Thursday, September 18, 2014

पेरू !

लहानपणी पेरू तोडण्यासाठी गावभर फिरायचो. छोटी छोटी अन कच्ची पेरू झाडावर चढून तोडण्यात अन घरमालकाच्या शिव्या खाण्यात तेव्हा वेगळीच मजा होती. आज अंगणातील झाड पेरूने नखशिखांत भरून गेलंय, सहज हाताला लागतील असे मोठे पेरू झाडाला लागलेत. पहिल्या मजल्यावरील खिडकीतून बाहेर पाहिले तर अक्षरश: पेरूच्या डहाळी खोलीला स्पर्शून लागलेल्या आहेत. का कुणास ठाऊक पण पेरू तोडण्याची उर्मी आता मागे राहिलीय. कधी तरी झाडावर नजर टाकली तर एखादा पोपट किव्हा खारुताई छानपैकी पेरूवर ताव मारताना दिसते. अशा पक्षांना झाडावर पेरू खाताना पाहण्यात अन त्यात आपले बालपण शोधण्यात एक वेगळीच धुंद आहे. चिंब पावसात ती धुंद अनुभवण्याचे सुख मिळते, हे ही न थोडके !!

वसईचे राजकारण: दशा अन दिशा

वसईचे राजकारण: दशा अन दिशा - सचिन मेंडीस

 राष्ट्रीय राजकारणाचा विचार करता राजकारण हे कॉंग्रेस सहयोगी(संपुआ) अन भाजप सहयोगी (रालोआ) अशा दोन गटात विभागले गेले आहे. तोच साचा महाराष्ट्रामध्ये आघाडी अन युती असा दिसून येतो. वसईचा विचार करता बहुजन विकास आघाडी हा कॉंग्रेसचा सहयोगी पक्ष राहिल्याने त्यांनी इतके वर्ष वसईत पक्ष वाढवण्यापेक्षा वसई विरार हा पट्टा बहुजन विकास आघाडीला आंदण देऊन टाकला होता. मागच्या लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेसने बहुजन विकास आघाडी विरोधात उमेदवार देऊन एक वेगळा राजकीय संदेश देण्याचा प्रयत्न केला होता, पण दुर्दैवाने ऐनवेळी आपला उमेदवार मागे घेऊन बहुजन विकास आघाडीला झुकते माप दिले अन वसई विरार मधील स्थानिक कॉंग्रेस पेक्षा बहुजन विकास आघाडीच्या नेतृत्वाला मोठे केले (अन त्याची किमंत निवडणुकीत मोजली). ह्यात महाराष्ट्र कॉंग्रेसच्याही काही राजकीय मर्यादा आहेत. वसई विरार परिसरात स्वतंत्र अस्तित्व असलेल्या बहुजन विकास आघाडीची २ आमदार, एक महापालिका तसेच जिल्हा परिषद, पंचायत समिती व ग्रामपंचायत मध्ये सत्ता किव्हा प्रतिनिधित्व आहे. कॉंग्रेसने बहुजन विकास आघाडीचा हात सोडल्यास बहुजन विकास आघाडी राष्ट्रवादीशी सलगी करू शकते जे कॉंग्रेसला राष्ट्रवादीबरोबरच्या स्पर्धेत परवडणारे नाही.

येणाऱ्या काळात वसई-विरारचा भूप्रदेशाचा राजकीय विचार केल्यास वसई-विरारमधील राजकारण हे बहुजन विकास आघाडी अन शिवसेना-भाजपा युती ह्या दोन पक्षात विभागलेले दिसून येईल. वसई मतदारसंघात जन आंदोलन समितीचा जरी विचार केला तरी त्याचे नेतृत्व अन निर्णय घेणारे पदाधिकारी हे युतीचे नेते असल्याने काही वेगळे निर्णय होण्याची शक्यता नाही. त्यामुळे थोडे स्पष्ट बोलवायचे झाल्यास वसई-विरारमधील राजकारण हे बहुजन विकास आघाडी विरुध्द शिवसेना-भाजपा-जन आंदोलन समिती युती असेच राहणार आहे. ह्या सर्व वास्तवाचे भान ठेवून व दीर्घ कालीन राजकारणाचा विचार करून आपल्या समाजाला (मूळ वसईकर) कोणत्या तरी एका गटात प्रवेश करून आपल्या कर्तुत्वाने पुढे जावे लागेल. ह्या व्यतिरिक्त होणारे राजकीय निर्णय हे तत्कालीन अन दीर्घकालीन कसोटीवर तोट्याचे असतील. ह्यात प्रामुख्याने एका राजकीय पक्षाबरोबर नसल्याने निर्माण होणारा राजकीय अविश्वास तसेच एका पक्षात राहून स्थानिक नेतृत्वाला वर जाण्याची संधी न मिळाल्याने होणारे समाजाचे नुकसान ह्या दोन प्रमुख बाबी येतील.   काही वेळेला प्रश्न सोडून दिल्याने सुटतात असे म्हटले जाते. अलीकडेच काही मंडळीनी बहुजन विकास आघाडीला आपले कायमचे शत्रू न मानता त्यांचे राजकीय नेतृत्व मान्य करून सहमतीने आपली कामे करावीत असा सूर मांडल्याचे कळते. हा प्रश्न सोडवण्याचा वेगळा  उपाय जरी असला तरीही बहुजन विकास आघाडीचा इतिहास बघता हा विषय चर्चेचा व वादाचा होऊ शकतो. दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे सर्व स्थानिक वसईकर/ख्रिस्ती मतदार बहुजन विकास आघाडीच्या विरोधात नाहीत, हेही वास्तव आहे.मागील मतदानाची सांख्यिकी पाहिली तर ३५%-४०% मतदार बहुजन विकास आघाडीच्या बाजूने असल्याचे स्पष्ट दिसते. त्यामुळे नजीकच्या काळात कुंपणावर असलेली मते कोणाच्या बाजूने झुकतात ह्यावर मोठ्या प्रमाणात राजकीय गणिते ठरली जातील. दुर्दैवाने जुना समाजवादी व ख्रिस्ती मतदार आज ह्या कुंपणाच्या रेषेवर आहे ज्याचे प्रमाण ढोबळमानाने एकूण मतदानाच्या २५ % इतकी असेल.  

दीर्घकाळ राजकारणाचा विचार करता स्थानिक वसईकर/ख्रिस्ती मतदाराला आपली राजकीय उपयुक्तता (प्रसंगी उपद्रवमूल्य)  वापरून व मागण्या विषयी बोलणी करून बहुजन विकास आघाडी किव्हा शिवसेना-भाजपा-जन आंदोलन समिती युती ह्या एका कळपात सामील व्हावे लागेल व पुढे कौशल्याने नेतृत्व करून आवाज बुलंद करावा लागेल. बहुजन विकास आघाडी हा आधुनिक सुभेदाराचा पक्ष असल्याने व तिथे व्यक्तिकेंद्रित निर्णय घेतले जात असल्याने भविष्यात घराण्याबाहेर दुसऱ्या कुणाला नेतृत्व मिळणे हे आश्चर्य ठरेल. ह्या दोन्ही गटाला बाजूला ठेऊन काही वेगळे राजकीय व्यासपीठ निर्माण होण्याची शक्यता नजीकच्या काळात धुसर आहे. कारण अशी कडबोळी आपल्या राजकीय हेकेखोरीमुळे समर्थ राजकीय पर्याय देऊ शकणार नाहीत व अल्पायुषी ठरतील. शेवटी कितीही म्हटले तरी राजकारण हे प्रवाही असते. काही गणिते क्षणात बदलू शकतात किव्हा एखादी घटना मोठी राजकीय उलथापालथ घडवू शकते. जगाच्या इतिहासात कोणतीही सत्ता चिरकाल टिकलेली नाही हे त्रिकाळ सत्य आहे, परतू तूर्तास वसईत काळ सोकावतोय त्याचे दुख: आहे.    

भाव अन भावना !

भाव अन भावना !

गाडी फलाटाला लागली अन तो स्टेशनच्या बाहेर आला. बायकोने आज येताना फळे आणायला सांगितली होती. समोरच्या भैय्याकडे त्याने मोर्चा वळवला. 'भैया, एक किलो सेब देना, वो बडे वाले दे दो’. 'सेठ, ये बडे वाले २०० रुपये किलो है, थोडे मेहंगे है, लेकिन माल बढीया है' ! 'क्या, २०० रुपये किलो, और ये दुसरे वाले कैसे दिये'? 'ये सेठ, १६० रुपये किलो है' ! 'ठीक है, १६० रुपये किलोवाले देना' !

त्याने पिशवी घेतली अन तो घराकडे निघाला. रस्त्यात त्याने गाडी थांबवली अन तो बिअर शॉप कडे वळला. ‘भाऊ, २ किंगफिशर माइल्ड दे. चिल्ड हा'. 'दादा, किंगफिशर माइल्डचा भाव १० रुपयेने वाढला काल पासून. पण LP स्वस्त आहे, देऊ का? 'अरे काय पण तू भाऊ, किंगफिशर माइल्ड प्यायची तर १०-२० रुपये बघून चालेल का'? तू दे २ किंगफिशर चिल्ड अन २० रुपयाचे वाटाणे दे चाखण्याला‘. त्याने बिअरची पिशवी गाडीच्या डिगी मध्ये टाकली. सफरचंदाची पिशवी बिअरच्या पिशवीखाली दाबली गेली होती, त्यामुळे त्यांची घुसमट वाढली होती. आयुष्याच्या डिगीमध्ये बिअरचा भाव त्याच्यापेक्षा जास्त होता. बिअर सफरचंदाच्या डोक्यावर बसली होती, अन विकृतपणे हसत होती. सफरचंदाची पिशवी ओरडत होती पण तिचा आवाज कुणाला ऐकू येत नव्हता. बहुतेक सर्वांनी कान बंद केले होते.

सचिन मेंडिस

वेदना !

वेदना !

 हे मी तुला का सांगतोय हे मला माहित नाही, बहुतेक तू माझ्या मुलाच्या वयाचा असावा म्हणून असावं. माझ्या निवृत्तीला आता ७-८ वर्षे झाली. चौकोनी कुटुंब, एक मुलगा अन एक मुलगी. मी नोकरी सांभाळली तर ह्यांच्या मम्मीने संसार अन ह्यांच्याकडे लक्ष दिलं. मुलांना कुठे कमी पडून दिलं नाही. मुलगी लग्न करून सासरी गेल्याला १० वर्षे झाली तर मुलगा सध्या अमेरिकेला असतो. मुलगी वरचेवर घरी येते, पण तिची नोकरी, मुले अन संसार हे सर्व करता तिची धावपळ होते, अन आता तर आल्या आल्या निघायची घाई करते. तिचा दोष काय करायचा, कुठे कुठे लक्ष देईल ती. मुलांनी शिकावं, मोठे व्हावं असे मनोमन वाटत होते, त्यात मुलगा हुशार म्हणून उच्चशिक्षण दिलं अन शिक्षण करून जो तो अमेरिकेला गेला तो अजून तिथेच रमलाय. पूर्वी म्हणायचा कि ३-४ वर्षे राहून मग परत येतो, मग लग्न करावं म्हणून पुन्हा विचार बदलला, नंतर सुनेने अमेरिका अनुभवावी म्हणून पुढे परतणे लांबले अन आता मुलगी झाल्यावर तिला इथलं वातावरण कसं झेपेल अशी चिंता त्याला लागली आहे. एकुलता एक मुलगा आमचा. रोज फोन करतो, बोलण होत, पण डोळ्यासमोर नाही ह्याची खंत वाटते.

एवढ्या मोठ्या घरात आम्ही दोघे, घर खायला उठते. का कुणास ठाऊक एक प्रचंड पोकळी निर्माण झाली आहे ह्या घरात. ह्याची मम्मी वरचेवर आजारी असते. रात्री अपरात्री उठते अन ह्याच्या आठवणीने ढसाढसा रडते. तिला समजावण्याचा प्रयत्न करतो पण आईचं मन तिचं, मला इतका शोक होतो तर त्या बिचारीचा काय दोष करू. महिन्याला इथे बँकेत डॉलर जमा होतात पण मुलाच्या स्पर्शाच्या उबेपुढे त्या डॉलरची उब काय कामाची. कधी गरज पडली तर शेजारच्या मुलाला बोलवायला लागते, कुणी नाही म्हणत नाही मदतीला, पण एकुलता एक मुलगा परदेशी ऐश्वर्यात असताना कुणाला मदतीला बोलवायला कसेतरीच वाटते. अजून किती वर्षे आम्ही जगणार माहित नाही, मनात विचार येतो उरलेल्या आयुष्यात मुला अन नातीसोबत भरलेल्या घरात राहायला मिळेल की नाही. हिने तर आता वेगळच खूळ घेतलाय डोक्यात, म्हणे उद्या परवा माझं काय झाल तर तोंड पाहायला तरी हा पोहचेल का? कधी कधी शांतपणे विचार गेला तर वाटते थोडा कमी शिकला असता तर जवळ राहिला असता, कमी चैन केली असती पण घर फुललं असतं. हिच प्रेशर, माझा डायबेटीस अन हि औषधे, का कुणास ठाऊक हा जवळ असता तर वाट्याला आली नसती.

तुमच्या सारखी तरुण मंडळी समोर येता तेव्हा तो डोळ्यासमोर उभा राहतो. कसं समजावू त्याला हा जन्म एकदाचं आहे, हे पप्पा-मम्मी एकदाचं येणार आहेत वाट्याला. एकदा गेले कि पुन्हा नाही येणार परत. मग कितीही डॉलर मोजले तर न आम्ही परतणार न उडून गेलेले क्षण. आयष्य म्हणजे पैसा, प्रमोशन, चैनीच जीवन अस थोडेच असते, जिथे नात्याचा ओलावा नाही, आपल माणूस जवळ नसल्याने डोळ्यात पाणी नाही, अशा जिण्याला काय आयुष्य म्हणायचं? मी हताश झालोय पण आशावादी आहे, तो येईल कायमचा परत आमच्याकडे. पुन्हा घर भरेल, बहरेल. त्याची आई शांतपणे झोपेल. त्याने यायलाच पाहिजे आता, त्याची आई अन मी कायमचे झोपी जाण्या अगोदर.

Great Bhet !!

अलीकडेच 'पिके' च्या सेटवर आमिरची भेट झाली. तसा तो २० वर्षापूर्वी रंगीलाच्या शुटींगच्या वेळी वांद्र्याला कोलेजसमोर भेटला होता. त्याने लांबून पाहून हलकेच स्मित केले. मी त्याच्या जवळ गेलो अन हस्तांदोलन केले अन विषय काढला. 'आमीरजी, 'सत्यमेव जयते' खूप आवडलं लोकांना, खूप अपेक्षा आहेत तुमच्या कडून आम्हाला, पण असे व्यवस्थेच्या बाहेर राहून व्यवस्था कशी बदलणार. तुम्ही नेतृत्व घ्या, युवा पिढी तुमच्या पाठीशी उभी राहील. किती प्रश्न आहेत देशापुढे'. आमिर हलकेच हसला अन म्हणाला, 'सचिन, बहोत आसान है, बहोत आसान है, सिम्पल फंडा है, आंख बंद करनेका और दिल पे हाथ रखकर बोलनेका, 'आल एज वेल, आल एज वेल', बस हो गया काम'. त्याच्या ह्या उत्तराने मी निराश झालो अन म्हटलं 'और जब आंख खुलेगी तो दिखाई देगा अपना देश, तुम्हारे पिके के पोस्टर जैसा 'नंगा' ! त्याने रागाने माझ्याकडे पाहिले, तसेच जसा अमिताभ केबीसीच्या सेटवर रागावला होता माझ्यावर. तशी अमिताभशी माझी भेट दुसऱ्यांदा, पहिल्यांदा कॅडबरीच्या जाहिरातीवेळी भेटला होता. तेव्हाच त्याला प्रश्न विचारणार होतो पण त्यांनी माझ्या हातात कॅडबरी दिले अन म्हटले, सचिनजी, कुछ मिठा हो जाये'. मग मी विचार केला उगाच गोड वातावरणात मिठयाचा खडा नको. पण मागे पुन्हा केबीसीच्या सेटवर संधी साधून आली होती. चाहत्यांच्या गरड्यात असूनही त्यांची नजर माझ्याकडे गेली अन त्यांनीच समोरून हाक दिली, 'सचिनजी, आजकल मिलते नही आप, हमसे कोई गुस्ताकी तो नही हुई', मी सरळ विषयालाच हात घातला. मी म्हटले आता लोकांना प्रश्न विचारणे पुरे झाले, आता देशासमोरील प्रश्न सोडवण्याची वेळ आली आहे, लोकांनी तुम्हाला भरभरून दिले आहे, आता तुम्हाला व्यवस्थेला प्रश्न विचारण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे, तुमच्या पदाचा, तुमच्या वजनाचा, तुमच्या प्रतिष्ठेचा लोकहितासाठी वापर केला पाहिजे'. त्यांनी माझ्याकडे मिश्किलपणे हास्य केले अन म्हटले, ''सचिनजी, कौन साला उस कीचड में हात दालेगा दोबारा. उफ तुम्हारे ये उसूल, ये आदर्श, इस सारे उसुलो को मिलाके एक वक्त कि रोटी भी नही बन सकती, आज मेरे पास बंगला है, गाडी है, बँक बलेंस है, क्या है तुम्हारे पास?', मी त्यांच्या अशा उत्तराने थोडावेळ चाट पडलो अन उत्तरलो, 'मेरे पास, मेरे पास 'भारतमाता' है, जो आज मदत के लिये पुकार राही है आपको! अमिताभ खजील झाला होता, त्या संवादाने आमच्यात एक अदृश्य 'दीवार' उभी राहिली होती, अगदी तशीच जेव्हा मी दीदीच्या घरून निराश मानाने परतलो होतो. गेल्या महिन्यात कामानिमिताने ऑफिसच्या कारने चर्चगेटला निघालो होतो, पेडर रोड वर अचानक गाडी बंद झाली. मी बाहेर येऊन गाडी नीट होण्याची वाट पाहू लागलो तर अचानक कानावर मंजुळ हाक ऐकू आली, 'सचिन भाऊ, सचिन भाऊ', मी मागे वळून पाहिले तर जवळच्या बिल्डींगच्या खिडकीत साक्षात गानकोकिळा उभी. मला म्हणाली, 'सचिनभाऊ, गाडी ठीक होईपर्यंत चहा घेऊन जा', मी ड्रायवरला सांगून इमारतीकडे वळालो. दीदीच्या घरात पाऊल टाकेपर्यंत चहा तयार झाला होता, घरात मंद आवाजात 'ये मेरे वतन के लोगो' हे दीदीने गायलेले गीत वाजत होते. चहात साखर नव्हती, पण दीदीच्या मंजुळ आवाजाने चहा गोड भासत होता. आता आयतीच संधी आली आहे हे पाहून मी सरळ विषयालाच हात घातला. 'दीदी, आज पर्यंत तुम्ही चित्रपटासाठी गळा वापरला, आता लोकांच्या प्रश्नांसाठी थोडा गळा काढा, खराब रस्ते, अपुरा पाणीपुरवठा, भ्रष्टाचार ह्याबद्दल थोडे बोला, प्रशासन नक्कीच हलेल, तुम्ही 'भारतरत्न' आहात, सरकार नक्कीच दखल घेईल अन जनतेला फायदा होईल,' माझे बोलणे शांतपणे ऐकून दीदी जागेवरून उठल्या अन खिडकीकडे वळल्या. मी सकारात्मक उत्तराची अपेक्षा बाळगून होतो, दीदी थोडा वेळ शांत होत्या अन मग मला म्हणाल्या,' सचिनभाऊ, तुमची कार ठीक झाली आहे, ड्रायवर शोधतोय तुम्हाला, तुम्हाला निघाले पाहिजे,'. मी समजायचे ते समजून गेलो अन जागेवरून उठलो. दरवाजात पोहचल्यावर क्षणभर थांबलो अन दीदीला म्हणालो, दीदी, जमलं तर ते 'ये मेरे वतन के लोगो' गाणे तितके बंद करा, शोभत नाही ते इथे'. दीदीने धाड्कन दरवाजा बंद केला. मला सल्लूने दरवाज्यावर मारलेल्या लाथेची आठवण झाली. वांद्र्याला एका अनाथाश्रमामध्ये जाण्याचा योग आला होता. मिशनरी सिस्टर्स तो अनाथाश्रम चालवीत होत्या. मी मुलांच्या खोलीकडे वळालो तर मुलांच्या घोळक्यात सलमान खेळत होता. मी पाहून न पाहिल्या सारखे केले. तर सलमानने जोरात हाक दिली, 'क्या मेंडीसभाई, कम से कम हात तो मिला'. मी म्हटले 'सल्लू, तू रस्त्यात दारू पिऊन लोकांच्या अंगावरून गाडी नेतोस अन येथे अनाथ मुलांच्या खांद्यावरून हात फिरवतोस, मला नक्की समजत नाही तुझ हे वागण'. सलमान माझ्याकडे पाहून गालात हसला, बहुतेक माझ्या अशा प्रश्नाने त्याला 'किक' लागली असावी. म्हणाला,' मेरे बारे में इतना मत सोचना, दिल में आता हू, समझमे नही', असं बोलून वेडेवाकडे चाळे करू लागला. मी शांतपणे त्याच्या कडे पहिले अन उलट उत्तर दिले, 'देश पे एक एहसान करना, कि देश पे कोई एहसान न करना', माझा हा डायलॉग त्याच्या जिव्हारी लागला, त्याने उद्वेगाने धाड्कन दरवाजावर लाथ मारली जी मला क्षणभर तेंडूलकरने शेन वार्नला हूकचा फटका मारल्यासारखी वाटली. आज तसा संध्याकाळी सचिन भेटणार आहे वानखेडेला, त्यालाही फैलावर घ्यायचं आहे थोडं. मोठ्या आशेने राज्यसभेवर पाठवलं आहे त्याला, सांगतोच त्याला दोन युक्तीच्या गोष्टी, म्हणतो त्याला 'लोकांच्या प्रश्नावर तिथे चौफेर फलंदाजी कर अन त्या गेंड्याच्या कातडीच्या राजकारण्यांची विकेट काढ, मग बघ कसे हिट विकेट होतील ते', उगाच गैरहजर राहून राज्यसभेची जागा कुजवू नकोस ती !!

'माणूस' बनायचं राहून जाते !!

'माणूस' बनायचं राहून जाते !!

गावात असतो तेव्हा मी 'बोळींजकर' असतो.
आगाशी, उमराळे अन नंदाखाल करांनी माझ्या गावाविषयी बोलले,
तर मी अस्वस्थ होतो, पेटून उठतो,
जशास तसे उत्तर देतो !!

गावाबाहेर पडतो तेव्हा मी 'कुपारी' बनतो.
 'दारू-बिर्याणी पाजली कि कुपारी मत फिरवतो' असे ऐकले कि माझे टाळके फिरते.
मी आगाशी, उमराळे अन नंदाखालकर मित्रांसमवेत निषेध व्यक्त करतो,
प्रसंगी बोलणाऱ्या ब्राह्मण, आगरी, वाडवळ जातीचा उद्धार करतो !!

समाजाबाहेर पडतो अन लोकल गाडीत चढतो तेव्हा मी 'विरारकर' होतो.
 डाऊन ला येणाऱ्या अन बोरीवली ला चढणाऱ्या प्रवाशाची 'आय-माय' एक करतो.
विरारच्या हक्कासाठी लढा देतो, प्रसंगी टोळी बनवून कायदा हातात घेतो !!

 मी अजून पुढे जातो अन दिल्ली मुंबई विमानात बसतो.
पुढे बसलेला अन मराठी पेपर वाचणारा प्रवासी माझे लक्ष वेधतो.
भय्या, गुजराती अन मारवाडी प्रवाशापेक्षा तो आपलासा वाटतो.
मी 'जय महाराष्ट्र' म्हणून त्यला मंद स्मित देतो !!

मी अजून झेप घेतो अन जगाला गवसणी घालतो.
गोऱ्या कातडीच्या 'जिनीवा' शहरात तो मला भारतीय वाटतो.
माझे देशप्रेम उचंबळून येते अन 'कहा से हो भाई' म्हणत मी विचारपूस करतो.
'मैं कानपूर से, और आप कहा से' म्हणत ग्लासाला ग्लास भिडते.
'सारे जहा से अच्छा हिन्दुस्था हमारा' गीत मनोमनी वाजते !!

मी असतो कधी बोळींजकर, कधी कुपारी, तर कधी विरारका छोकरा,
बनतो मी मराठी, कधी बनतो मी इंडिअन,
का कुणास ठाऊक 'माणूस' बनायचं राहून जाते,
'सारे विश्वची माझे घर' माझ्या पुस्तका पुरता उरते !!

सचिन मेंडीस

गुलमोहर !

गुलमोहर ..नुसते नाव समोर आले तरी मन मोहरून जाते. शाळेतल्या पटांगणातील गुलमोहराचे झाड हळूच आठवणीच्या खिडकीतून बाहेर डोकावते. ती भव्यता, ती सावली अन जोडीला लाल गर्द गुलमोहराच्या फुलांचा सडा मनाचे अंगण व्यापून टाकतो. कधी रस्त्यात, प्रवासात कुठे फुलांनी मोहरलेला गुलमोहर दिसला तर मन प्रसन्न होते. जगण्याला एक वेगळी उभारी मिळते. ऑफिस, संसार, धावपळ, तडजोडी ह्यांच्या पलीकडे जाऊन क्षणभर गुलमोहराच्या कुशीत विसावा घ्यावासा वाटतो. आठवणीचा गुलमोहर असा फुलतो की मग फुलतच राहतो.. आयुष्य मोहरून टाकतो अन नकळत चेहऱ्यावर गुलमोहरी गर्द केशरी छटा उमटून येते. पक्ष्यांचा किलबिलाट कानी वाजतो अन मनाच्या फांदीवर एक वेगळा ऋतू जन्म घेतो, पुन्हा गुलमोहर मनात रुजू लागतो अन हलकेच ओठी शब्द येतात ‘दूर असता तू ,क्षण वाटे प्रत्येक प्रखर ! तू येता अशी समीप ..मनी फुले मग गुलमोहर’!! सचिन मेंडीस

8 पिसेस ऑफ पिझ्झा !

'जास्त कपडे धुवायला काढू नका', तिने म्हटले. का बरे? तो म्हणाला. 'नाही, आपली काम वाली बाई २ दिवस येणार नाही'. कशासाठी? 'गणपतीसाठी २ दिवस नातवाला भेटायला मुलीकडे जाणार आहे, असे बोलली'. 'ठीक आहे, नाही काढत जास्त कपडे धुवायला', 'आणि, हो, तिला गणपतीसाठी ५०० रुपये देते, सणासाठी बोनस म्हणून'. 'कशाला, आता दिवाळी आलीच, तेव्हा देऊया',. 'नाही रे, गरीब बाई ती, हौशेने नातवाकडे जातेय तर तिलाही बरे वाटेल', अन ह्या महागाई मध्ये त्यांच्या पगारात कसा सण साजरा करणार ते'? 'तू ना, खूपच भावनिक होतेस', 'नाही रे, काळजी करू नकोस', मी आजचा पिझ्झा खाण्याचा बेत रद्द करते', सहज ५०० रुपये उडतील त्या ८ पावाच्या तुकड्यामागे', ती हसत बोलली. 'वा वा, फार छान, तू पण शहाणी आहेस', आपल्या तोंडचा पिझ्झा तिच्या ताटात'.

३ दिवसानंतर

 'काय मावशी, कशी झाली सुट्टी', त्याने कामवाल्या मावशीला विचारले. 'खूप छान झाली', ताईने ५०० रुपये दिले होते मला, सणाचा बोनस म्हणून',. 'मग जाऊन आली का नातवाकडे'? 'हो जाऊन आली, मस्त ५०० रुपये खर्च केले २ दिवसात'. 'म्हणजे काय केल नेमकं'? 'नातवासाठी बाजारातून १५० रुपयाचा ड्रेस घेतला अन ४० रुपयाची बाहुली, मुलीला छानपैकी ५० रुपयाचे पेढे घेतले, ५० रुपयाचा मंदिरात नैवद्य दिला, 60 रुपये रिक्षाभाडे, २५ रुपयाच्या मुलीला बांगड्या घेतल्या, ५० रुपयाचा जावईबापूसाठी बेल्ट अन उरलेले ७५ रुपये नातवाच्या हातात दिले'. तिने झाडू मारता मारता तत्काळ खर्च मांडला. '५०० रुपयात इतके काही', तो आश्चर्याने म्हणाला अन विचार करू लागला.

त्याच्या डोळ्यासमोर ८ तुकडे केलेला पिझ्झा उभा राहिला. तो एकटक कल्पनेतल्या पिझ्झाकडे पाहू लागला. एक एक तुकडा त्याच्या डोळ्यामध्ये घुसू लागला. त्या एक एक पिझ्झाच्या तुकड्याशी तो कामवाल्या बाईच्या सणावरील खर्चाशी तुलना करू लागला. पहिला तुकडा नातवाच्या ड्रेसचा, दुसरा पेढ्याचा, तिसरा तुकडा मंदिरातील नैवद्य, चौथा रिक्षाभाडे, पाचवा बाहुलीचा, सहावा मुलीच्या बांगड्याचा, सातवा तुकडा जावईबापूचा बेल्ट अन आठवा तुकडा नातवाच्या खाऊसाठी पैसे. पिझ्झा त्याच्या डोळ्यासमोर फिरू लागला, एका तुकड्या मागे दुसरा तुकडा, अन तुकड्यावरील ड्रेस, बांगड्या अन तिचा सण..... एका पिझ्झ्याची त्याला दुसरी बाजू आज दिसली होती. पिझ्झ्याचे ८ तुकडे त्याला काही शिकवून गेले होते, जगण्याचा अन खर्च करण्याचा नवीन अर्थ. सचिन मेंडीस

बा-बयशी भेट !!

बा-बयशी भेट !!

वसईतील कुपारी समाजाला फार मोठा इतिहास आहे, परंतु दुर्दैवाने तो दृक्श्राव्य स्वरुपात जतन झालेला नाही. आपल्या जुन्या चालीरीती, गाणी, जुने संदर्भ, समाजाला कलाटणी देणाऱ्या घटना ह्या फक्त मौखिक स्वरुपात जुन्या पिढीकडून नव्या पिढीकडे हस्तांतरित झालेल्या आहेत. मागच्या एक दशकाचा आढावा घेतल्यास इंटरनेट तंत्रज्ञानाने जग जवळ आणले आहे, परंतु त्या स्वरुपात जुन्या पिढीचे नव्या पिढीकडे होणारे ऐतिहासिक संदर्भाचे हस्तांतर कमी झालेले आहे. आपल्या कडे अनेक वडीलधारी मंडळी आहेत, ही मंडळी जो पर्यंत हयात आहेत, तोपर्यंतच जुना इतिहास त्यांच्याबरोबर राहील. पण पुढे काय?. ह्या वडीलधारी मंडळीकडून बरीच माहिती आपण जमवून येणाऱ्या पिढीसाठी लिखित किव्हा ध्वनीमुद्रित स्वरुपात साठवून ठेऊ शकतो. स्वातंत्र्यपूर्व काळातील वातावरण, तेव्हाची शेती, राहणीमान, लग्नसोहळे, दुष्काळ, रोगराई, भुताखेताच्या गोष्टी असा अनेक माहितीचा खजाना आपण त्यांच्याकडून मिळवू शकतो. सदर गोष्टीचा विचार करता सचिन मेंडीस व रॉजर रोड्रिग्ज ह्याने पुढाकार घेऊन आपल्या विविध गावातील 'बय-बाबा' च्या मुलाखती घेण्याचे ठरविले आहे. सदर मुलाखत विडीओ रेकोर्डिंग करून सोशल मिडियाद्वारे आपल्यापर्यंत पोहोचवली जाईल. ह्या कामी ‘स्वाभिमानी वसईकर संघटना' आर्थिक सहाय्य करणार आहे. दुर्दैवाने ह्या कुपारी समाजातून शेवटचे 'बय-बाबा' जेव्हा हे जग सोडून जाईल, तेव्हा एक मायेच पर्व संपलेलं असेल. अन मग एक न पचवता येणार अस्वस्थ सत्य अन एक प्रचंड पोकळी कधीही न भरून येणारी....!!

स्वाभिमानी वसईकर संघटना प्रायोजित 'बा-बयशी भेट' ह्या कार्यक्रमाचा पहिला भाग अलीकडेच शूट झाला. सकाळच्या रम्य प्रहरी केळीच्या बागांमध्ये बयच्या बरोबर गप्पा रंगल्या अन जुन्या अनुभवातून मन श्रीमंत होत गेले. कार्यक्रमाचा सूत्रसंचालक ह्या नात्याने बयला बोलते करणे, हे आयोजाकापुढे एक आव्हान होते, पण बयची उमेद अन बोलण्यातील सहजता कार्यक्रमाला एक वेगळ्या उंचीवर घेऊन गेली. 'मी शिकली असती तर एक शिक्षिका बनून आज पेन्शन घेत असती', हे त्या नव्वदीतल्या बयचे उद्गार थक्क करणारे. बोळींज-जापके येथील 'अनीबाई लोपीस' ह्या 'बा-बयशी भेट'च्या पहिल्या भागाच्या पाहुण्या. लवकरच येत आहे 'बा-बयशी भेट'चा पहिला विडीयो आपल्या भेटीला, आपल जीवन अन अनुभव समृद्ध करण्यासाठी. आपल्या गावातील बाबा किव्हा बयला येणाऱ्या कार्यक्रमात सामील करावयाचे असल्यास कृपया आमच्याशी संपर्क करावा.



स्वाभिमानी वसईकर संघटना