Monday, February 9, 2015

चिल्लर


आज सकाळी कामावर निघायला उशीर झाला अन घाईत निघाल्याने खिशात पैसे घेण्याचे विसरून गेलो. उशीर झाल्याने नेहमीची ७.१५ ची ट्रेन आज मिस झाली. स्टेशनला पोहोचल्यावर खिशात पैसे न घेतल्याची जाणीव झाली. नशिबाने ट्रेनचा पास माझ्या नेहमीच्या बॅंगमध्ये असल्याने तशी जास्त धास्ती नव्हती परंतु जोगेश्वरी स्टेशन वरून ऑफिसला जाण्यासाठी शेअर रिक्षाचे ९ रुपये हाती असणे गरजेचे होते. नेहमीची ट्रेन मिस झाल्याने आजूबाजूच्या गर्दीत १०-२० रुपये कुणाकडून उसने घेण्यासारखे कुणी हक्काचे नव्हते. मी सहज म्हणून बॅंगच्या एका खिशात हातात हात घातला अन त्यात काही चिल्लर मला दिसली. मी खिशात हात घालून चिल्लर वर काढली तर त्यात एक ५ रुपयाचे नाणे अन बाकी १ रुपयाची चिल्लर मला दिसली. ५ रुपयाचे नाणे पाहून मला खूप हायसे वाटले.

जोगेश्वरी स्टेशनला ट्रेन मधून उतरून मी ब्रिजवर चढलो. रिक्षात बसण्यापूर्वी चिल्लर मोजावी म्हणून ब्रिजवर चालता चालता मी ती चिल्लर बॅंगमधून बाहेर काढायला गेलो अन दुर्दैव माझे की ५ रुपयाचे नाणे अन बाकी २-३ कॉईन माझ्या हातातून खाली निसटले. मला काही कळायच्या आत हातातील ५ रुपयाचे नाणे घरंगळत ब्रिजच्या खाली असलेल्या केबिनच्या छतावर जाऊन पडले. दुष्काळात तेरावा महिना जे काही सांगतात तसे माझ्या बाबतीत त्या क्षणाला घडत होते. जोगेश्वरी पूर्वेला स्टेशन जवळ ATM नसल्याने आज पायी जावे लागेल कि काय असे क्षणभर माझ्या मनात आले. मी हातात उरलेले कॉईन मोजू लागलो अन सुखद धक्का बसला. २ रुपयांची ३ अन १ रुपयांची ४ नाणी असे एकूण १० रुपये माझ्या मुठीत होते. मला क्षणभर 'दुनिया मुठ्ठी में' वाटू लागले. बागच्या खिशात अनेक दिवस अडगळीत पडलेली चिल्लर आज कामी आली होती. ज्या ५ रुपयाच्या नाण्यावर विश्वास ठेऊन मी विरारहून निघालो होतो त्त्यानेही ऐन वेळेला दगा दिला होता.

आयुष्याचं पण असंच असते नाही? मोठ्या नोटासारखी भासणारी श्रीमंत, प्रतिष्टीत, वलयांकित माणसे आपल्याला हवीहविसी वाटतात. त्यांच्या सहवासात आपला उद्धार होईल असे मनोमन वाटते. सुंदर, चकाचक दिसणारी, उंची वस्त्रे परिधान करणारी ही मोठी माणसे संकटात आपल्याकरिता पटकन धावून येतील असे वाटते. दुसऱ्या बाजूने विचार करता पैशाने गरीब, चर्चेत नसलेली, बिनचेहऱ्याची माणसे आपल्या आयुष्यात असूनही तशी आपल्या खिजगणतीतही नसतात. आपल्या दृष्टीने ती चिल्लर असल्याने त्यांच्या असण्याची, त्यांच्या जगण्याची आपण योग्य ती दखल घेत नाही, त्यांना पुरेसा वेळ अन सन्मान देत नाहीत. पण वास्तव काय आहे? अडीअडचणीला कोण धावून येतात? मोठ्या नोटासारखी भासणारी श्रीमंत, प्रतिष्टीत, वलयांकित माणसे कि पैशाने गरीब, चर्चेत नसलेली, बिनचेहऱ्याची चिल्लर माणसे? वर नमूद केलेल्या एका घटनेने एक शाश्वत वास्तव पुन्हा अधोरेखित केलं होत अन ते म्हणजे नाती अन मैत्री जोडताना श्रीमंत, प्रतिष्टीत, वलयांकित ह्या 'दिखाऊ' निकषावर न भाळता, निस्वार्थीपणे अडीअडचणीला धावुन येणारी चिल्लर पण 'टिकाऊ' बिनचेहऱ्याची माणसे आयुष्याच्या एका खिशात जपणे गरजेच आहे. छोटी असली तरीही तीच खरी नाती जपतात.

पुरस्कार

प्रसिद्ध साहित्यिक 'दुमा लुद्रिक' ह्यांना मानाचा 'शिमा कुरेल' पुरस्कार जाहीर !

१९७० च्या दशकात क्रांतिकारी लिखाण करून कुपारी साहित्यात खळबळ माजवणारे प्रसिद्ध साहित्यिक दुमा लुद्रिक ह्यांच्या 'तांबडा धान' ह्या कादंबरीला मानाचा 'शिमा कुरेल' पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. १९७० च्या दशकात त्यांनी लिहिलेल्या अनेक पुस्तकाने कुपारी वाचकांना मोहीनी घातली होती. 'मोडलेलो मांडव' ही त्यांची कादंबरी बेधडक लिखाणामुळे त्या काळी भलतीच गाजली होती. 'मिन्गरसा दार', 'दापुड्सो हिंदाळो', 'माटुंगा गेलो ते', 'आडसळ' ही त्यांची प्रसिद्ध पुस्तके अजूनही लोकांच्या स्मरणात आहेत. 'माटुंगा गेलो ते' ह्या पुस्तकातील 'पेद्रू अण्णा' ह्या पात्रामुळे त्या काळी वाद निर्माण होऊन वसई सेशन कोर्टाने त्या पुस्तकावर बंदी आणली होती, जी पुढे मुंबई हायकोर्टाने मागे घेतली. १९८० साली त्यांनी लिहिलेल्या 'फरसुल्या' ह्या कविता संग्रहाला महाराष्ट्र शासनाचा साहित्यभूषण पुरस्कार लाभला होता. ह्या दीर्घकविता संग्रहात त्यांनी अठवरा राहिलेल्या फरसुल्या ह्या व्यक्तीरेखेचे करुण चित्रण केले होते. त्याचप्रमाणे त्यांनी अलीकडे लिहिलेल्या 'आय सो नवरो' ह्या नाटकावर दक्षिणेत मनिरत्नम ह्यांनी 'आय सो हसबंड' हा चित्रपट बनवण्याचे नुकताच घोषित केले आहे.

प्रवाहाविरुद्ध विचार मांडणी व वास्तव काळाला अभिप्रेत लेखन ह्या गुणांमुळे दुमा लुद्रिक ह्यांनी कुपारी साहित्याला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवले. आगामी काळात मौज प्रकाशन तर्फे त्यांचा 'हिपना तापला' अन 'तू बाबा डोखा' हे दोन पुस्तके प्रकाशित होणार आहेत.येत्या रविवारी सुप्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते अन विचारवंत 'अतू पिरेल' ह्यांच्या हस्ते ओलांडा येथे त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येईल. ह्यावेळी 'गावठी ताता' ह्या मनोरंजक नाटकाचे आयोजन केले आहे.