Wednesday, October 22, 2014

माझ्याच सारख्या तरुणांसाठी उगाच सुचलेली कविता !!

माझ्याच सारख्या तरुणांसाठी उगाच सुचलेली कविता !!
 -----सचिन मेंडिस------

निकाल लागला, पण तसं काही विशेष वाटत नाही.
कोण जिंकले कोण हरले, पण डोळ्यात पूर्वीसारखे अश्रू साठत नाही.
ठाकूर निवडून आल्याचा द्वेष नाही
पंडित, फुर्ट्याडो, तुस्कानो पडल्याचा क्लेश नाही.
सगळ कसं सरळ रेषेत चालू आहे, ना द्वंद ना खंत
आता लढणे नाही, पडणे नाही कि कुणाला पाडणे नाही.


पंडित निवडून आले होते, म्हणून फुकटात काही घरात आले नाही,
 अन ठाकूर निवडून आले म्हणून, घरातून कोणी काही नेणार नाही,
म्हणून खंर सांगू, निकाल लागला, पण तसं काही विशेष वाटत नाही,
 कोण जिंकले कोण हरले, पण डोळ्यात पूर्वीसारखे अश्रू साठत नाही.

अंदाज चुकले, आकडे फिरले,
 ज्याचा आकडा जास्त, तो राज्यकर्ता.
 सगळा आकड्यांचा खेळ,
ज्यांचे जास्त आकडे, तोच प्रजेचा कर्ताधर्ता,

आपल्याला आकड्यांसाठी
 ७.१४ ची अंधेरी लोकल रोज पकडायलाच हवी,
बाकी आपली तिचं हरित वसई
 अन तिचं संघर्ष कहाणी.
सगळ कसं सरळ रेषेत चालू आहे, ना द्वंद ना खंत
 आता लढणे नाही, पडणे नाही कि कुणाला पाडणे नाही.

 जिथून सुरु केलं होत २००८ साली,
 त्याच रस्त्यावर येऊन पोहोचलंय,
एक वर्तुळ पूर्ण फिरून,
आज त्याच पूर्वीच्या जागेवर थांबलोय,
 तसं हाती काही लागलं नाही
 अन हाती काही लागणारही नव्हत.
 हात कधी आपण पसरले नाहीत,
अन कधी पाठीत वाकणारही नव्हतो.
 मिरवावं असं भरीव काही, आज मागे सुरलं नाही
 पोलिस केसेस अन कोर्टाच्या तारखा,
त्याचही दुख: उरलं नाही.
ज्यांच्यासाठी लढायचं, तेच आज असे परके झालेत,
 ज्यांच्याविरुद्ध लढायचं, तेच समाजाचे आश्रयदाते झालेत,
 म्हणून सगळ कसं सरळ रेषेत चालू आहे, ना द्वंद ना खंत
 आता लढणे नाही, पडणे नाही कि कुणाला पाडणे नाही.

 जमेपेक्षा खर्च जास्त येईल, ह्याची भीती धरली नाही, ख
रंतर जमा खर्च मांडायची, आज इच्छाच उरली नाही,
ना नाउमेद झालो मी, ना सोडले रणांगण मी
फक्त लढण्याचा भ्रम, समाज परिवर्तनाची खाज, पोरा आता आवरायला हवी.
डोळ्यातील धग, अंगातली रग, पोरा आता सावरायला हवी.

आता शेजारया सारखं शांत बसायचं, त्यांच्यासारखी टोपी फिरवायची,
 हिरव्या वसईची 'सुवार्ता', आता बिलकुल नाही मिरवायची,
कुणी लाठी उगारली तर मनोसोक्त हसायचं, कुणी दुकान लुटलं तर चुपचाप बसायचं
 सगळ कसं सरळ रेषेत चालू आहे, चालू राहील, ना द्वंद ना खंत
आता लढणे नाही, पडणे नाही कि कुणाला पाडणे नाही.

 -----सचिन मेंडिस------

No comments: