Saturday, March 1, 2014

'ख्रिस्ती व्यक्ती मराठी असू शकत नाही'?

मेंडीस अन मराठी, कस शक्य आहे?' ऑफिसमधील कुलकर्णीनी प्रश्न केला.



'म्हणजे काय, जसा तू मराठी तसा मी मराठी, जसा तू महाराष्ट्रीयन तसा मी महाराष्ट्रीयन', मी उत्तर दिले.



'नाही रे पण तू ख्रिस्ती ना, मग महाराष्ट्रीयन कसा?' कुलकर्णीनी प्रतीप्रश्न केला.मला या उत्तराचा राग आला, पण मी अतिशय शांतपणे कुलकर्णीला उत्तर दिले, 'मित्रा, धर्म अन भाषा-संस्कृती ह्या भिन्न गोष्टी आहेत', आम्ही येशूने दिलेल्या शिकवणुकीने व बायबल च्या वचनाप्रमाणे आमची धार्मिक उपासना करतो अन तुम्ही हिंदू धर्मानुसार उपासना करता, यात मराठी भाषा-संस्कृतीचा प्रश्न आलाच कुठे?'



माझ्या उत्तराने कुलकर्णी महाशयांच समाधान झालं नाही, त्यांनी पुन्हा तोच हेका ठेवला, 'ख्रिस्ती व्यक्ती मराठी असू शकत नाही', आता तर हा माझ्या मराठी असण्याच्या  अस्तित्वाचा एकप्रकारे पुरावाच मागत होता. एक तर मी वसईकर, त्यातल्या त्यात मराठी शब्दांशी खेळणारा अन थोडं फार सामाजिक-राजकीय चळवळीत उठबस करणारा, थोडीच हार मानणार होतो. मी कुलकर्णीला चढ्या आवाजात म्हटले, '५ मिनिटे दे, तुला मी पटवून देतो कि तुझ्यापेक्षा कांकणभर जास्त मी मराठी आहे म्हणून'. तो थोडा खट्याळपणे हसला अन उत्तरला 'ठीक आहे, पटवून दे'.



मी कुलकर्णीला विचारले, 'कोणत्या माध्यमात शाळा शिकला रे?', 'इंग्रजी मिडीयम, कुलकर्णी उत्तरला, 'मी मराठी माध्यमातून शिकलोय, अन ती हि ख्रिस्ती मिशनर्यांनी सुरु केलेली'.



'काय पण फेकतो तू मेंडीस, तुझ इंग्रजी तर उत्तम आहे'. कुलकर्णी उत्तरला.



माझा पुढचा प्रश्न मी कुलकर्णीकडे फेकला, 'वेडात मराठे वीर दौडले सात', ह्या कडव्याची पाश्वभूमी माहित आहे का?, 'नाही, रे' कुलकर्णी उत्तरला. 'मला माहित आहे, बहलोलखानवर पुन्हा स्वारी करून वीरमरण आलेल्या शिवाजीमहाराजांच्या सात योद्धांवर ते स्फुर्तीगीत आहे, त्यावर  कडवे आहे ते'..



माझा पुढचा प्रश्न मी कुलकर्णीकडे फेकला, 'कुलकर्णी, मराठीभाषा दिन कोणता रे?' 'नाही माहित रे' कुलकर्णी उत्तरला. मी कपाळावर हात मारला, म्हटलं ह्याच आठवड्यात येतोय, शोध तूच'.



माझा पुढचा प्रश्न मी कुलकर्णीकडे फेकला, 'वपुर्झा पुस्तक वाचलंय का?', वाचलं जरी नसलं तरी लेखक कोण ते तरी सांग?. 'नाही माहित रे' कुलकर्णीने पुन्हा ठेवणीतलं उत्तर दिलं. ' व पु काळे नाव ऐकलंय का?, 'ऐकल्यासारख वाटते, कुलकर्णी बोलला'. 'नक्कीच नसेल, तुला 'चेतन भगत' माहित आहे पण दुर्दैवाने 'व पु काळे' माहित नाही.



'चल सांग मला संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात किती हुतात्मे झाले?', मी अजून एक कठीण प्रश्न त्याला विचारला तर त्याच्या उत्तराने मी गार झालो, 'मेंडीस, संयुक्त महाराष्ट्र म्हणजे काय?'. 'अरे मराठी माणसा, संयुक्त महाराष्ट्राच्या मागणीसाठी विविध वेळी झालेल्या आंदोलनांत एकूण १०६ जन हुतात्मे झाले, विसरलास का ते?'.



ते जाउ दे आत्ता,  मला सांग तुला 'ऋतू' माहित आहेत का?' पुन्हा त्याची नकारघंटा ऐकू आली. ''मित्रा, वसंत, ग्रीष्म, वर्षा, शऱद, आणि हेमंत असे सहा ऋतू विसरलास ना?'



चल एक सोपा प्रश्न अन तोही फिल्मी 'सांग मला, अजय-अतुल ह्या प्रसिद्ध संगीतकार जोडीच आडनाव काय? पुन्हा त्याची नकारघंटा ऐकू आली. मी म्हटलं 'गोगावले'.



कुलकर्णी थंड झाला होता. मी म्हटलं 'कुलकर्णी, माझ्या आडनावावरून जाउ नको, माझ्या आडनावात जरी मराठी दिसत नसलं तरी माझ्या रक्तात अन श्वासात मराठी आहे, मीच काय वसईचा रोड्रिग्ज, लोपीस, डिसोझा, गोन्साल्वीस अन परेरा तुमच्या सामंत, सावंत, रानडे अन गोखलेसारखेच मराठी आहेत. माझ्या भूमीने 'फादर फ्रान्सीस दिब्रिटो' सारखे महान साहित्यिक ह्या महाराष्ट्राला दिलेले आहेत, पुन्हा कधी मला किव्हा वसईच्या कुणाही ख्रिस्ती व्यक्तीला असा प्रश्न विचारू नकोस, उगाच पुन्हा तुला तूच मराठी न उरल्याची जाणीव होईल'.



कुलकर्णी वसईच पाणी समजून चुकला होता. मी विषय थांबवला अन म्हटलं 'चल कुलकर्णी आता, चहा थंड झाला, आजच्या विषय बंद,  'जय महाराष्ट्र!.

'खित' नावाची आठवण.. !

'खित' नावाची आठवण.. !

'खित' ह्या शब्दात इतकी मिठास आहे, कि ज्याला ती येते तो ती अनुभवू शकतो. खित म्हणजे आठवण, नुसती आठवण का? नाही,  महाप्रचंड आठवण, शरीरापासून दूर असलेल्या व नजीकच्या काळात संवाद न घडू शकलेल्या व्यक्तीच्या विरहाचा प्रेमळ आविष्कार ! कधीकधी मी काव्यात सहजंच बोलून जातो, 'जिथे प्रीत आहे, तिथे खित आहे'. आपल्यालावर जीवापाड प्रेम करणाऱ्या मायेच्या व्यक्तीच आपल्या मधील भौगोलिक अंतर वाढलं कि जन्म घेते ती खित.

लहानपणी बऱ्याच दिवसानंतर मामाकडे जाण्याचा योग आला, कि मामाकडे ओटीवर चढताच मामाकडची बय आपल्याला गच्च मिठीत सामावून घेत असे, अन म्हणत असे 'पोरा तू होतो कडे, कोडी खित आल्ती तुयी मला'.  अन तिच्या उबदार मिठीचा स्पर्श होताच आपलीही खित पूर्ण होत असे, ज्याला आपण 'खित मोडली' असं म्हणत असू. दुसरे उदाहरण बघा, मुलगी बाळंतपणासाठी माहेरी यावी, ६ महिने राहावी, त्यात त्या इवलुश्या बाळाचा जन्म, त्याच्या कोवळ्या रडण्याची कानाला झालेली सवय अन त्याच्या अंगाला लावण्यात येणाऱ्या पावडरचा निरागस सुवास. किती सवयींच होऊन जाते. अन अचानक मुलगी लेकराला घेऊन सासरी निघून जाते मग राहते ती फक्त खित अन खित. ते घरून गेल्यानंतर मागे राहिलेली रात्र किती भकास अन उदास वाटते. पहाट होते कधी अन त्यांना जाऊन भेटतो कधी असं जीवाला  वाटून जाते. हीच ती ताकद 'खित' नावाच्या शब्दाची. आपल्या पासून दूर गेलेलं आपल हक्काचं माणूस जवळ यावं अन त्याला जवळ घेताना नकळत डोळे भरून यावे, हाच खरा त्या  खितीचा अवर्णनीय आनंद.

घरापासून दूर परदेशात असणाऱ्या व्यक्तीची तर कहाणीच वेगळी. त्याला त्याच्या कुटुंबाची, घराची, गावाची अन मागे ठेवून गेलेल्या समाजाची काय खित येत असेल ते त्या एकट्या जीवालाच माहित.आजच्या सोशल मिडीयाच्या युगात फेसबुक अन वोट्सअप जरी उपलब्ध असले तरी ती फक्त  संपर्काची साधने, त्यातून 'संवाद' थोडाच घडतो. आपल्याला हव्या असलेल्या व्यक्तीला भेटण्याचा, त्याला मिठीत घेण्याचा, त्याला भरभरून पाहण्याचा अन त्याच्या चेहऱ्यावरील हावभावावरून त्याच्याशी संवाद साधण्याचा योगच स्वर्गीय अन त्यासाठी खरेखुरे भौगोलिक अंतर नष्ट होणे गरजेच असते, कारण खित मोडण्याचा तोच खरा नैसर्गिक मार्ग असतो. बाकी सगळ्या कृत्रिम सोयी, मनाच्या समजूत करणाऱ्या. फेसबुक अन वोट्सअपवर शेकडोनी आपले मित्र मैत्रिणी असतात पण मनापासून खित यावी असे हाताच्या बोटावरही मोजता येणारे चेहरे सापडत नाही, कारण ज्यांची खित यावी असे चेहरे फेसबुकच्या आभासी दुनियेपासून अलिप्त असतात, अन त्यांना लाईक देण्यासाठी आभाशी दुनियेतून वेळ काढून खऱ्या दुनियेत प्रत्यक्ष भेट घ्यावी लागते.

खित फक्त व्यक्तीचीच येते का? तर नाही, खित व्यक्ती पासून पशु-प्राणी, स्थळ-काळ अन निसर्गाच्या बदलणाऱ्या ऋतुचीही येते. ग्रीष्म ऋतूत उन्हाने शरीराची लाहीलाही होते तेव्हा मन चातकासारखी वर्षा ऋतूची वाट पाहते. मला तर पावसाच्या पहिल्या सरीने मातीला येणारा सुगंधाची खित येते. तो सुगंध नाकावाटे शरीरात विरघळल्याशिवाय हृदयात खरा पाऊस डोकावतच नाही.

हे ललित वाचत असताना आपल्यापासून दूर असलेल्या आपल्या व्यक्तीची आठवण करून बघा, काय वाटते? जर आपल्यापासून दूर असतील तर भेटण्याची आस अन जर आपल्याला कायमचे सोडून देवाघरी गेल्या असतील तर? फक्त अन फक्त आठवणी, न संपणाऱ्या, न मावळणाऱ्या. ते कधीही भेटणार नाहीत हे वास्तव मान्य करून येणारी खित? किती जीवघेणी. त्या खितीची भूक, कधीही न मिटणारी....खितीपासून सुरु होऊन फक्त 'खित' म्हणून उरणारी !!

तू असता दूर, यावी हलकीच खित !
वाऱ्यासंगे उडून तुझकडे, विरघळावे मिठीत !

 सचिन मेंडिस