Tuesday, June 10, 2014

आडसळ' !!



'आडसळ' हा शब्द ऐकला तरी पटकन हसू येते. हा शब्द खूप विनोदी वाटत असला तरी मला त्या विषयी एक सुप्त आकर्षण अन मनापासून सहानभूती आहे. 'आडसळ' हे विशेषण आपल्या बोली भाषेत नारळाच्या संबंधात वापरले जाते. नारळाच्या उपयुक्ततेनुसार शहाळाचे पाणी देणारी अवस्था तर पूर्ण वाढ झाल्यावर मिळणारे खोबरे हि अवस्था उपयोगाची समजली जाते. ह्या दोन्ही अवस्थेच्या मध्ये अर्धवट असलेला बिनकामाचा नारळ म्हणजे 'आडसळ'. शहाळाचे पाणी प्यायला नारळ फोडावा अन तो 'आडसळ' निघावा असा अनुभव ज्याला येतो त्याचे दुक्ख: त्यालाच माहित.

नारळाला दिलेले हे विशेषण मग आपण माणसाला का वापरतो?. अमुक अमुक व्यक्ती 'आडसळ' आहे, अस आपण सहज बोलून जातो मग त्या मागचे तर्कशास्त्र कोणते? ती व्यक्ती अर्धवट? त्याच विशिष्ट परिस्थितीत त्याच वागण बिनकामाच? 'तो ना साफसूफ 'आडसळ' नाळ हाय' असा कादोडी भाषेत शेरा ऐकताना त्या 'आडसळ' व्यक्तीच कोणत चित्र पुढे येत?. चला कुठून तरी माझ्या कानी पडलेली दोन उदाहरणे बघू.

एका चर्चमध्ये धर्मगुरूला लग्नाच्या मिस्साला मिस्सा संपायच्या अगोदर वाजणाऱ्या फटाक्याचा खूप त्रास व्हायचा, जे रास्त होत. एके दिवशी त्या धर्मगुरूने लग्नाचा मिस्सा संपायच्या अगोदर एक गुगली टाकली. त्यांनी म्हटले, 'आता बघा, काही तरुण बाहेर मिस्सा चालू असताना फटाके फोडतील अन मिस्साचे पावित्र्य भंग करतील. अन हे कोण करतील माहित आहे का?, जे 'आडसळ' असतील तेच करतील'. झाले, धर्मगुरूचा नेम बरोबर लागला होता, फटाके फोडण्याच्या तयारीत असलेल्या त्या मुलांना आपण 'आडसळ' नसल्याच सिद्ध करण्यासाठी फटाके न वाजवणे भाग होते अन तेच धर्मगुरूला हवं होत. त्या दिवशी फटाके वाजले नाहीत. मन विचार करू लागले, कोण असतात हि मुले? उत्साही, सांगकाम्या टाइपची, नवरा घरून निघून लग्नलावेपर्यंत फटाक्याची तिजोरी हातात घेऊन फिरणारी. हीच ती मुले आनंदाने निरागसपणे फटाके फोडणारी अन दुसर्याकडून स्वता:ला 'आडसळ' म्हणवून घेणारी.

दुसर उदाहरण पाहू, सोयरिक होऊन जावईबापू पहिल्यांदाच सासुरवाडीला गेले होते. पाहुणचार म्हणून अंड्याचे चार तुकडे, पाव किलो तळलेले कोंबडीचे पीस, अन पाव किलो मिठाई जावईबापूच्या पुढे ठेवली होती. तसे जावईबापू खाण्याच्या बाबतीत त्यांच्या गावात कुप्रसिद्ध होते पण सासुरवाडीपर्यंत हा लौकिक पोहोचला न्हवता अन त्यात मध्यस्थाला दोष देणे हि अति झाले असते. जावईबापूला २४ तास भूक लागलेली, तशी भूक हि माणसाची मुलभूत प्रेरणा आहे पण स्थळ-काल वेळ पाहून भुकेचे नियमन करणे खूप गरजेच असते. तर झाले असे कि जावईबापूने प्लेटला जो हात घातला तो शेवटी प्लेट शून्य होईस्तोवर काढला नाही. सासूबाई जावईबापूला 'प्लेटला हात लावा' बोलायला उभी होती पण दुर्दैवाने तिला ती संधी मिळाली नाही. दुसऱ्या बाजूला हातात टॉवेल घेऊन उभी असलेली त्याची वाग्दत वधु आपल्या भावी पतीचे कुंभकरणीय रूप बघून अचंबित झाली होती. एवढा नाश्ता केल्यावर जावईबापू कमी जेवतील असा सासरेबुवाने केलेला भोळा अंदाज नंतर जावईबापूने चुकीचा ठरवला होता. जे व्हायचे होते तेच झाले, जावईबापू निघून गेल्यावर मुलीने हंबरडा फोडला, 'मला त्या 'आडसळ' मुला बरोबर सोइरिक ठेवायची नाही', असे निक्षून सांगून 'वन डे' सामन्याचा निकाल लावला. भुकेचे नियमन करणे कठीण केल्याने जावईबापूने सामना सुरु होण्यापूर्वीच विकेट गमावली होती अन 'आडसळ' असल्याचे परमवीरचक्र मिळवले होते.

दोन्ही उदाहरांतील व्यक्ती 'आडसळ' म्हणून गणली गेलेली असली तरी त्यांच्या व्यक्तीत्वामध्ये एक निरागसपणा होता. दुसर्यांच्या लग्नात फटाक्यांची हमाली करणारा व काळ-वेळ न पाहता आपल्या भुकेचे नियमन न करणारा, ह्या दोन्ही व्यक्ती म्हणजे तसे निष्पाप जीव. आजच्या ढोंगी गर्दीत मुखवटे घालुन फिरणाऱ्या लोकांत त्यांचा थोडाच निभाव लागणार होता. आजचा जमाना पोटात एक अन ओठात दुसरे असा जगण्याचा बनला आहे त्यामुळेच मुखवटे न घालू शकणारे बहुतेक समाजाच्या दृष्टीने 'आडसळ' ठरत असावेत किव्हा कोणत्या प्रसंगी कसे वागावे ह्याची जाणीव न ठेवता स्वतचे हसे करून घेणारे 'आडसळ' ह्या व्याखेत बसत असावेत. आपल्याला कधी कुणाला 'आडसळ' म्हणावे वाटले होते काय? आपल्या दृष्टीने 'आडसळ' कोण?.

(टीप: 'आडसळ' हा शब्द कुठून अन कसा आला ह्याचा कुतूहलापोटी मी शोध घेतला अन माहिती मिळाली कि 'ज्यातून पाण्याने भरलेले शहाळे निघेल असा अख्खा न सोललेला नारळ म्हणजे 'अडसर वा 'आडसर', ज्याचा आपल्या बोली भाषेत 'आडसळ' असा अपभ्रंश झाला व पुढे ह्या शब्दाचा मजेशीरपणे एखाद्या व्यक्तीला चिडवण्यासाठी वापर होत गेला.)

© सचिन मेंडीस
.

'ते' हरले 'आपण' जिंकलो !!



लोकसभा निवडणुकीच्या मतदानाचा दिवस. एकाच गावातले दोन धडाडीचे तरुण मतदान केंद्राच्या बाहेरील दोन वेगवेगळ्या गटाच्या बूथवर बसले होते. एकाच्या नातेवाईकाचे व्यावसायिक हितसंबंध 'विरार'कडे असल्याने त्याने अंगात पिवळा टि-शर्ट परिधान करून तो शिटीसेनेत काम करीत होता. तर दुसरा तरुण काहीही करून 'शिटी' पाडायची असा निश्चय करून ह्यावेळेला भाजपचे 'कमळ' फुलवण्यासाठी मोदीमय झाला होता.

जसजसी मतदान केंद्रावर गावातील मतदाराची पाऊले सरकत होती तसतशी ह्या दोन तरुणांच्या नजरेमधील खुन्नस वाढत होती. कसाही करून आपलाच उमेदवार जिंकणार अशा अविर्भावात दोघे बूथवर फिरत होते. एकाच गावातील असूनही त्यांचे पाठीराखे तरुण सम प्रमाणात त्या दिवसापुरता का होईना 'भगवे' अन 'पिवळे' असे वाटले गेले होते. कुणी वयस्कर मतदार बूथच्या जवळ येताना दिसला कि दोघेही त्यांच्या कडे धाव घ्यायचे अन त्यांना आपल्या उमेदवाराला मत द्यायला विनंती करायचे. 'दादे, आपला मत शिटीला दयासा हा, वरणे ६ वा बटन', पहिल्याचा विनंतीचा सूर.तर दुसरा 'दादे, आपले दुकाने फोडले ता कहा भाहयासा, ह्यावेळेला कमळ दादे'. पुन्हा एकदा एकमेकावर नजरानजर अन खुन्नस. दोनी बाजूने आवाज अन एकेमेकांचा उद्धार.

दुपार जवळ आली होती तसं तशी गर्दी कमी होत गेली. तरुण पोरांचे पोटे भुकेले होती. शिटीच्या बूथवरील तरुणाने पटकन गरमागरम वडे अन पेप्सी मागवली. ते पाहून दुसर्या बूथवरील कमळवाल्या तरुणाने समोसा अन कोकाकोला मागवून घेतले. शीतपेय पोटात जात असताना एक वेगळेच शीतयुद्ध दोन गटात सुरु झाले होते. एकाच गावातील एकत्र खेळणारी तरुण मुले त्या दिवशी वाटली गेली होती. कमळ वाला तरुण आपल्या स्मार्ट फोनवरून फेसबुक वर आपल्या गावच्या ग्रुपवर आपल्या बूथवरील गर्दीचे फोटो अपलोड करीत होता तर शिटी वाला तरुण गावातल्या वॉटअप्प्स ग्रुपवर पिवळी गर्दी शेर करीत होता. पुन्हा एकदा एकमेकावर नजरानजर अन खुन्नस.

पूर्ण दिवसभर दोन्ही बाजूने आवाज अन एकेमेकांचा उद्धार. एकदा सायंकाळ झाली अन शिटी अन कमळ चे बूथ थंड झाले अन एकाच गावातले दोन पक्षीय गट घराकडे निघाले. बूथवरील आवरा आवर करून ते दोघेही धडाडीचे कार्यकर्ते आपल्या गाड्या घेऊन गावाच्या दिशेने निघाले. जाताजाता दोघात शाब्दिक बाचाबाची सुरु होती. '१६ मे ला बळीराम ची 'शिटी' पडणार असा टोमणा कमळ वाल्याने दुसर्याला मारला तर दुसर्याने '१६ मे ला 'कमळ' बुडून चिंतामण 'चिंतामग्न' होणार असा प्रतिटोला लगावला. पुन्हा एकदा एकमेकावर नजरानजर अन खुन्नस. एका गावातले शालेय सवंगडी दोन पक्षात वाटले गेले होते. एका निवडणुकीने दोघात एक भिंत उभी राहिली होती.

दोघांच्या गाड्या गावात आत शिरल्या अन थोडे पुढे जाणार तोच समोरच्या घरच्या ओटीवर एका बाईचा किंचाळण्याचा आवाज आला. झोपाळ्यावर खेळणारे तिचे ६ वर्षाचे लेकरू तोल जाऊन रस्त्यावर पडलेले दोघांना दिसून आले. दोघांच्या गाड्या जागच्या जागी थांबल्या. एकाने धावत जाऊन त्या मुलाला उचलून घेतले तर दुसर्याने ताबडतोब जाऊन बर्फ आणले व मुलाच्या डोक्यावर धरले. त्या मुलाच्या डोक्यातून रक्त वाहत होते अन त्याला तत्काळ हॉस्पिटलला नेणे गरजेचे होते. 'शिटी' वाल्याने त्याची गाडी सुरु केली अन 'कमळ' वाल्याने तत्काळ त्या मुलाला खांद्यावर घेतले अन तो शिटी च्या पाठीशी गाडीवर बसला अन गाडी वेगाने हॉस्पिटल कडे निघाली. दोघात उभी राहिलेली भिंत आता पडली होती. 'भगव्यात' 'पिवळा' रंग विरघळून दोघानाही खराखुरा 'कुपारी' रंग चढला होता. त्या मुलाला वेळीच उपचार मिळाल्याने गंभीर प्रसंग टळला होता.

हॉस्पिटल मध्ये बाहेर उभे असताना एकाने जाऊन मस्त कोकच्या थंडगार बाटल्या आणल्या अन एक बाटली दुसऱ्याच्या हातात दिली. दोघांनी एकेमेकांना चिअर्स करून बाटली तोंडाला लावली अन एकत्र फोटो घेऊन फेसबुकवर गावच्या ग्रुपवर अपलोड केले. फेसबुक वर पोस्ट केलेल्या फोटोवर एकामागून एक कमेंट येत होत्या अन सर्वांचा सूर होता ' We are one ' . आता १६ मे पर्यंत निकालाची वाट पाहण्याची गरज न्हवती, मतदानाच्या दिवशीच निवडणुकीचा निकाल लागला होता. दोन्ही राजकीय पक्ष हरले होते अन 'कुपारी गावकरी' बिनविरोध निवडून आले होते.

सचिन मेंडीस

आठवणी आंब्याच्या !!


Sachin Mendes 4:48pm May 8
आठवणी आंब्याच्या !!

सचिन मेंडीस ©

मे महिन्याची सुट्टी अन आंब्याचे खूप जवळचे असे नाते आहे. सुट्टीच्या दिवसात आंब्यासोबत वेळ न घालवलेला व्यक्ती आपल्या समाजात शोधून हि सापडणार नाही. १९९८०-९० च्या वर्षात शाळेत असणाऱ्या मुलांनी आपली अख्खी उन्हाळी सुट्टी या ना त्या प्रकारे आंब्याच्या आसपास व्यतीत केली आहे त्यामुळेच आंब्याच्या आठवणी प्रत्येकाच्या तितक्याच मधुर अन रसाळ आहेत.

तसं पाहिलं तर हिवाळा संपत आला कि आंब्याच्या झाडावर मोहर येऊन त्याचा सुगंध आसमंतात दरवळत असे अन मग मोहरलेल्या झाडावरून एखादे 'किरमुट' शोधण्यासाठी बच्चेकंपनी मेहनत करीत असे. जस जसा उन्हाळा जवळ येई तसं तसे आंब्याचे झाड आंब्याने व्यापून जाई. साधारण मार्च महिन्यात बऱ्याचशा झाडाला कैऱ्या लागलेल्या दिसत असतं अन त्याची आंबट गोड चव तोंडाला पाणी आणत असे. आम्ही कधी कधी अभ्यासाच्या नावाखाली वाडीत केळीच्या भागात चटई टाकून अभ्यासाला बसत असू. तसा अभ्यास कमी अन घरून आणलेल्या मीठ मसाल्या बरोबर कैऱ्या खाणे हा उद्योग जास्त चालत असे. थोडक्यात अभ्यास हा 'बाय-प्रोडक्ट' असायचा. मधेच कैरीतून निघालेली बी म्हणजे 'कोय' भविष्यातील नवरी शोधण्यासाठी लागू पडायची. दोन बोटात कोय धरून ती उडवायची अन ज्या दिशेला ती पडेल त्या दिशेला असलेल्या गावातली मुलगी नवरी मिळेल अशी चर्चा चालायची. ३६० अशांत कोय फेकून सगळ्या दिशा पालथ्या घातलेल्या माझ्या गावातील एका मित्राला अजूनही 'अठ्वारा' राहायची वेळ का आली, हा संशोधनाचा विषय आहे. कधी बेत जमलाच तर आंब्याची 'चटणी' व्हायची. त्यात साखर, मीठ, मसाला, गोडेतेल अन काळी चिंच घातली जायची अन मस्त पैकी केळीच्या पानावर ती वाटली जायची. घरून चटणी साठी सामान आणताना मला नेहमी 'गोडेतेल' आणायला का सांगितले जात होते त्याचे अर्थशास्त्र मोठेपणी कळाले तेव्हा माझे मलाच हसू आले.

आमच्या गावातील वाडीत शेजारच्या ब्राह्मण व्यक्तीची जागा होती. त्याला आम्ही 'दामूची वाडी' म्हणत असू. त्या वाडीतील कैऱ्या चवीला गोड अन आकाराने मोठ्या होत्या. दुपारच्या वेळेत त्या वाडीतील माणसे जेवायला घरी गेली कि आम्ही त्या वाडीवर गनिमी पद्धतीने चढाई करत असू, कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त आंबे पाडण्याच्या हिशोबाने आम्ही त्या वाडीच्या आसपास अगोदरच दगडाची सोय करीत असू. एक दोन मुले कुणी येते का याची टेहळणी करत असतं अन तेव्हाच मोठ्या प्रमाणात झाडावर दगडाचा मारा होत असे अन काही मिनिटात २०-२५ आंबे हातात येऊन मोहीम फत्ते होत असे. कधी कधी टवाळखोर मुले 'दामू आलो दामू आलो' अशा खोट्या बोंबा मारून सगळ्यांची पळता भुई थोडी करत असतं. आमच्या गावाच्या मधोमध एका घराच्या पाठीमागे एक गोड कैऱ्याच झाडं होत परंतु त्या झाडाखाली पूर्वजांचा साप (ज्याला मराठीत भुजंग अन आपल्या बोली भाषेत 'खेत्रो' म्हणतात)असल्याची वंदता असल्याने आम्ही इच्छा असूनही त्या झाडाच्या वाटेला जात नसू.

परीक्षा संपत येत असताना त्याच हंगामात आंबे पिकायला सुरुवात होत असे. गावातील प्रत्येक आंब्याच्या झाडाला विशिष्ट असे नाव होते. त्यामध्ये तोतापुरी, गीटी, धारणी, काळी आंबा अशी माझ्या परिचयाची नावे. आमच्या गावातला गीटी आंबा खूप प्रसिद्ध होता. साधारण लाडूच्या आकाराचे आंबे त्याला लागायचे, पण 'मूर्ती लहान अन कीर्ती महान' असाच त्याचा लौकिक होता. पण दुर्दैवाने त्या झाडाची उंची खूप जास्त असल्याने फक्त ठराविक मुलांनीच मारलेले दगड तिथे पोहचत असतं. बाकीच्या वयाने लहान मुलांना नैसर्गिक रित्या वारयाने पडणाऱ्या आंब्यावर समाधान मानावे लागे. दुर्दैवाने मी जेव्हा जेव्हा पडलेले आंबे शोधायला जाई तेव्हा अगोदरच काही मुले तिथे पोहोचलेली असतं. जणू काही झाडावरून पडलेले आंबे उचलण्याचा ठेका त्यांनी घेतलेला असावा. काही वेळेला पक्षांनी चोच मारलेले आंबे सापडत असतं जे त्या आंब्याच्या स्थितीवरून ठेवायचे कि फेकायचे ते ठरविले जाई. कधी कधी झाडाखालील दूर कचऱ्यात एखादा पडलेला आंबा दृष्टीस पडायचा परंतु लहान असल्याने तिथे जाण्याची भीती वाटत असे, अन मग तो आंबा मिळवण्यासाठी एखाद्या वयाने मोठ्या असलेल्या मुलाला एक चावा देण्याच्या अटीवर प्रासंगिक करार करून तो आंबा मी मिळवीत असे, ज्याचे अप्रूप काही वेगळेच. बरयाच वेळेला एखाद्या झाडावर एखादा गर्द पिवळा आंबा आढळत असे ज्याला आम्ही 'बुलबुल' म्हणत असू. असा आंबा मिळवण्यासाठी अख्खी दुपार दगडांचा मारा त्या दिशेने होत असे. ज्याच्या दगडाने तो आंबा पडत असे त्याला स्वयंवरात एखादी राजकुमारी मिळवल्याचा आनंद वाटत असे. काही वेळेला कच्चे आंबे पडून ते पेंढ्यात खालून पिकविले जात परंतु जी मजा झाडावर पिकलेल्या अन दगडाने पाडलेल्या आंब्यात होती ती घरी पिकविलेल्या आंब्यात नक्कीच न्हवती.

पावसाळ्यात लागणाऱ्या लोणच्याची तयारी म्हणून बरीच मंडळी मे महिन्यात अंगणात दुपारच्या उन्हामध्ये खाटेवर मीठ लावून आंब्याच्या फोडी वाळत घालत असतं. अशा मीठ लावून रेडीमेड खाण्यासाठी तयार असणाऱ्या फोडीवर डल्ला मारणे जास्त अवघड नसे. कारण नसताना उगाच जाता येता दोन दोन फोडी उचलून प्रत्येक जण आपली सोय करत असे.

एक वर्षी आमच्या गावातील बच्चेकंपनीला क्रिकेटसाठी काही साहित्य आणायचे होते. आमच्या क्रिकेट मंडळाची आर्थिक स्थिती बेताचीच असल्याने काही हुशार मुलांनी दूरच्या वाडीतली आंब्याची झाडे खाली करून ते विकून आलेल्या पैशातून क्रिकेट साहित्याची सोय केली होती. आजच्या घडीला BCCI ने IPL सारखे टुकार खेळ भरवण्यापेक्षा ह्या बाबतीत आमचा आदर्श डोळ्यासमोर ठेवावा :-)

आज मागे वळून आंब्याच्या आठवणी जाग्या करताना बदललेल्या परिस्थितीची जाणीव होते. नवीन घरासाठी जागा म्हणून बहुतेक गावातील आंब्या चिंचेच्या झाडाचा बळी गेलेला आहे. जे उरलेली आंब्याची झाडे आहेत त्याची दाखल घेणारी पिढी आज राहिली नाही. आंब्याच्या झाडावर दगड मारणारी मुले आता कमावते पालक झालेली असून त्यांच्या मुलांच्या वाट्याला मार्केट मधील महागडा हापूस आला आहे जो धुऊन कापून अन साल काढून त्यांच्या पुढ्यात ठेवला जातो. खरंच काळ किती बदलला. माणसे बदलली, मुलांची खेळण्याची अन जगण्याची साधने बदलली. कधी कधी उगाच वाटते कि मे महिन्यात हीच आंब्याची झाडे वर्षोन वर्षे त्यांच्या पायायी येऊन आंबे लुटणाऱ्या मुलांची वाट पाहत असतील का? अशा अचानक तुटलेल्या नात्यामुळे त्याचे जगणे कोरडे झाले असेल का? त्यांच्या अंगणातील हरवलेला मुलांचा किलबिलाट त्यांना असह्य करत असेल का? पुन्हा येईल का मोहर तसाच त्या दुरावलेल्या आंब्यांना अन रुजेल का नवीन झाडं नवीन पिढीच्या जीवनात त्यांच्या असण्याच? मला खात्री नाही, पण बघू या काय काय होते ते येणाऱ्या काळात.

सचिन मेंडीस©

विहीर

'जो बात विहीर में थी वो स्विमिंग पूल में कहा'? शाळेत असताना वार्षिक परीक्षा संपल्या कि पहिली धाव घ्यावयास वाटे ती गावतल्या विहिरीवर. एक तर एप्रिलचा महिना. अंगाची लाहीलाही वर इतके दिवस इच्छा नसताना अभ्यास करण्यासाठी घरात डांबून घ्याव लागे ते वेगळंच. शाळेतून घरी आल्यावर घाईघाईत जेवण करून धाव मारायची ती विहिरीकडे. पाण्याचा अंदाज घेऊन वरून मस्त विहिरीत उडी मारून शरीर मनोसोक्त डुंबवून घेतलं कि मन प्रस्सन होत असे. आमच्या गावातील विहीर प्रचंड मोठी. 'वाळूवर' नावाच्या वाडीत चिंचा अन आंब्याच्या सावलीत उठून दिसणारी. अतिशय चांगल्या प्रतीच्या दगडाने स्वातंत्र्यपूर्व काळात बांधली असल्याने तीच रूप अन रुबाब अवर्णनीय असंच होत. दुपार झाली कि गावातली संपूर्ण बच्चे कंपनी 'वाळूवर' खेळायला जात असत. विहिरीवर मनोसोक्त अंघोळ करणे, नवीन शिकाऊ मुलांना केळीच्या खोडाने किव्हा प्लास्टिक ड्रम वापरून पोहायला शिकवणे तसेच नवशिक्याला बुडवून त्याची टर खेचणे हे नित्याचे उद्योग. कधी कधी बुडी मारून तळातली माती काढण्याची पैज लागे अन 'दम' असलेल्या मुलाची दमदार कामगिरी रोमांचित होऊन पाहायला मिळे. काहीजण विहिरीला ५-६ प्रदक्षिणा घालून आपली ताकद आजमावून पाहत असत जे खरचं प्रेरणादायी वाटायचं. बर्याच वेळेला विहिरीत असलेले साप (नानेटी अन दिवाड) पोहण्याची मजा हिरावून घेत असत. पोहताना चुकून हे साप बाजूला येवून चुंबन घेतील अशी भीती वाटत राहायची. विहिरीतील पकडापकडीचा खेळ खूपच कठीण. त्यातल्या त्यात पाण्याखाली दम धरणाऱ्या मुलांना पकडणे फारच जिकीरीचे. पण हा खेळ खेळताना कस लागायचा अन व्यायाम हि मस्त व्हायचा. मे महिन्याच्या शेवटी जेव्हा पाणी खाली जायचे तेव्हा विहिरीच्या पायथ्याशी असणार्या झऱ्यामधून येणाऱ्या पाण्याची चव किती गोड अन तहान भागवणारी. जसं जसा पावसाला जवळ यायचा तसा विहिरीत झावळ्या टाकल्या जायचा जेणेकरून त्या भिजवून नंतर त्या वळण्यासाठी तयार व्हायच्या अन मग विहीर पोहण्यासाठी कमी पडायची. आज तुरळक प्रमाणात अशा पोहण्यायोग्य विहिरी मागे राहिल्या आहेत. ज्या आहेत त्याची सुद्धा डागडुजी न झाल्याने त्या धोकादायक बनल्या आहेत. वेळ काळ बदलली तशी विहिरीची जागा क्लोरीनयुक्त स्विमिंग पुलाने घेतली पण 'जो बात विहीर में थी वो स्विमिंग पूल में कहा'? आठवणीच्या विहिरीत, मन रमते आज फार ! पुन्हा फिरुनी घ्यावी डुबकी, अंग भिजवावे गारगार !

आपल्यात वाद नको .




सध्या लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने फेसबुकच्या ह्या व्यासपीठावर वेगवेगळी मते व वयक्तिक शेरेबाजी निदर्शनास येत आहे. आपण सर्व सुशिक्षित अन हक्काच्या बाबतीत जागरूक असल्यामुळे आपल्या सर्वाचे एक विशिष्ट राजकीय मत आहे अन सर्वांनी एकमेकांच्या मताचा आदर राखला पाहिजे, असे मला वाटते.

भिन्न राजकीय विचारसरणीचे लोक वेगवेगळ्या उमेदवाराच्या समर्थनार्थ लिखाण करीत असतना काही वेळेला वयक्तिक दोषारोप करतात, जे योग्य नाही. काही मूठभर लाभार्थी सोडले तर आपल्या समाजाचा मुख्य शत्रू कोण आहे, हे आपल्या सर्वास ठाऊक आहे, त्यामुळे आपापसात मतभेद करून आपली शक्ती अन एकता व्यर्थ घालण्यापेक्षा ह्या निवडणुकीचा फायदा घेऊन आपल्या शत्रूला कसे चारी मुंड्या चित करू शकू ह्या दिशेने आपण प्रामाणिक प्रयत्न केले पाहिजे.

निवडणुका येतात अन जातात परंतु गाव पातळीवर निर्माण झालेले मतभेद उगाच पुढे कटुता निर्माण करतात व आपल्या ऐक्यास बाधा आणतात. आपण 'कुपारी' म्हणून एक कुटुंब आहोत अन अडी-अडचणीला 'एक कुपारी समाज' म्हणून एकमेकांना मदत करीत आलेलो आहोत व भविष्यातहि आपल्या गावात आपणच एकमेकांच्या अडचणीत एकमेकांचे सोबती राहणार आहोत. उद्या गावात एखादा तातडीचा प्रसंग निर्माण झाल्यास पहिला मदतीला धावून येणारा आपला 'कुपारी शेजारी' असेल, आपल्यासाठी दिल्लीहून सोनिया, मोदी, केजरीवाल अन बळीराम येणार नाहीत हे ध्यानात ठेवा. गरज नसताना एकमेकावर होणारी वयक्तिक चिखलफेक टाळून आपण येणाऱ्या काळात 'एक कुपारी कुटुंब' म्हणून एकत्र राहिले पाहिजे अन आपल्या मुख्य शत्रूच्या विरोधात मतदान करण्यसाठी सज्ज झाले पाहिजे.

सचिन मेंडीस

Palghar loksabha


Sachin Mendes 7:07pm Apr 16
पालघर लोकसभा निवडणूक: आपले मत कुणाला?

लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजल्या पासून ही निवडणूक देशपातळीवर चर्चेची तितकीच उत्सुकतेची झालेली आहे. ह्या मध्ये देशभर झालेले घोटाळे, लोकांची वाढलेली साक्षरता हे घटक जेवढे कारणीभूत आहेत तितकीच प्रसिद्धी माध्यमामुळे विशेष करून सोशल मीडियामुळे निवडणूक घराघरात पोहचली आहे. आपल्या समाजाचा विचार करता स्थानिक पातळीवरील ग्रामपंचायत अन पंचायत समितीच्या निवडणुकीपासून दूर राहणारा आपला युवावर्ग मोठ्या जोशामध्ये निवडणुकीच्या चर्चेमध्ये सहभागी होताना दिसत आहे. आपल्या युवा वर्गाला राजकारणाविषयी उत्सुकता निर्माण करण्यामध्ये जितका सोशल मीडियाचा वाटा आहे त्यापेक्षा कित्येक पटीने जास्त अलीकडच्या काळात आपल्या हक्कासाठी आंदोलने करणाऱ्या अन विधानसभा निवडणुकीत वसईत ऐतिहासिक राजकीय परिवर्तन घडवून आणणाऱ्या स्वाभिमानी तरुणाईची भूमिका आहे. कुणी कितीही नाकारले तरी समाजाच्या हक्कासाठी राजकीय चळवळीत भाग घेऊन व्यवस्था परिवर्तन करण्याचे किंबहुना सत्तेतील शुक्रचार्यावर अंकुश ठेवण्याचे व तरुण पिढीच्या राजकीय जाणीवा प्रगल्भ करण्याचे कार्य स्वाभिमानी तरुणांनी नक्कीच केले आहे.

काही दिवसा अगोदर पालघर लोकसभा मतदारसंघ निवडणुकीसाठी कॉंग्रेस, भाजपा अन बहुजन विकास आघाडी अशा तीन मोठ्या राजकीय पक्षामध्ये खरी चुरस होती. राज्यमंत्री राजेंद्र गावित ह्यांच्यासारख्या चांगल्या प्रतिमेच्या तरुण मंत्र्याला कॉंग्रेसने बहुजन विकास आघाडीविरोधात उमेदवारी दिल्याने वसईतील ख्रिस्ती लोकांत एक चांगला संदेश गेला होता. मागील काही वर्षात सरकारी पातळीवर विविध कामासाठी त्यांनी आपल्या समाजाला वेळोवेळी मदत केल्याने व महापालिकेतून गावे वगळण्यासाठी सरकार दरबारी आपल्याला पूरक अशी भूमिका घेतल्याने स्वाभिमानी वसईकर संघटनेने सर्व प्रमुख कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन राजेंद्र गावित ह्यांना व कॉंग्रेस पक्षाला पाठींबा दिला होता परंतु राजकारण हे अनपेक्षित असते ह्याचा प्रत्यय आपल्याला कॉंग्रेस पक्षाने आपला उमेदवार माघारी घेऊन व बहुजन विकास आघाडीच्या उमेदवाराला पाठींबा देऊन दाखवून दिला.
जिथे साक्षात मुख्यमंत्र्यांच्या पसंतीला केराची टोपली दाखऊन त्यांची व राज्यमंत्री राजेंद्र गावित ह्यांची मानहानी केली गेली तिथे तालुका पातळीवर काम करणाऱ्या आपल्या संघटनेच्या निर्णयावर टिप्पणी करणे तसे विशेष नव्हते. काही मंडळीनी 'स्वाभिमानी' तोंडघशी पडली अशी चर्चा रंगवून असुरी आनंद व्यक्त केला, परंतु वसईतील प्रस्तापित पक्ष निद्रिस्थ असताना ठाकुरांच्या 'अरे' ला 'कारे' असे ठणकावून सांगण्याचा निर्भीडपणा ह्याच तरुणांनी दाखवला होता हे विसरता कामा नये. निर्णय चुकतील म्हणून ते न घेणाऱ्या निष्क्रिय मंडळीपेक्षा धाडशी निर्णय घेउन समाजाचे नेतृत्व करण्याची धमक असणार्या तरुणाची आज समाजाला खरी गरज आहे. अपरिहार्य परिस्थितीमुळे घेतलेले निर्णय चुकीचे जरी वाटत असले तरी निर्णय घेणारेच समाजाला दिशा देतात हेच शाश्वत सत्य आहे.

सद्य स्थितीत कॉंग्रेस पक्षाने आपला उमेदवार मागे घेतल्याने काही अंशी वसईतील ख्रिस्ती समाजापुढे काहीसा पेच उभा राहिला आहे. आम आदमी पार्टी आणि मार्क्सवादी पक्ष जरी रिंगणात असले तरी खरी लढत हि भाजपा अन बहुजन विकास आघाडी ह्यात होणार आहे हे सांगण्याची गरज नाही. देशपातळीवर भाजपा पक्षाला सलग्न असलेल्या संघटनेचा इतिहास अल्पसंख्याकाच्या बाबतीत तितका चांगला नाही ते वास्तव आहे, ज्याची प्रत्यक्ष झळ वसईतील ख्रिस्ती समाजाला कधीही पोहचली नाही. दुसर्या बाजूला विचार केल्यास वसई-विरार परिसरात बहुजन विकास आघाडीच्या नेत्यांनी नेहमीच आपल्या समाजाला धर्माच्या नावावर टार्गेट केले आहे. आपल्या समाजाची दुकाने फोडणे, वाघोलीसारख्या ठिकाणी घरात घुसून आपल्या लोकांना मारहाण करणे, आपल्या समाजाच्या जमिनी बळकावणे असे अलीकडच्या काळात घडलेले अमानुष प्रकार विसरणे कदापि शक्य नाही. त्यामुळे वसईपुरता स्वार्थी विचार केल्यास आपला मुख्य शत्रू बहुजन विकास आघाडी हा असून वसईला ह्या गुन्हेगारी शक्तीपासून वाचवण्यासाठी निवडून येणाऱ्या सशक्त उमेदवाराला पाठींबा देणे गरजेचे आहे असे मला वाटते. वसईतील ख्रिस्ती समाजापुरता विचारकरता भारतीय जनता पक्षाला जरी आपण जातीयवादी मानत असलो तरीही इतिहास तपासून पाहिल्यास आपल्या समाजाकरिता खरा जातीयवादी पक्ष हा बहुजन विकास आघाडी हाच असून भावी पिढीला त्याच्या एकछत्री आव्हानापासून दूर ठेवण्यासाठी व वसईच्या दीर्घ हितासाठी बहुजन विकास आघाडीची राजकीय ताकद कमी करणे हेच आपले ह्या घडीला पहिले लक्ष्य असले पाहिजे. ह्या निवडणुकीत बहुजन विकास आघाडीला जर यश मिळाले तर त्याचे परिणाम येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या ३ जागेवर निश्चित पडतील व दुर्दैवाने त्यांच्या हाती अमर्यादित राजकीय सत्ता येवून महराष्ट्राच्या राजकारणात त्यांची उपयुक्तता अन उपद्रवमूल्य वाढेल व त्यांचे भीषण परिणाम वसईच्या राजकीय-सामाजिक समाजमनावर होतील. जर खरेच असे झाले तर मागील २५ वर्षाप्रमाणे विरोधकांचे खच्चीकरण होऊन वसईला ओरबाडण्याचे काम त्यांच्या लाभार्थीकडून अखंडपणे चालत राहील व आपल्या पुढील पिढीला आपल्या सारखाच संघर्ष करण्यावाचून पर्याय उरणार नाही. काही मंडळीचा आम आदमी पार्टीकडे भावनिक ओढा जरी दिसून आला तरीहि जिंकण्याची क्षमता नसणाऱ्या 'आम आदमी पार्टीच्या उमेदवाराला होणाऱ्या मतदानामुळे ख्रिस्ती मताचे ध्रुवीकरण होवून त्याचा फायदा अंतिमता बविआला होणार आहे त्यामुळे ख्रिस्ती पट्ट्यातून आपल्याला मते मिळत नसतील तर ती भाजपकडे न वळता आप कडे कशी वळतील ह्याची गनिमी नीती छुप्या पद्धतीने बविआ कडून आखली जात आहे.

राजकारणात बदलत्या परिस्थितीत आपले साध्य साधण्यासाठी उपलब्ध असणार्या वेगवेगळ्या पर्यायाचा विचार करून कमीत कमी नुकसान करणारे निर्णय घेणे महत्वाचे ठरते, त्यामुळे काही वेळेला भावनेला मुरड घालून व्यावहारिक पातळीवर निर्णय घेणे गरजेचे असते. सद्य परिस्थितीत बहुजन विकास आघाडीचा पाडाव करून त्याची तालुक्यावरील राजकीय पकड कमी करण्यासाठी त्या पक्षाचा पाडाव करण्याची क्षमता असणार्या पक्षाला मत देणे राजकीय दृष्ट्या शहाणपणाचे ठरेल असे मला वाटते. भविष्यात आपले स्वतचे घर जाळले जाण्याची शक्यता असताना जाळणाऱ्याचा बंदोबस्त करायचे सोडून कोसो दूर असणाऱ्या समधर्मी समाजावरील कल्पित हल्ल्याची भीती बाळगणे अन त्या भीतीतून घरच्या शत्रूचा पाडाव करण्यासाठी सक्षम असणाऱ्या उमेदवारला रोखणे आपल्या वसईतील समाजाकरिता आत्मघाती ठरू शकेल. प्राप्त परिस्थितीत देशातील वातावरण पाहिल्यास भारतीय जनता पक्षाला आघाडी मिळण्याची शक्यता अधिक असून आपल्या मतदार संघातील भारतीय जनता पक्षाचा उमेदवार पराभूत झाल्याने त्यात फार काही फरक पडणार नाही पण ह्यावेळेला आपण थोडा धाडशी निर्णय घेऊन भारतीय जनता पक्षाला एकगठ्ठा मतदान केल्यास आपल्या मुख्य शत्रूचा पाडाव होऊन भारतीय जनता पक्षाच्या विजयात आपला महत्वाचा वाटा दिसून येईल ज्याद्वारे तालुक्यात दोन धर्मामध्ये असलेले सौधार्याचे संबंध अधिक दृढ होऊन सर्वधर्मसमभावाचे चांगले वातावरण निर्माण होईल.

आज माझ्या दृष्टीने मला वसईतील आपल्या लोकांच्या सुरक्षतेची व हक्काची जास्त प्राथमिकता आहे, त्यामुळे राहते घर, गाव व समाज वाचवण्यासाठी जवळच्या शत्रूचा पाडाव करणे हे मी महत्वाचे समजतो. काही निर्णय घेणे कठीण जरी असले तरी निर्णय घेणे हे महत्वाचे असते. भविष्य कुणी बघितलेले नाही त्यामुळे प्राप्त स्थितीत थोडे स्वार्थी बनून हिरव्या वसईला लुटणाऱ्या माफियाराजचा मुकाबला करण्यासाठी आपले मत भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराला देणे मला अधिक संयुक्तिक वाटते. आपण सर्व सुज्ञ अन सुशिक्षित आहात व प्राप्त परीस्थित आपल्या वसईला डोळ्यासमोर ठेऊन मतदान कराल ह्यात काही शंका नाही. आपले मत वसईच्या भविष्यासाठी अमुल्य आहे.