Wednesday, August 12, 2015

लग जा गले की कल हो ना हो !

लग जा गले की कल हो ना हो !

एक जवळचा मित्र अकाली निघून गेला. वाटलं शेवटचा भेटला होता तेव्हा त्याला मिठी मारायला हवी होती, अन सांगायला हवं होत, की तू किती चांगला आहेस, माझ्या आयुष्यात तू किती महत्वाचा आहेस. परंतु हस्तांदोलना पलीकडे कधी मिठीत घेण्याचा प्रश्न आला नाही. त्याचे शेवटचे दर्शन घेताना त्याच्या कपाळाचे चुंबन घेतले अन केसावरून हात फिरवला. मन विचार करू लागले, हे तो अवतीभवती असताना का शक्य झाले नाही? मैत्रीत अन नात्यात ही सहजता का नसावी? कुठले हे अवघडलेपण? की नात्याला गृहीत धरण्याचा मनाचा स्वभाव? प्रेमाची सहजता, ऋणानुबंध, वास्तल्य्य, आपुलकी आपल्या कौटुंबिक अन मित्राच्या नात्यात का नसावी? आई-वडील, भाऊ-बहिण, मुलं-मुली, नातेवाईक, मित्र ह्यांना मिठीत घेण्यात संकोच का वाटत असावा? की प्रौढपणा निरागसता अन सहजता मारून टाकत असावा? की फक्त मोठा आघात झाल्यावर एकमेकांना मिठीत घेण्याची गरज भासावी.

माझ्या पत्नीच्या मामाकडच्या 'बय'कडे गेलो की ती पहिली मला मिठीत घेते अन हलकेच गालावर 'गोका' घेते. प्रेम व्यक्त करण्याचा किती सोपा परंतु प्रभावी प्रकार. जी गोष्ट लाखो शब्दात मांडता येणार नाही, ती एका मिठीत व्यक्त होते. देवाने गोष्टी किती सोप्या बनवून ठेवल्या आहेत. जवळचा मित्र जेव्हा अकाली गेला तेव्हा इतर मित्रांनी एकमेकांना आलिंगन देऊन सांत्वन करण्याचा प्रयत्न केला. शोका प्रसंगी येणारी ही सहजता आपल्याला दैनदिन जीवनात का आणता येत नसावी? जीवन हे किती क्षणभंगुर आहे, ह्याचा अनुभव आपण अलीकडेच घेतलेला आहे. म्हणून आपल्या सर्व प्रिय व्यक्तींना भेटून सांगावेसे वाटते, 'लग जा गले की कल हो ना हो' !

No comments: