला महत्वाचा वाटा दिसून येईल ज्याद्वारे तालुक्यात दोन धर्मामध्ये असलेले सौधार्याचे संबंध अधिक दृढ होऊन सर्वधर्मसमभावाचे चांगले वातावरण निर्माण होईल.

आज माझ्या दृष्टीने मला वसईतील आपल्या लोकांच्या सुरक्षतेची व हक्काची जास्त प्राथमिकता आहे, त्यामुळे राहते घर, गाव व समाज वाचवण्यासाठी जवळच्या शत्रूचा पाडाव करणे हे मी महत्वाचे समजतो. काही निर्णय घेणे कठीण जरी असले तरी निर्णय घेणे हे महत्वाचे असते. भविष्य कुणी बघितलेले नाही त्यामुळे प्राप्त स्थितीत थोडे स्वार्थी बनून हिरव्या वसईला लुटणाऱ्या माफियाराजचा मुकाबला करण्यासाठी आपले मत भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराला देणे मला अधिक संयुक्तिक वाटते. आपण सर्व सुज्ञ अन सुशिक्षित आहात व प्राप्त परीस्थित आपल्या वसईला डोळ्यासमोर ठेऊन मतदान कराल ह्यात काही शंका नाही. आपले मत वसईच्या भविष्यासाठी अमुल्य आहे.

Saturday, March 1, 2014

'ख्रिस्ती व्यक्ती मराठी असू शकत नाही'?

मेंडीस अन मराठी, कस शक्य आहे?' ऑफिसमधील कुलकर्णीनी प्रश्न केला.



'म्हणजे काय, जसा तू मराठी तसा मी मराठी, जसा तू महाराष्ट्रीयन तसा मी महाराष्ट्रीयन', मी उत्तर दिले.



'नाही रे पण तू ख्रिस्ती ना, मग महाराष्ट्रीयन कसा?' कुलकर्णीनी प्रतीप्रश्न केला.मला या उत्तराचा राग आला, पण मी अतिशय शांतपणे कुलकर्णीला उत्तर दिले, 'मित्रा, धर्म अन भाषा-संस्कृती ह्या भिन्न गोष्टी आहेत', आम्ही येशूने दिलेल्या शिकवणुकीने व बायबल च्या वचनाप्रमाणे आमची धार्मिक उपासना करतो अन तुम्ही हिंदू धर्मानुसार उपासना करता, यात मराठी भाषा-संस्कृतीचा प्रश्न आलाच कुठे?'



माझ्या उत्तराने कुलकर्णी महाशयांच समाधान झालं नाही, त्यांनी पुन्हा तोच हेका ठेवला, 'ख्रिस्ती व्यक्ती मराठी असू शकत नाही', आता तर हा माझ्या मराठी असण्याच्या  अस्तित्वाचा एकप्रकारे पुरावाच मागत होता. एक तर मी वसईकर, त्यातल्या त्यात मराठी शब्दांशी खेळणारा अन थोडं फार सामाजिक-राजकीय चळवळीत उठबस करणारा, थोडीच हार मानणार होतो. मी कुलकर्णीला चढ्या आवाजात म्हटले, '५ मिनिटे दे, तुला मी पटवून देतो कि तुझ्यापेक्षा कांकणभर जास्त मी मराठी आहे म्हणून'. तो थोडा खट्याळपणे हसला अन उत्तरला 'ठीक आहे, पटवून दे'.



मी कुलकर्णीला विचारले, 'कोणत्या माध्यमात शाळा शिकला रे?', 'इंग्रजी मिडीयम, कुलकर्णी उत्तरला, 'मी मराठी माध्यमातून शिकलोय, अन ती हि ख्रिस्ती मिशनर्यांनी सुरु केलेली'.



'काय पण फेकतो तू मेंडीस, तुझ इंग्रजी तर उत्तम आहे'. कुलकर्णी उत्तरला.



माझा पुढचा प्रश्न मी कुलकर्णीकडे फेकला, 'वेडात मराठे वीर दौडले सात', ह्या कडव्याची पाश्वभूमी माहित आहे का?, 'नाही, रे' कुलकर्णी उत्तरला. 'मला माहित आहे, बहलोलखानवर पुन्हा स्वारी करून वीरमरण आलेल्या शिवाजीमहाराजांच्या सात योद्धांवर ते स्फुर्तीगीत आहे, त्यावर  कडवे आहे ते'..



माझा पुढचा प्रश्न मी कुलकर्णीकडे फेकला, 'कुलकर्णी, मराठीभाषा दिन कोणता रे?' 'नाही माहित रे' कुलकर्णी उत्तरला. मी कपाळावर हात मारला, म्हटलं ह्याच आठवड्यात येतोय, शोध तूच'.



माझा पुढचा प्रश्न मी कुलकर्णीकडे फेकला, 'वपुर्झा पुस्तक वाचलंय का?', वाचलं जरी नसलं तरी लेखक कोण ते तरी सांग?. 'नाही माहित रे' कुलकर्णीने पुन्हा ठेवणीतलं उत्तर दिलं. ' व पु काळे नाव ऐकलंय का?, 'ऐकल्यासारख वाटते, कुलकर्णी बोलला'. 'नक्कीच नसेल, तुला 'चेतन भगत' माहित आहे पण दुर्दैवाने 'व पु काळे' माहित नाही.



'चल सांग मला संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात किती हुतात्मे झाले?', मी अजून एक कठीण प्रश्न त्याला विचारला तर त्याच्या उत्तराने मी गार झालो, 'मेंडीस, संयुक्त महाराष्ट्र म्हणजे काय?'. 'अरे मराठी माणसा, संयुक्त महाराष्ट्राच्या मागणीसाठी विविध वेळी झालेल्या आंदोलनांत एकूण १०६ जन हुतात्मे झाले, विसरलास का ते?'.



ते जाउ दे आत्ता,  मला सांग तुला 'ऋतू' माहित आहेत का?' पुन्हा त्याची नकारघंटा ऐकू आली. ''मित्रा, वसंत, ग्रीष्म, वर्षा, शऱद, आणि हेमंत असे सहा ऋतू विसरलास ना?'



चल एक सोपा प्रश्न अन तोही फिल्मी 'सांग मला, अजय-अतुल ह्या प्रसिद्ध संगीतकार जोडीच आडनाव काय? पुन्हा त्याची नकारघंटा ऐकू आली. मी म्हटलं 'गोगावले'.



कुलकर्णी थंड झाला होता. मी म्हटलं 'कुलकर्णी, माझ्या आडनावावरून जाउ नको, माझ्या आडनावात जरी मराठी दिसत नसलं तरी माझ्या रक्तात अन श्वासात मराठी आहे, मीच काय वसईचा रोड्रिग्ज, लोपीस, डिसोझा, गोन्साल्वीस अन परेरा तुमच्या सामंत, सावंत, रानडे अन गोखलेसारखेच मराठी आहेत. माझ्या भूमीने 'फादर फ्रान्सीस दिब्रिटो' सारखे महान साहित्यिक ह्या महाराष्ट्राला दिलेले आहेत, पुन्हा कधी मला किव्हा वसईच्या कुणाही ख्रिस्ती व्यक्तीला असा प्रश्न विचारू नकोस, उगाच पुन्हा तुला तूच मराठी न उरल्याची जाणीव होईल'.



कुलकर्णी वसईच पाणी समजून चुकला होता. मी विषय थांबवला अन म्हटलं 'चल कुलकर्णी आता, चहा थंड झाला, आजच्या विषय बंद,  'जय महाराष्ट्र!.