Tuesday, August 27, 2013

Letter to Editor 'Maharashtra Times'.

कुडनकुलम अणुप्रकल्प विरोधक 'ख्रिस्ती' कसे?



७ मे रोजी महाराष्ट्र टाइम्स मध्ये प्रसिद्ध झालेल्या 'झेपावे अणुऊर्जेकडे' ह्या आपल्या अग्रलेखात कुडनकुलम प्रकल्पाला विरोध करणाऱ्या संघटनांमध्ये 'ख्रिस्ती' धर्मप्रसारक असल्याचा 'धार्मिक' उल्लेख खटकणारा आहे. आपल्या सारख्या जबाबदार वृत्तपत्राने अन तेही विशेष करून अग्रलेखामध्ये केलेले असे विधान जातीय विद्वेष पसरवणार आणि त्याच बरोबर भारतीय समाजात ख्रिस्ती अल्पसंख्यकाविषयी गैरसमज पसरवणार आहे. ख्रिस्ती धर्मियांनी नेहमीच देशाचे कायदे पाळून तसेच निस्वार्थ वृत्तीने मिशन कार्य करून देशाच्या प्रगतीमध्ये मोलाचा वाटा उचललेला आहे, हे सांगावयास नको. धर्मापेक्षा देशाच्या सार्वभौमत्वाला व सुरक्षेला नेहमीच प्राधान्य देणाऱ्या ख्रिस्ती समाजाला अशा प्रकारे आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करणे हे अतिशय दुर्दैवी अन निंदनीय आहे.



आज देशामध्ये प्रचंड घोटाळे होत असताना अशा घोटाळेबाजांचा वयक्तिक उल्लेख टाळून त्यांना 'धार्मिक' चेहरा देणे संयुक्तिक ठरेल काय?. मोठ्या प्रकल्पांना विरोध करणारे 'ख्रिस्ती', बॉम्बस्फोट करणारे 'मुस्लिम' अन घोटाळे करणारे 'हिंदू' अशी देशाची वाटणी केलेली कशी वाटेल?. मुळात देशाच्या प्रगतीला अडथळे आणणारी, दहशतवाद माजवणारी अन सामन्यांचे शोषण करणारी मंडळी ही कोणत्याही जातीची अन धर्माची नसून आपल्या स्वार्थासाठी देशाशी बेईमान करणारी जमात असते, त्यांना विशिष्ट धर्माचा चेहरा देणे हे भविष्याच्या दृष्टीने गंभीर अन धोकादायक आहे. आपण अग्रलेखात म्हटल्याप्रमाणे अजून भारताला प्रगतीचा बराच दूरचा पल्ला गाठायचा आहे, अन त्या करिता देशाला मोठ-मोठ्या प्रकल्पाची गरज आहे पण त्याहीपेक्षा जरा जास्त देशात जातीय अन धार्मिक सलोखा राहणे महत्वाचे आहे.



ह्यापुढे संवेनशील विषय हाताळत असताना एखादा विशिष्ट समाज आपल्या लेखणीचा बळी ठरणार नाही ह्याची काळजी घ्यावी.



सचिन मेंडीस - वसई

No comments: